मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

मला मुलगाच हवा - वंशाचा दिवा

मला मुलगाच हवा - वंशाचा दिवा




 काल निशाचा खूप वर्षांनी फोन आला. २००६ साली नोकरी कधीही मिळणार ताई ? हे विचारणारी निशा २००८ ला लग्नाचे योग कधी हे विचारायला आली. त्यानंतर तिचा काल फोन आला. काय म्हणतेस ? कशी आहेस सगळे औपचारिक सवांद झाल्यांनतर निशा मूळ मुद्द्यावर आली. "ताई माझी पत्रिका असेल ना तुमच्याकडे ? मागे मी लग्नाचे विचारायला आले होते. "
 "आहे गं पत्रिका माझ्याकडे. बोल काय प्रश्न आहेत ?"
" ताई आम्ही ना दुसऱ्या बाळाचा विचार करतोय. कधी योग आहेत ते सांगू शकाल का ?"
"हो अगं, सांगते मी. उद्या फोन कर मला."
"आणि ताई....... "
मी विचारले "काय गं ?"
आणि तिचा मला अपेक्षित असणारा प्रश्न आला. "ताई मला ना पहिली मुलगी आहे."
"मग ?" माझा तिरकस प्रश्न.
"ह्या वेळेस मला मुलगा होईल का ? जरा सांगा ना"
हा प्रश्न ऐकून इतका राग आला पण रागावर ताबा ठेवून मी तिला शांतपणे सांगितले,"हे बघ निशा. मी तुझ्या पत्रिकेवरून तुला आता बाळ होईल का आणि ते बाळ सुदृढ असेल ना एवढे सांगू शकेन. मुलगाच होईल हे मी सांगणार नाही."
त्यावर तिचा हतबल प्रश्न," ताई तेवढं जरा बघा नां होईल का मुलगा ते ? "
पुन्हा एकदा तेच सांगून फोन ठेवून दिला मी. मुलगाच होईल का ? हा प्रश्न मला नेहेमीच विचारला जातो. अगदी मुलगा होण्यासाठी काय उपाय करता येतील का तुमच्या शास्त्राप्रमाणे ? हे सुद्धा विचारले जाते. हे ऐकून खरंच कीव करावीशी वाटते.

माझे काही जातक हे अमेरिका, सिंगापूर,कोरिया,लंडन,जर्मनी इ. ठिकाणाहून आहेत. ते जेंव्हा बाळाचे गर्भाशयातील बाळाचे लिंग परीक्षण करून घेतात तेंव्हा आश्चर्य वाटते. काही जातकांनी मुलीचा गर्भ आहे हे कळल्यावर गर्भपात करून घेतला आहे. 

काही केसेस मध्ये तर मी हे ही पहिले आहे की सुनेला मुलगी झाली म्हणून सुतकी चेहऱ्याने सासूबाई बातमी सांगताहेत. इतकं सुतकी वातावरण की पेढे -बर्फी काहीही वाटण्याची गरज त्यांना वाटत नाही. एका केस मध्ये तर माझ्या जातक मैत्रिणीला ८ वर्ष बाळं होत नव्हतं. आठ वर्षांनी IVF पद्धतीने तिला जुळ्या मुली झाल्या. सासूबाई आणि नवऱ्याने तिला हॉस्पिटलमध्येच सुनावले की आता घरी यायची गरज नाही. सहा-सात महिन्यांनी नवऱ्याने तिला घरी आणले. परंतु सहा सात महिने त्या मुली बाबांच्या आणि आजी-आजोबांच्या प्रेमापासून वंचित राहिल्या. मुलींचा आणि त्यांच्या आईचा असा काय गुन्हा झाला की सासरच्यांकडून ही वागणूक मिळावी ? हे सगळं ऐकलं की खरंच मन सुन्न होतं. कुठल्या शतकात आहोत आपण ? उच्च शिक्षण घेऊन परदेशात उच्च पदावर काम करणाऱ्या लोकांचेही हेच विचार आहेत अजून ? मग काय उपयोग आहे शिक्षणाचा ? ह्या सगळ्याचा विचार करता आपल्या भारतीय समाजव्यवस्थेकडे मन येऊन पोहोचते.    

सुरवातीला आपल्या समाजव्यवस्थेने काही नियम घालून दिले होते. म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा कारण मुलगा लग्न झाले तरी आडनाव बदलत नाही,घराणे बदलत नाही. आई - वडिलांकडेच राहतो. मुलगी तर लग्न होऊन जाते सासरी मग आम्हांला कोण बघणार ?? ह्या सर्व गोष्टी सांगून सुनेवर नाहीतर स्वतःच्या मुलीवर तुला मुलगाच झाला पाहिजे हे दडपण लादले जात असे. 

परंतु आजही २०१६ ला जेंव्हा मला असे फोन येतात तेंव्हा खूप चीड येते. आज माझ्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत ज्या कुटुंबातील मुलगा परदेशात वास्तव्य करून आहे आणि मुलगी सासरी नांदत असली तरी आई -वडिलांची काळजी घेतेय.

काळ बदला आहे. काळाप्रमाणे आपणही बदलायला हवे. जो हा बदल जाणीवपूर्वक आपल्या जीवनात आणत नाही तो संपलाच. ह्याचे अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर सध्या रिक्षा आणि टॅक्सीवाले संप पुकारणार आहेत ? का तर म्हणे उबर आणि ओला ह्यांनी आमच्या धंद्यात घसरण आणली. प्रत्यक्षात रिक्षावाल्यांची अरेरावी आणि काळाबरोबर न बदलण्याच्या वृत्तीमुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे. आपल्या शास्त्रातही हे नमूद केलेय काळाप्रमाणे बदल करणं गरजेचे आहे. काळाप्रमाणे जो बदलतो त्याच्या जीवनाची प्रगती झालीच म्हणून समजा. 

हेच सांगणे आहे माझे ह्या काळातल्या होणाऱ्या भावी पिढीला. मुलगाच हवा हा हट्ट सोडून द्या. का बरं मुलाचाच हट्ट धरून बसलात ? मुली कुठे कमी पडताहेत ? गेल्या कित्येक वर्षांचे बोर्डाचे निकाल बघा. प्रत्येक निकालांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. आज सगळ्या क्षेत्रात मुली आहेत. आणि नुसत्याच त्या क्षेत्रात नाहीयेत तर आपल्या कर्तबगारीने अव्वल दर्जावर आहेत. मग मुलगी का नको ? का मुलगाच हवा आहे ?  संगोपन करतांनाच मुलगा म्हणून फार लाड  आणि मुलगी दुसऱ्याच्या घरचे धन म्हणून हिणवू नका. ही मुलींची कामे आहेत ही मुलांनी करायची नाहीत हे शिकवणही देऊ नका. अजून आपल्या भारतात मुख्यत्त्वे गुजरात,राजस्थान,हरियाणा, उत्तरप्रदेश ह्या ठिकाणी बायकांना अक्कल नसते,बायकांना नेहेमी आपल्या धाकात ठेवावे,बायकांना शिक्षणाची गरज काय ? अशा प्रकारांची विचारसरणी अजूनही आहे. ती येत्या काळात बदलेलच. तुमचं काय ?  आत्तापासूनच संगोपनात बदल घडवून आणाल तर ह्या पिढीत तरी आपल्याला जुनाट विचारसरणीचा अंत झालेला दिसेल. मुलींचे संगोपन कुठल्याही बुरसटलेल्या विचारसरणीने करू नका. तिला फुलू दे,वाढू दे, बहरू दे कारण तीच तुमच्या पुढच्या पिढीला जन्म देणार आहे. तिचं अस्तित्व वाचवा हीच माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना.  

काळाला बदलण्याची ताकद स्त्रीमध्येच आहे. 


बघा खालील चित्रांवरून काही समजतंय का ? 
सितार वादक अनुष्का 


शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

गुरुचे कन्या राशीतील भ्रमण

गुरुचे कन्या राशीतील भ्रमण  

गुरुचे सिंह राशीतील पर्व संपून गुरूने कन्या राशीत प्रवेश केला. प्रत्येक राशीला त्याची काय काय फळे मिळतील वाचा बरे - 


मेष राशी - 


  • नोकरी - नोकरीत पदोन्नतीची शक्यता. नोकरीच्या निमित्ताने परदेश प्रवास होणार आहेत.  
  • तब्येत - लिव्हर/ pancreas ह्या संदर्भात ऑपरेशन होण्याचे योग आहेत. त्यामुळे पोटदुखीकडे कानाडोळा करू नका. 
  • घ्यायची काळजी - सध्या छोट्या छोट्या गोष्टींवरूनही वादावादी होऊ शकते आणि त्यामुळे नात्यात गैरसमज होऊ शकतात. ह्या संपूर्ण काळात रागावर नियंत्रण ठेवणे. 


वृषभ राशी -


  • नोकरी - सध्या तुम्हाला त्याच त्याच कामाचा कंटाळा आलेला आहे. नोकरीत बदल हवा आहे. स्वतःचा व्यवसाय करण्याचे वारे डोक्यात फिरू लागतील. 
  • घर / गाडी - घरात इंटिरियर बदलून घ्याल. घरात सजावटीच्या महागड्या वस्तू घेण्याचे योग. गाडी घेण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. 
  • मुले - गुरु पंचमातून भ्रमण करणार आहे आणि लाभावर दृष्टी आहे. सर्व प्रकारचे लाभ होणारच आहेत त्याचबरोबर जी जोडपी मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभदायी ठरेल. 
  • तब्येत - High B. P., डायबेटीसचा त्रास आहे. वजन वाढू शकते. खाण्यावर नियंत्रण ठेवणे.   
  • घ्याची काळजी - व्यवसाय करण्याची रिस्क सांभाळून घेणे. विचारपूर्वक निर्णय घेणे. पती/पत्नी बरोबर वादविवाद विकोपाला जाऊ शकतात. 


मिथुन राशी - 


  • नोकरी -  नोकरीत कामात वाढ होणार आहे. स्वतःच्या कामांबरोबरच दुसऱ्या कर्मचाऱयांचीही कामे करावी लागतील आणि त्याचाच ताण वाढेल. 
  • घर - नवीन घर घेण्याचे योग आहेत. 
  • तब्येत - तब्येतीची काळजी घेणे. जुनी दुखणी पुन्हा डोके वर काढतील. 
  • प्रवास - ह्या वर्षात धार्मिक स्थळांना भेट द्याल.
  • घ्यायची काळजी - प्रवासात तब्येतीची काळजी घेणे. 


कर्क राशी - 


  •  कर्क राशीसाठी धनप्राप्तीची योग खूपच चांगले आहेत. पगारात वाढ संभवते किंवा स्वतःचे घर भाड्याने दिले असेल तर भाडेवाढ कराल. fast money चे वेड लागेल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवाल.  
  • नोकरी - नोकरीच्या निमिताने लांबचे प्रवास कराल. कामात वाढ होईल आणि जवाबदारीची कामे यशस्विरीत्या पूर्ण कराल आणि वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. 
  • तब्येत - अतिरिक्त चरबी रोगाच्या आमंत्रणास कारणीभूत ठरावी त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे. 
  • घ्यायची काळजी - वजनावर नियंत्रण ठेवणे. 


सिंह राशी - 


  •  कुटुंबस्थानातून होणारे गुरुचे भ्रमण कुटुंबात होणाऱ्या वाढीचीच ग्वाही आहे. कुटुंबात विवाह सोहळा लवकरच साजरा होईल. धनप्राप्तीचेही चांगले योग आहेत.  
  • नोकरी - नोकरीत पदोन्नती होईल. कामाचा ध्यास राहील
  • घर - नवीन घराची गुंतवणूक लवकरच कराल. 
  • तब्येत - हात आणि पाय दुखण्याच्या तक्रारी वाढतील. कॅल्शिअमयुक्त आहार घेणे. रक्तासंदर्भातील अंगावर पुरळ उठणे अशा जुन्या रोगांचे पुन्हा त्रास संभवतात.  
  • घ्यायची काळजी - खर्चावर नियंत्रण ठेवणे. 


कन्या राशी - 


  •  गुरुचे तुमच्या राशीतून होणारे भ्रमण हे लाभदायी ठरेल. 
  • नोकरी - नोकरीत नवीन पद्धतीनेही काम होऊ शकते हा तुमचा ह्या वर्षी प्रयत्न राहील. परदेशवारीही घडेल. 
  • घर - घर बदलाचे योग आहेत. नवीन जागेत रहायला जाण्याचे योग आहेत. 
  • तब्येत - वजन तर वाढणारच आहे परंतु खांदे आणि मानदुखी होणार तेंव्हा काळजी घेणे कारण ऑपरेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
  • घ्यायची काळजी - मणक्यावर ताण येणार नाही ह्याची काळजी घेणे. 


तुळ राशी - 


  • नोकरी - नोकरी/व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात काही काळ वास्तव्य होणार आहे. पदोन्नतीबरोबरच वरिष्ठांची खास मर्जी तुमच्यावर राहील. 
  • घर - वडिलोपार्जित जागा विकली जाऊन त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमचे घर लवकरच redevelopment ला जाईल. 
  • तब्येत - पोटाची काळजी घेणे. हॉस्पिटलमध्ये काही दिवस राहावे लागू शकते. 
  • घ्यायची काळजी - तब्येतीच्या बाबतीत खर्च वाढणार आहेत त्यामुळे वायफळ खर्च टाळावेत.   


वृश्चिक राशी - 


  • गुरुचे कन्येतील भ्रमण हे वृश्चिकेसाठी राजयोगकारक ठरेल. धनप्राप्तीच्या दृष्टीने भाग्योदयकारक योग आहेत. 
  • नोकरी - मनपसंत काम करण्याची संधी नोकरीत मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम संधी चालून येतील. 
  • तब्येत - डोकेदुखी,पित्त ह्या गोष्टी उद्भवतील. पाणी पिण्याचे प्रमाण ठेवावे. 
  • घ्यायची काळजी - काळजी घेण्यासारखे काहीच नाही परंतु पित्त खवळू देऊ नये. 


धनु राशी - 


  • जर तुम्ही बांधकाम व्यवसायात किंवा राजकारणात असाल तर गुरुचे हे भ्रमण तुम्हाला भाग्योदयकारकच ठरेल. 
  • नोकरी - नोकरी/व्यवसायात कामे वाढतील. अडलेली कामे मार्गी लागतील. 
  • तब्येत - तब्येतीच्या बाबतीत डोळ्यांची काळजी घेणे. डोळ्यांचे ऑपरेशन होऊ शकते. 
  • घ्यायची काळजी - शाब्दिक चकमकी नोकरीच्या ठिकाणी टाळा. 


मकर राशी - 


  • नोकरी - नोकरीत वरिष्ठांचा राग सांभाळावा लागेल.अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देता देता नाकी नऊ येतील. एकूणच काळ चांगला नाही. 
  • तब्येत - पाठीच्या कण्याचा त्रास आहे. 
  • घ्यायची काळजी - ताकही फुंकून प्यावे असे योग आहेत सध्या. परिस्थितीचा आढावा घेऊन स्वतःचे मत मांडावे. 


कुंभ राशी - 


  • नोकरी -   चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार मिळणार नाही. आळस झटकून कामाला लागा. परीक्षेचा काळ आहे. 
  • तब्येत - तब्येतीच्या बाबतीत हृदयासंदर्भात त्रास दिसतोय. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे. ज्यांना आधीच हा त्रास आहे त्यांचे अँजिओप्लास्टी किंवा ह्याच सारखे ऑपेरेशन दिसतेय. 
  • घ्यायची काळजी - घरी अस्थिर वातावरण निर्माण होईल. गैरसमज दूर करण्यात वेळ घालवावा लागेल. 


मीन राशी - 


  • नोकरी -   शत्रूवर मात करण्याचे योग आहेत. नोकरी संदर्भात परदेशभ्रमण आहेच परंतु त्याच बरोबर नवीन गोष्टी शिकून घेण्याचा काळ आहे. 
  • तब्येत - पाठीचे दुखणे उद्भवू शकते. 
  • घ्यायची काळजी - कोणावरही विश्वास ठेवू नका.  


सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

वाचकसंख्या वाढतेय

वाचकसंख्या वाढतेय 


माझ्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना माझ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. ब्लॉगवरचे लेख हे ९५% वेळेस मराठीतून लिहिलेले असले तरी जगभरातून वाचले जातात हे विशेष. त्याचीच कल्पना खालील छायाचित्रावरून समजून येतं.   

जगभरातून असलेले वाचक 


अमेरिकेतून लक्षणीयरित्या लेख वाचले जातात.  

सर वाचकांना पुनःश्च धन्यवाद. लेख वाचून मला काहींनी त्यांचे वैयक्तिक प्रश्न मला पाठवले,काहीनी लेख खूप आवडतात ..लिहीत रहा म्हणून प्रोत्साहन दिले, काही वाचकांनी अमुक ह्या विषयावर लेख लिहिण्याची विनंती केली. आधीचे माझे सर्व लेख हे ज्योतिष ह्या विषयावरच आधारित होते परंतु नंतर वाचकांच्या विनंतीवरून मी वास्तू संदर्भातील लेख लिहिण्यास सुरवात केली. काही वेळेस वेळे अभावी मला लेख लिहिता आले नाहीत त्यावेळी वाचकांची विचारणा होते की ब्लॉग लिहा. अशी विनंती आली की खूप बरे वाटते. 

ब्लॉगचे वाचक भारत,जर्मनी,ऑस्ट्रेलिया, स्पेन, दुबई,दक्षिण कोरिया, सिंगापुर, अमेरिका, लंडन, रशिया, श्रीलंका इ. ठिकाणाहून आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे २००९ पासून इथंवर प्रवास केला आहे. सतत असाच पाठिंबा देत रहा आणि मी नवीन विषय घेउन लेख लिहीत राहीन. वाचकहो असेच नितांत प्रेम करत रहा आणि सतत माझ्या पाठीशी उभे रहा.

अनुप्रिया देसाई 

READERS ALL OVER THE WORLD