सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

वास्तूशास्त्र - खरोखरीच शास्त्र की निव्वळ फ़ॅड ?


वास्तूशास्त्र - खरोखरीच शास्त्र  की निव्वळ फ़ॅड ? 

नुकत्याच लग्न झालेल्या विनोदला राहता १BHK कमी पडू लागला. त्याने नवीन घर शोधण्यास सुरवात केली. स्वतः इंजिनिअर असूनही त्याचा ज्योतिष -शास्त्र, वास्तूशास्त्र ह्यावर त्याचा विश्वास. वास्तूशास्राच्या नियमांमध्ये बसेल असे घर त्याला पाहायचे होते. तो स्वतः पुण्यात. घर घ्यायचे होते पुण्यातच. मागच्या आठवडयात एक घर त्याच्या पसंतीस उतरले. आता हे घर वास्तू शास्त्राच्या नियमांप्रमाणे आहे का ह्यावर त्याला माझा सल्ला हवा होता. तो पुण्यात आणि मी मुंबईत. मग त्याला घराचा फ्लोर प्लॅन मला वॉट्स ऍपवर पाठवण्यास सांगितले. त्याने लागलीच फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन मला पाठवला. 

घरच्या फ्लोर प्लॅनमध्ये आढळले दोष म्हणजे (घर Resale चे आहे )-
१) पूर्व दिशा पूर्णपणे बंद. म्हणजेच पूर्वेला एकही खिडकी नाही. 
२) ईशान्येत असलेला मुख्य दरवाजा. ज्यामुळे ईशान्य दिशेत कट निर्माण झाला.
३) पूर्व दिशेत दोन्ही टॉयलेट्स होते.
४) दक्षिणेत असलेल्या मोठाल्या खिडक्या.
५) सर्वात शेवटच्या मजल्यावर हे घर होते. घराच्या थेट वरती गच्ची. 

पूर्व दिशेतून येणारी सकाळची सूर्यकिरणे ही आरोग्यदायी असतात. माझा अनुभव असा आहे की ज्या घरात पूर्व दिशा पूर्णपणे बंद असते त्या घरातील व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन "D"" ची कमतरता दिसून. मग त्यांना कॅल्शिअमची इंजेकशन्स घ्यावी लागतात. त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरूच असतात. सुर्याच्या किरणांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D असते. जर वास्तूत सकाळची उन्हे म्हणजेच सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतची सूर्याची किरणे भरपूर प्रमाणात प्रवेश करत असतील तर त्या घरातील व्यक्तींना नैसर्गिकरित्या हे व्हिटॅमिन मिळत असते. सूर्याच्या किरणांमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्त्वही असतात त्यामुळे ही उन्हे जर स्वयंपाक घरात थेट प्रवेश करत असतील तर तिथे विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेत असावे असे सांगितले गेले आहे. त्याकरिताच पूर्व दिशेत खिडक्या असाव्यात. परंतु ह्या घरात पूर्वेला खिडकी नाही म्हणजेच ह्या वास्तूतील व्यक्तींना तब्येतीच्या सततच्या तक्रारी असू शकतील ही एक शक्यता मी वर्तवली. 

ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा असे आपण मानतो. ईशान्य दिशेत नेहेमी देवघर किंवा देव्हारा असावा असे नियम आहेत. ह्यालाही शास्त्रीय कारणे आहेत. ईशान्य दिशा सर्व दिशेत उच्च मानली गेली आहे. तिथे घराचे मुख्य प्रवेशद्वार असू नये. टॉयलेट्स तर मुळीच असू नयेत. ह्या वास्तूत घराचा मुख्य दरवाजा आहे ईशान्य दिशेत. अशा घरातील व्यक्तींच्या मनावर सतत मानसिक दडपण असणार ही दुसरी शक्यता मी वर्तवली. 

पूर्व दिशेत घरातील दोन्ही टॉयलेट्स होते. पुन्हा तोच नियम लागू होतो. पूर्व दिशेची उन्हे घरात थेट प्रवेश करायला हवीत. तर ह्या दिशेत टॉयलेट्स असणे हे पूर्णपणे निषिद्ध मानले गेले आहे. अशा वास्तूमध्ये शैक्षणिक प्रगती अजिबात होत नाही असे माझे observation आहे. क्षमतेपेक्षा कमी टक्के मिळणे, आपण काय शिकावे ?  हे समजत नाही. अशा वास्तूत राहणाऱ्या मुलांची Grasping power च कार्य करू शकत नाही. टंगळ मंगळ, टवाळक्या करणे असे उद्योग ही मुले करत राहतात. उद्दामपण वाढतो कारण सारासार विचार करण्याच्या बुद्धीवरच घाला घातला जातो. त्यामुळे इथे शैक्षणिक प्रगती होणे नाही ही तिसरी शक्यता मी वर्तवली.  

दक्षिण दिशेत असलेल्या खिडक्या हा ह्या वास्तुत होणाऱ्या दोषांमध्ये आणखीनच भर घालत होता. दक्षिण ही दिशा निषिद्ध मानली गेली आहे. दक्षिणेकडून येणारी energy ही अजिबात आरोग्यदायी नसून वास्तूत राहणाऱ्या अचानकपणे व्यक्तींवर मानसिक दबाव येणे, आर्थिक आणि मानसिक कोंडी होणे ही चौथी शक्यता मी वर्तवली.   

सर्वात शेवटच्या मजल्यावर असणाऱ्या घरात सर्वात जास्त गरमीचा त्रास होतो. कारण सूर्याची किरणे थेट गच्चीच्या सज्जावर पडत असतात. त्यामुळे त्याखालील असलेल्या घरात उष्णता वाढत जाते. सूर्यास्तानंतर ही उष्णता कमी होण्याची अपेक्षा आहे परंतु आजकालच्या सिमेंट -काँक्रीटच्या बांधकामामुळे ही उष्णता निवळली जात नाही. हे तिथेच ,म्हणजेच त्या वास्तूत फिरत रहाते. ही वास्तूत फिरत रहाणारी सततची उष्णताच आरोग्यसाठी घातक ठरते. गच्चीच्या खालचा फ्लॅट असण्यात अजून एक नकारात्मकता म्हणजे तुमच्या फ्लॅट्च्याचवरती पाण्याची ओव्हरहेड टाकी असणे. सततच हे वजन असणे म्हणजे डोक्याला ताप असतो. अशा वास्तूतील व्यक्तींना मानसिक दडपण हे नेहेमीच असते. ही पाचवी शक्यता मी वर्तवली. 

विनोदला विचारले की ह्यांच्या घराच्या बरोबरवरती गच्चीत टाकी येते का रे ? त्यावर विनोदने सांगितले की टाकी तरी नाहीये परंतु हल्ली ते solar projections असतात सोलर energy साठी ती सगळी व्यवस्था ह्या फ्लॅटच्या बरोबरवरतीच आहे. मग मला वेगळीच शंका आली. मी त्याला ह्या वास्तूतील व्यक्तींमध्ये कोणाला मानसिक आजार आहे का ते विचारले आणि विनोद स्तब्धच झाला. त्याने माहिती दिली ती अशी की ह्या घरात दोनच व्यक्ती राहतात ते म्हणजे आई आणि तिचा १८ वर्षांचा मुलगा. मुलगा mentally challenged आहे. मुलाचे बाबा नोकरीनिमित्ताने मुंबईत असतात. मुलाच्या अशा परिस्थितीमुळे त्याच्या आईला नोकरी करता येणे शक्य नाही. सध्या आर्थिक कोंडी होतेय म्हणूनच हे घर विकून मुंबईत जाण्याचा विचार त्यांचा आहे. इथे वास्तूशास्त्राप्रमाणे वर्तवलेल्या सगळ्या शक्यता जुळून येतात. पहिली शक्यता तब्येतीच्या सततच्या तक्रारी असण्याची शक्यता सांगितली होती ती इथे खरी ठरतेय. दुसरी शक्यता अशी होती की घरातील व्यक्तींच्या मनावर असणारे मानसिक दडपण. आपल्या सर्वांनाच मानसिक दडपण असते परंतु त्या माऊलीचा विचार करा जिचा मुलगा मानसिक रोगी आहे त्या आईला किती दडपण असेल ? शैक्षणिक प्रगती होणे नाही ही वर्तवलेली शक्यताही तंतोतंत जुळते. आर्थिक कोंडी झाल्यामुळेच हे घर विकावे लागतेय हे त्या माऊलीने सांगितले. ( दक्षिण दिशेत असणाऱ्या खिडक्यांमुळे आर्थिक आणि मानसिक कोंडी होणे ). त्या घरात प्रवेश न करताही मी मुंबईतूनच पुण्यातील ह्या वास्तूत रहाणाऱ्या व्यक्तींची परिस्थिती तंतोतंत सांगितली ते वास्तूशास्त्राच्या अभ्यासामुळेच. 

आपल्या ऋषीमुनींनी बनवलेले हे नियम आपल्याच भल्यासाठीं आहेत. आमचा विश्वास नाही वास्तू आणि ज्योतिषावर असं म्हणायची फॅशन झाली आहे सध्या. परदेशी वंशाचे लोक भारतात येउन ही आपली सर्व शास्त्रे शिकताहेत आणि आपल्या देशात ह्याचा अंमल करतांना दिसतात तेंव्हा आपल्याच शास्त्रावर विश्वास नसलेल्या भारतीय लोकांची कीव करावीशी वाटते. माझे काही जातक हे परदेशी वंशाचे आहेत. ह्या जातकांच्या मनात तर भारतीय ज्योतिष-शास्त्र,वास्तू शास्त्र ह्याबद्दल प्रचंड आदर आहे. अत्यंत आपुलकीने ते ह्या शास्त्रावर माझ्याबरोबर चर्चा करतात. आणि भारतीय वंशाचे लोक आपल्याच शास्त्राची थट्टा करतांना दिसतात आणि आमचा अशा गोष्टींवर विश्वास नाही असे म्हणण्यात धन्यता मानतात. ह्या लेखावरून काहीतरी प्रकाश डोक्यात पडेल अशी अपेक्षा. वर्तवलेले भविष्य चुकले तर शास्त्र चुकीचे ठरत नाही. चुकतो तो ज्योतिषी किंवा वास्तूतज्ञ. तेंव्हा कृपा करून शास्त्राला दूषणे देऊ नका.       

वास्तू- शास्त्र सल्ल्यासाठी - www.kpastrovastu.com इथे भेट द्या. 

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

गुरु चंद्र युती

गुरु चंद्र युती 

आज पहाटे ५.०० वाजता आकाशात गुरु आणि चंद्राची युती पाहिली. अत्यंत मनमोहक दृष्य होते. ह्यावेळी गुरु कन्या राशीत २१ अंशावर हस्त नक्षत्रात आणि चंद्र कन्या राशीत २० अंशावर हस्त नक्षत्रात होता. ही युती आज दुपारी १२.०५ वाजेपर्यंत असेल आणि नंतर मात्र चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. 

चंद्र आणि गुरुची युती ही शुभ मानली गेली आहे. जर ही युती कर्क राशीत होत असेल तर त्याला गजकेसरी योग म्हणून संबोधले जाते. ही युती ज्याच्या कुंडलीत असते ती व्यक्ती भाग्यवान समजली जाते. (माझ्या पाहण्यात अजूनही गजकेसरी योगाच्या कुंडलीला जीवन संघर्ष नाही असे नाही. किंबहुना त्यांनाही सामान्य व्यक्ती एवढाच जीवन संघर्ष करावा लागलेला आहे. ) परंतु आजची युती ही कन्या राशीत हस्त नक्षत्रात झालेली आहे. मी माझ्या मोबाईलच्या कॅमेराने टिपलेली ही युती इथे प्रसिद्ध करतेय - 




चंद्र आणि त्याच्या बाजूला जो ठिपका दिसतोय तो आहे गुरु ग्रह. खगोलशास्त्रीय दृष्ट्या जे आकाशमंडळात दिसले ते मी इथे मांडले आहे. ह्याचा कन्या राशीवर काय परिणाम होईल ? ह्याची फळे काय ? हे सांगण्याचा अजिबात उद्धेश नाही. 
टिपणी - उद्या पहाटे ही युती दिसणार नाही कारण चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. 

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

कोजागिरीची रात्र

कोजागिरीची रात्र 


वर्षाऋतू संपून आश्विन महिन्यात आकाश निरभ्र होण्यास सुरवात होते. आणि ह्याच महिन्यातील पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ह्या रात्री श्रीलक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन "को जागर्ति ? को जागर्ति ?" (म्हणजेच कोण जागे आहे ) असे विचारात सर्वत्र संचार करत असते. जो जागरण करतो आहे त्याला धनसंपत्तीने समृध्द करते अशी आख्यायिका आहे. 

आपले पूर्वज हे काळाच्या कितीतरी पटीने पुढे होते. आपल्या ऋषीमुनींनी हे जाणले होते की कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राची किरणे शरीर-स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात सर्वांनी एकत्र येऊन त्याचा लाभ सर्वांना व्हावा ही धारणा ठेवून ह्या रात्री जो जागरण करेल तो समृद्ध होईल असे सांगण्यात आले. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शक्ती आहे. चंद्राच्या वाढत्या आकाराबरोबर ही शक्तीही वाढत जाते. त्यामुळेच काही वैद्य किंवा ह्या विषयातील तज्ञ् अमावस्येच्या दिवशी काही वनौषधींची लागवड करतात. (ह्या बद्दलचा पुरावा हवा असेल तर Gardening by the Moon, Moon Gardeners etc. गूगल करू शकता ) चंद्राच्या प्रकाशात असलेली शक्ती आपल्या ऋषीमुनींनी ओळखली होती. दुध हे आरोग्यदायी आहे. चंद्राच्या प्रकाशात जर हे दुध ठेवले आणि प्राशन केले तर ती शक्ती आपल्या शरीर स्वास्थ्यसाठी अत्यंत अमृतदायी ठरते. कोजागिरीप्रमाणेच कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमाही आरोग्यदायी आहे. मुंबईच्या जवळच अंबरनाथ इथे महादेवाचे मंदिर आहे. ह्या मंदिराच्या आसपासच्या परिसरात मोठे मैदान आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला ह्या मैदानातच सर्वजण उपस्थित असतात. स्वतःच्या समोर एका चिनीमातीच्या बशीत दुध ठेवले जाते. ते दुध रात्री काही काळांनंतर प्राशन केले जाते. हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की पौर्णिमेच्या दिवशीच ही सर्व शक्ती वातावरणात असते आणि जसा चंद्राचा क्षय होतो तशी ही शक्तीही कमी कमी होत जाते. 

परंतु काळाच्या ओघात बऱ्याचअंशी असा समज पसरला गेला की कोजागिरीची रात्र म्हणजे सर्वांनी गप्पा मारायच्या,छान नाश्ता करायचा आणि मग झोपून जायचे. हल्ली तर कोजागिरीला सुट्टी नसते म्हणून मग शनिवार किंवा रविवारच्या सोयीचा दिवस ठरवून कोजागिरी साजरी केली जाते. उद्देश चांगला आहे परंतु जो संदेश आपल्या ऋषीमुनींनी दिला आहे तो तर बाजूलाच रहातो. म्हणजे तुम्ही सोयीच्या दिवशी एकत्र तर येता परंतु त्या दिवशी कोजागिरी नसते. मग कुठे आला तो चंद्राचा प्रकाश आणि कुठे ती चंद्राच्या किरणांची शक्ती ??  ह्यामुळे मूळ उद्देश हरवतोय. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे ती अशी, की पौर्णिमेला सुट्टी नाही म्हणून सोसायटीत सोयीच्या दिवशी साजरी कराच परंतु कोजागिरीच्या रात्री चांदण्यात थोडा वेळ नक्की बसा. ज्यांना अस्थमा आहे त्यांच्यासाठी तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे पर्वणीच. चांदण्यात हळदीचे किंवा मसाल्याचे दुध काही काळ ठेवून प्राशन करा. नक्की फरक दिसेल. हे दुध ठेवण्यासाठी चांदीच्या वाटीचा उपयोग करा. चांदी हा धातू आणि मोती हे रत्न चंद्राच्या तत्वांना आकृष्ट करतात. चांदीची वाटी नसेल तर चिनीमातीची वाटी किंवा बशी चालू शकेल परंतु कृपा करून प्लॅस्टिकचे मग किंवा कप वापरू नका.    

जो जागरण करतो तो समृद्ध होतो ह्याचा अर्थ आरोग्याने संपन्न आणि समृद्ध होतो असा आहे हे विसरू नका कारण ज्याची तब्येत चांगली तो काम करण्यास सक्षम आणि मग लक्ष्मी त्याच्याकडे आलीच म्हणून समजा.  

तर मंडळी आजची कोजागिरी आरोग्यदायी पद्धतीने साजरी करा.  

बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

नवरात्र उत्सव कथा भाग २





नवरात्र उत्सव कथा भाग २


Image Courtesy - Sanatan Sanstha


देवीची ओटी कशी भरावी ?

         खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी !


१. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?

         ‘देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून (खण आणि साडी अर्पण करून) करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास साहाय्य होते.'


२. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
१. ‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.

२. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

३. ‘देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.

४. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.

५. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे.


३. ओटी भरतांना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे रहावे.

४. देवीची ओटी भरतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ

१. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्त्व आकृष्ट होते. हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास साहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षक-कवच निर्माण होते.

२. वस्त्रातून पृथ्वीतत्त्वाच्या साहाय्याने सात्त्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे गतीमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणार्‍याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक-कवच निर्माण होण्यास साहाय्य होते. तसेच साडी आणि खण यांमध्ये आलेल्या देवीतत्त्वाच्या सात्त्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमयकोश यांची शुद्धी होण्यास साहाय्य होते.

३. हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणार्‍या मुद्रेमुळे शरिरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास साहाय्य होते, तसेच मनोमयकोशातील सत्त्वकणांचे प्रमाण वाढण्यास साहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीतजास्त नम्र होतो. देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणार्‍याच्या शरिरात संक्रमित होण्यास साहाय्य झाल्याने शरिरातील अनाहतचक्र कार्यरत होऊन पूजा करणार्‍याचा देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास साहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त, तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्त्विकता जास्त काळ टिकते.

४. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो.'

५. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो ?

         ‘त्या त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीतजास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणार्‍या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्त्व जिवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्त्व जास्तीतजास्त अन् लवकर आकृष्ट करणारे रंग (त्या त्या देवीच्या तत्त्वाशी संबंधित रंग) दिले आहेत.

         ५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते; कारण जिवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प-अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी जिवाकरता कार्य करणे अवलंबून असते.

‘देवीचे तत्त्व

तत्त्वाशी संबंधित रंग

रंगांचे प्रमाण (टक्के)

१. श्री दुर्गादेवी
तांबडा (लाल)
-
२. श्री महालक्ष्मी
तांबडा + केशरी
६० + ४०
३. श्री लक्ष्मी
तांबडा + पिवळा
४० + ६०
४. श्री सरस्वती
पांढरा
-
५. श्री महासरस्वती
पांढरा + तांबडा
६० + ४०
६. श्री काली
जांभळा
-
७. श्री महाकाली
जांभळा + तांबडा
८० + २०


६. देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते ?
देवीला नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या
आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे

         देवतेप्रती भाव असणार्‍या आणि गुरुकृपायोगाप्रमाणे समष्टी साधना करणार्‍या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली, तरी चालू शकते; कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच. मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे. नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. नऊवारी साडीतील नऊ वार (स्तर) हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात. नऊवारी साडी अर्पण करणे, म्हणजे मूळ निर्गुण शक्‍तीला, जिच्यात देवीतत्त्वाची, म्हणजेच शक्‍तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगांसह (नऊ रूपांसह) प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. ‘९’ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणार्‍या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधीत्व करतो.’

७.देवीला अर्पण केल्या जाणार्‍या खणाचा आकार त्रिकोणी का असतो ?
         ‘त्रिकोणी आकार हा ब्रह्मा-विष्णु-महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्‍तीशी निगडित आहे. ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे, म्हणजे ‘आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी आदिशक्‍ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्‍ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय.’ 

।। शुभं भवतु ।।

नवरात्र उत्सव कथा भाग १




नवरात्र उत्सव कथा  भाग १

नवरात्र ह्या वर्षी एक ऑक्टोबरला सुरु होत आहेत. ह्याबाबतीत मला बऱ्याच जणांनी नवरात्रावर काही लिहा ही विनंती केली आहे. त्यामुळे मी नवरात्राची उत्सव कथा ही ह्या लेखाच्या पहिल्या भागात आणि देवीची ओटी कशी भरावी ? ओटी भरण्याचे नेमके प्रयोजन काय ? प्रत्येक देवीची रूपे आणि त्यांना अर्पित केला जाणारा रंग ह्याबद्दलची माहिती लेखाच्या दुसऱ्या भागात मांडलेली आहे. ही माहिती मी स्वतः रचलेली नाही. ही माहिती मला एका जातक मित्राने पाठवलेली आहे.  


!!!श्री नवरात्र उत्सव कथा!!!
🚩🚩🚩🚩🕉🚩🚩🚩🚩

महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र !  नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते.

तिथी 

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी.
नवरात्री शनिवार १ ऑक्टोबर रोजी प्रारंभ होत आहे व विजयादशमी दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तो दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आहे.

नवरात्र व्रताचा इतिहास

१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

नवरात्र व्रताचे महत्त्व

१. जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.’ उपांग ललिता ’ ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.

२. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात  ” श्री दुर्गादेव्यै नम: । ” हा नामजप जास्तीतजास्त करावा.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रींत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्रं म्हटली जातात.

देवी कां प्रकट झाली? कशासाठी अनं कशी प्रकट झाली. ह्या बद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी :
पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होत. तो सर्वांनाच फार त्रास देत होता.तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली.त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नांव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवघरांत, मठ मंदिरात जी घटस्थापना केली जाते ती कशी ह्याच उत्तर असं :

दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात.ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजे प्रकाश. अन प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते. भक्ती केली जाते. उपासना केली जाते.नवरात्रातली ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात. कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते. रात्री मन शांत स्थिर असते. त्याची एकाग्रता तादात्म्य भाव लवकर साधतो. एकेका दिवसानं घटा खालच्या मातीत पेरलेल धान हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते – हळू हळू वाढू लागते. तेच त्या देवीच घटावरच दर्शन असत.

आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी. पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात.ह्या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख शांती अन समाधान लाभते.

नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात.

ह्या नवरात्र उत्सव काळांत देवळांतून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.ही शक्ती देवता देशभरांत अन वेगवेगळ्या भागांत विविध नावांनी ओळखली जाते. ह्या उत्सवाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.

मुलींना आवडणारा हादगा हा सुद्ध ह्याच दिवसांत करतात. मुली पाटावर   काढून त्याचे भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात.

नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. तसेच विविध मनोरंजनाचे स्पर्धा महिलांसाठी भरविल्या जातात. मुलां-मुलींसाठी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम राबविले जातात. शेवटच्या दिवशी देवीची फार मोठी मिरवणूक काढली जाते. शक्ती उपासनेचा हा नवरात्रीला उत्सव फार महत्त्वाचा आहे.

*नवरात्रीचे कलर*

०१/१०/२०१६   *ग्रे* 
०२/१०/२०१६   *ऑरेंज* 
०३/१०/२०१६   *सफेद*  
०४/१०/२०१६   *लाल* 
०५/१०/२०१६   *निळा* 
०६/१०/२०१६   *पिवळा* 
०७/१०/२०१६   *हिरवा* 
०८/१०/२०१६   *मोरपीसी* 
०९/१०/२०१६   *जांभळा* 
१०/१०/२०१६   *आकाशी* 
११/१०/२०१६   *गुलाबी*

तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या भगव्या शुभेच्छा

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

नवी दिशा - Career Guidance through Astrology

नवी दिशा - Career Guidance through Astrology 


गेल्या वर्षीच्या जूनमध्ये वंदना सावंत मॅडम मुलीच्या करिअर संदर्भात चर्चा करण्यासाठी आल्या होत्या. Bio-medical चे परदेशात उच्च शिक्षण घेण्याची त्यांच्या मुलीची म्हणजेच आरोहीची इच्छा होती. परंतु पुढे जाण्याअगोदर त्यांना पत्रिकेवरून सर्व नीट पार पडेल का ? आरोही परदेशी जाईल का ? Bio-medical चेच शिक्षण तिच्या Destiny आहे का ?  इ. प्रश्न जाणून घ्यायचे होते. 

वंदना मॅडमना पत्रिकेवरून आरोहीचा कल कुठे आहे त्याची कल्पना दिली. म्हणजे शिक्षण Bio-Medical चे होईल,करिअर सुद्धा त्याच क्षेत्रातील असेल परंतु कुठेतरी आरोही आर्टिस्ट वाटतेय,काहीतरी Creative आहे तिच्याकडे. आरोहीच्या कुंडलीवरून तिच्यातली कला स्पष्ट दिसत होती. ह्या माझ्या म्हणण्यावर वंदना मॅडमनी लगेचच दुजोरा दिला. आरोहीला गाण्याची अत्यंत आवड आहे आणि तिच्या गाण्याच्या परीक्षाही देऊन झाल्या आहेत. ( कुंडली वगैरे सगळे खोटे असते त्यांच्यासाठी - कुंडलीवरून मनुष्य स्वभाव,त्याचा पिंड,व्यक्ती किती झेप घेऊ शकते ह्याचा अंदाज नक्कीच बांधता येतो आणि त्याबद्दल भविष्य वर्तवता येते. परंतु कुंडली विवेचन करणाऱ्याचा तेवढा सखोल अभ्यास असावा. बरेच ज्योतिषी तर अगदी मृत्यूची तारीख सुद्धा अचूक सांगतात,काहींचा हातखंडा चेहेऱ्यावरून पत्रिका बनवण्यावर आहे आणि त्यावरून वर्तवलेले भविष्ये खरीही ठरली आहेत. कुंडली/ज्योतिष शास्त्र हे ढोंगी बाबांमुळेच जास्त बदनाम आहे. ज्यांना ओ का ठो काळात नाही ते रंगीबेरंगी माळा घालून आणि कपाळभर भस्म लावून गावभर भविष्य सांगतो म्हणून भटकत असतात. ह्या भोंदू लोकांना तर शिक्षा झालीच पाहिजे. गेल्याच महिन्यात सुप्रसिद्ध अशा मुंबईतल्या हॉस्पिटल मधून काही डॉक्टर्सना आणि CEO ला किडनी रॅकेट चालवल्याचे आरोप ठेवून अटक करण्यात आली. त्यांनी तो गुन्हा केला कि नाही ते लवकरच सिद्ध होईल परंतु त्यावेळी लोकांनी डॉक्टर्स वर आरोप केले कि Medical Science वर ??? ह्या सर्वांत Medical Science अजिबात बदनाम झाले नाही. मग काही भोंदू ज्योतिषांमुळे आपले ज्योतिष- शास्त्र लगेच कसं बदनाम होतं ? ह्यावर नक्की विचार करा. असो आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया.) 

तर आरोहीला गाण्याची आवाड आहे आणि मी तिला ही आवड जपण्यास सांगितले. पुढे अभ्यास वाढेल,वेळ मिळणार नाही कदाचित, परंतु गाणे अजिबात सोडू न देण्याचा सल्ला तिला दिला. आरोहीच्या पत्रिकेवरून तिचे गुण आणि दोष दोन्ही व्यवस्थितपणे आरोहीला आणि तिच्या आईला समजावले. तिच्यातले जे उपजत गुण आहेत त्यांना आपण कशा प्रकारे फुलवू शकतो आणि जे दोष आहेत त्यावर ती कशा प्रकारे मात करू शकते ह्यांवर भरपूर चर्चा केली. त्यांनंतर तिच्या आईचा प्रश्न होता - परदेशात शिकण्यासाठी बारावीत तिला ठरावीक टक्क्यांचा पाडाव पार करावा लागेल ? इच्छित टक्के मिळतील ना ? आणि प्रामुख्याने त्यांना कॅनडामधील प्रसिद्ध अशा "Waterloo" ह्या युनिव्हर्सिटीतच प्रवेश घेण्याची इच्छा होती. पत्रिकेचा सखोल अभ्यास करून प्रामुख्याने खालील गोष्टी सांगितल्या  -
१) आरोही Bio- Medical मध्येच शिक्षण घेईल.
२) परदेशातूनच तिचे उच्च शिक्षण दिसतेय. ह्या भविष्यावर मी त्यांना १००% गॅरंटी दिली होती.
३) त्यांनी तीन वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची नावे दिली होती त्यातील कुठल्या युनिव्हर्सिटीत तिला प्रवेश मिळेल ? ह्या प्रश्नावर मी पत्रिकेवरून कॅनडातील "Waterloo University"तच प्रवेश मिळेल आणि त्यासाठी लागणारा टक्क्यांचा निकष ती नक्की पूर्ण करेल, हे ठसवून सांगितले.
४) शिक्षणासाठी "Scholarship"ही मिळेल. त्यामुळे आर्थिकदृष्टया भार थोडा कमी होईल. 

त्यांना मार्ग मिळाला. त्यांवर काही उपाय आरोहीला आणि वंदना मॅडम करायला सांगितले. त्यांनी ते वर्षभर अगदी बारावीचा निकाल हातात येईपर्यंत न चुकता केले. बारावीच्या परीक्षेच्यावेळीही त्या दोघी माझ्या संपर्कात होत्या. निकाल लागण्याआधी परदेशातल्या युनिव्हर्सिटीच्या संपर्कात राहून तिच्या तिथल्या प्रवेशासाठी काही Formalities ची चौकशी सुरु होती. काहीं युनिव्हर्सिटीतून तुम्हाला scholarship मिळणार नाही वगैरे सांगितले. सतत धागधुग होती. शिक्षणासाठी कर्ज कुठून मिळेल ? कितीपत मिळेल ह्या सर्व गोष्टीत मायलेकी व्यस्त झाल्या. त्यांनी संबंधित संस्था पालथ्या घातल्या. ह्या सर्व काळात वंदना मॅडमचे सतत फोन येत होते. "काय होईल ? हवा तसा निकाल लागेल ना ? युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळेल ना ? Scholarship मिळेल ना ? " ह्या त्यांच्या प्रश्नांवर वरील वर्तवलेले भविष्य सतत सांगत होते. तरी त्यांना सतत चिंता असायची. आणि बारावीचा निकाल लागला. आरोहीला ९२.५ % मिळाले. दोघी खूप खुश होत्या. आता खरी कसोटी होती युनिव्हर्सिटीतल्या प्रवेशाची. पासपोर्ट आणि व्हिसासाठी धावपळ सुरु झाली. निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात लागला. "Waterloo University"ने आरोहीचा प्रवेश नक्की केला आणि आंनदीआनंद झाला. परंतु त्या "Scholarship" साठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. करताकरता जूनच्या पहिल्या आठवडयात आरोहीला "Scholarship" मिळाली परंतु पूर्ण स्कॉलरशिप नाही त्यामुळे बाकीच्या पैशांची व्यवस्था करावी लागणार होती. त्यात आरोहीचे २३ ऑगस्टचे तिकीट आले परंतु व्हिसा अजूनही हातात नव्हता. चांगल्या गोष्टींमागे किती अडचणी असू शकतात ते ह्या उदाहरणावरूनच समजून येते.
वंदना मॅडमचा मला १८ ऑगस्टला फोन -" आरोहीचे तिकीट २३ तारखेचे आहे परंतु व्हिसा आलेला नाही. काय करायचे ?" प्रश्नकुंडली अभ्यासून त्यांना सांगितले व्हिसा मंगळवारी २३ तारखेला मिळेल. "पण आरोहीचे २३ तारखेचेच तिकीट आहे. व्हिसा त्याआधी येईल ना ?" त्यावर मी काही म्हणाले नाही. त्यांना काही उपाय सांगितले आणि धीर धरण्यास सांगितले. एवढे सर्व करून व्हिसा नाही मिळाला तर सर्व गोष्टींवर पाणी फिरणार होते. २२ तारखेला सोमवारी सकाळी त्यांचा मेसेज आला - अजूनही आरोहीचा व्हिसा आलेला नाही. आम्ही आमच्याकडून visa office मध्ये विचारणा करतोय परंतु कोणी धड उत्तर देत नाही. काय करू ? त्यावर मी काहीच उत्तर दिले नाही. काही वेळेस काळच उत्तर देतो. त्याच रात्री १०.२० वाजता त्यांचा मेसेज आला - मॅडम आज व्हिसा dispatch झालाय बँगलोरवरून आणि उद्या सकाळी घरी येईल. थँक यु. म्हणजेच प्रश्नकुंडलीने दिलेले मंगळवारी व्हिसा मिळेल हे उत्तर अचूक होते. 

२३ ऑगस्टला रात्री ९.०० वाजताचे विमान होते. आरोही सुखरूप कॅनडाला पोहोचली. २ सप्टेंबरला तिच्या उच्च शिक्षणाची सुरवात झाली.ह्या त्यांच्या सर्व प्रवासात वंदना मॅडमनी मलाही नकळत सामील करून घेतले. जेंव्हा जेंव्हा त्यांनी प्रश्न विचारले तेंव्हा तेंव्हा ज्योतिषशात्राच्या मदतीने मी अचूक उत्तर देऊन त्यांना मार्गदर्शन केले. 

ह्या सर्व प्रवासाबद्दल वंदना मॅडम ह्यांनी मला भावपुर्ण असे ई -पत्र पाठवले आहे. ते इथे प्रसिद्ध करतेय. हा लेख सर्व पालकांना प्रेरणादायी ठरावा अशी आशा करते. 


Dear Anupriya,

With all your good wishes, guidance and blessings – Finally Arohi has reached Canada and her New Beginning of Career starts from 2nd September, 2016.

We would like to express our sincere gratitude for an excellent guidance to me and my daughter to take a right decision for selecting her career path. I really loved your style of making  understand  my daughter the quality within her, building a confidence in her and help her overcome the fear within her. Your predictions and simple remedies to overcome obstacles has helped Arohi to reach high in her academics.

Arohi is today in one of the top universities – University of Waterloo, Canada for Biomedical Science. I appreciate your Consultation Skills and Accuracy in Predictions.

I thank you for giving your valuable time at odd times of day to answer my queries and directing me to take right decision. We are blessed to meet you.


God bless you and your family. 


बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

नावांची गंमत

नावांची गंमत
काल पेपरचे बिल घ्यायला विशीचा एक तरुण आला. "नवीनच दिसतो आहेस. काय नाव तुझे ?" सगळी माहिती नेहेमी विचारावी आणि कोणावरही विश्वास ठेवू नये ह्या "सावधान इंडिया" ह्या मालिकेचा सूर पकडून त्याला नाव विचारले. तो म्हणाला,"परदीप". हा चुकून नाव असे सांगतोय हे समजून त्याला म्हणाले,"अरे प्रदीप ना ?" तेवढ्याच आत्मविश्वासाने त्याने सांगितले,"अहो नाही. माझे नाव परदीप आहे.". आणि पावतीवर चक्क "परदीप" अशी सही सुद्धा केली पठ्ठ्याने. आता काय बोलणार ? परदीप चा अर्थ काय विचारले तर काहीही उत्तरं येणार नाही हे माहित होते म्हणून धाडसचं केले नाही विचारायचे. इतका कसा अपभ्रंश होऊ शकतो ?  प्रदीप ह्या नावाचा किती सुंदर अर्थ आहे. प्रदीप म्हणजे दिवा/दिव्याचा प्रकाश. आणि हा पठ्ठ्या नावाची वाट लावतोय. परदीपचा अर्थ पर+दीप म्हणजेच परक्यांचा दीपक असा होतो. हास्यास्पद आहे. अर्थाविना नाव ठेवण्याची प्रथाच सुरु झाली आहे.

परवा एका लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका आलेली. वाचतांना आमंत्रिक म्हणून घरातल्या मूळ पुरुषाचे नाव लिहिलेले. नाव लिहिले होते - परषोत्तम. बहुदा चुकून नाव छापले गेले असे मी पुटपुटले. त्यावर त्यांचे म्हणणे ,"नाही. अहो आजोबांचे नाव परषोत्तमच आहे". "बरं" म्हणून मी विषय तिथेच थांबवला. ह्यांना अर्थ विचारण्यात अर्थच नाही हे समजून गेले. एवढे सुंदर नाव "पुरूषोत्तम" सर्व पुरुषांमध्ये उत्तम असा त्याचा अर्थ आणि आपण खुद्द भगवान राम ह्यांना पुरूषोत्तम म्हणून संभोधतो. अशा सुंदर नावाचा असा अपभ्रंश आणि तो ही इतक्या आत्मविश्वासाने सांगण्याचे आणि छापण्याचेही धाडस. काय म्हणावे ?

लोकांनी सुंदर नावांचा अगदी चुराडा केला आहे. माझ्या ताईच्या शाळेत एक मुलगी आहे. ती लक्षात राहण्याचे कारण तिचे नाव "उपेक्षा". "तुझे असे का बरं नाव ठेवले ?" असे विचारल्यावर तिचे अचंबित करणारे उत्तर - "माझ्या मोठ्या बहिणीचे नाव अपेक्षा आहे म्हणून माझे नाव आई-बाबांनी उपेक्षा ठेवले.अपेक्षा आणि उपेक्षा".  ह्या नावाचा अर्थ माहीत आहे का गं तुला ? असे विचारल्यावर  -काय माहित ? त्याने काय फरक पडणार आहे अशा अर्थाचे भाव तिच्या चेहेऱ्यावर होते. तिला सांगावेसे वाटले अगं तुझ्या नावाचा अर्थ एकदा तरी शब्दकोषात पहा. म्हणजे कळेल किती चुकीचे नाव ठेवलेय आई-वडिलांनी. बरं बऱ्याच वाचकांना उपेक्षाचा अर्थ माहीत नसेल त्यांच्यासाठी अर्थ इथे नमूद करतेय - उपेक्षा म्हणजे अवहेलना (neglect ). थोडक्यात आमच्या मुलीची अवहेलना/उपेक्षा. 

अजून एक गंमतीशीर नाव म्हणजे उल्का. उल्का नावाच्या दोन तरी मुली माझ्या पाहण्यात आहेत. आणि खरोखरीच त्यांचा स्वभावही खऱ्याखुऱ्या उल्के सारखाच आहे. दोघींना कधीही राग येऊ शकतो,दोघींचा पारा चढला की त्यांचे नवरे अगदी बिच्चारे होऊन जातात. उल्का हे नाव कसं काय एखाद्या मुलीचे असू शकेल ?

ताईने आताच एक नाव सांगितले - श्लेष्मा - अर्थ आहे शेंबूड - इंग्रजीत - Mucus. आणि हे एका मुलीचे नाव आहे. खरंच आश्चर्य आहे !!! लोकांनी नावे ठेवतांना एकदा त्याचा अर्थ तरी समजून घ्यावा नाहीतर किती अनर्थ होतो आहे पहा. 

आणि काही नावे अशी आहेत ज्यांचा त्यांच्या नावाशी काहीही संबंध नाही -

शौर्य - शौर्य नावाचे तीन जातक आहेत. तिघेही अत्यंत शांत आणि  केविलवाण्या चेहेऱ्याचे आहेत. शौर्याचा  "श" नाही आयुष्यात.

धैर्य - नावाचा अर्थ धीर धरणे. (patience ) परंतु त्या मुलांमध्ये अस्थिरता जास्त दिसते. धीर धरणे म्हणजे काय हे त्यांच्या गावीही नाही.

काही जातकांची नावे मला खूप भावली -


  • एका जातक मित्राचे नाव आहे - सुव्रत - सु + व्रत  = चांगले असे व्रत (विष्णूचे एक नाव ) विष्णू सहस्त्रनामावली वाचली असेल तर हे नाव त्यात आहे. 
  • एका जातकाचे नाव - ययाती - अर्थ = प्रवासी 
  • एका माझ्या जातकाचे नाव त्याच्या आईने ठेवले - दीपसण - दिवाळीच्या दिवसात जन्माला म्हणून दीपसण. किती सुंदर नाव.  
  • एका छोट्या अशा मुलीची पत्रिका आली होती भविष्य विवेचनासाठी तिचे नाव - जीविका अर्थ आहे पाण्याचा स्त्रोत /जीवन 
  • मित्राच्या मुलाचे नाव - अमानी - विष्णूचे नाव. विष्णू सहस्त्रनामावलीतील अजून एक नाव 
  • सुव्रतच्याच जुळ्या मुलींची नावे - समिधा - an offering for a sacred fire. आणि अर्चिता - अर्थ - जिची पूजा करावी.  (ही दोनही नावे विष्णूसहस्रनामावलीत आहेत )
  • एक वेगळे नाव - सनिशा - अर्थ अजूनतरी माहीत नाही.  
  • एका जातक मैत्रिणीच्या ओळखीत हे नाव आहे एका मुलीचे - बिल्व - अर्थ - बिल्वाचे फळं. वेगळे नाव ठेवण्याच्या स्पर्धेत आगळेवेगळे नाव. 
  • अजून एक नाव आले आहे suggestion बॉक्स मध्ये - शडवली -अर्थ आहे हिरवळ. एका मुलीचे नाव आहे. 
लेख प्रकाशित झाल्यानंतर बऱ्याच वाचकांनी नावे दिली आहेत. ती खालीलप्रमाणे -  
                              खंजन -अर्थ आहे - गालावरच्या खळ्या. 
                              
                              सुमुख -अर्थ आहे - सुंदर मुख असलेला. 
           
                              आरा - अर्थ आहे - प्रकाश आणणारा (Light Bringer)
                       
                              केया - अर्थ आहे - गोड (sweet)
                       
                              तादात्म्य - अर्थ आहे - ओळख (Identity)अत्यंत वेगळे नाव आहे हे. 

                                          
एक एका नावांची लाट येते प्रत्येक वर्षी. २०१० साली शौर्य  नावाची लाट होती. २०११ साली अर्णव. २०१२ साली सर्व अर्जुनच अर्जुन. २०१३ साली जन्मलेल्या बहुतांश मुलींची नावे "ओवी" 


अशी ही नावांची गंमत. तुमच्याही ओळखीत अशी नावे असतील. आहेत ? मग कळवा बरे मला. 


मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

मला मुलगाच हवा - वंशाचा दिवा

मला मुलगाच हवा - वंशाचा दिवा




 काल निशाचा खूप वर्षांनी फोन आला. २००६ साली नोकरी कधीही मिळणार ताई ? हे विचारणारी निशा २००८ ला लग्नाचे योग कधी हे विचारायला आली. त्यानंतर तिचा काल फोन आला. काय म्हणतेस ? कशी आहेस सगळे औपचारिक सवांद झाल्यांनतर निशा मूळ मुद्द्यावर आली. "ताई माझी पत्रिका असेल ना तुमच्याकडे ? मागे मी लग्नाचे विचारायला आले होते. "
 "आहे गं पत्रिका माझ्याकडे. बोल काय प्रश्न आहेत ?"
" ताई आम्ही ना दुसऱ्या बाळाचा विचार करतोय. कधी योग आहेत ते सांगू शकाल का ?"
"हो अगं, सांगते मी. उद्या फोन कर मला."
"आणि ताई....... "
मी विचारले "काय गं ?"
आणि तिचा मला अपेक्षित असणारा प्रश्न आला. "ताई मला ना पहिली मुलगी आहे."
"मग ?" माझा तिरकस प्रश्न.
"ह्या वेळेस मला मुलगा होईल का ? जरा सांगा ना"
हा प्रश्न ऐकून इतका राग आला पण रागावर ताबा ठेवून मी तिला शांतपणे सांगितले,"हे बघ निशा. मी तुझ्या पत्रिकेवरून तुला आता बाळ होईल का आणि ते बाळ सुदृढ असेल ना एवढे सांगू शकेन. मुलगाच होईल हे मी सांगणार नाही."
त्यावर तिचा हतबल प्रश्न," ताई तेवढं जरा बघा नां होईल का मुलगा ते ? "
पुन्हा एकदा तेच सांगून फोन ठेवून दिला मी. मुलगाच होईल का ? हा प्रश्न मला नेहेमीच विचारला जातो. अगदी मुलगा होण्यासाठी काय उपाय करता येतील का तुमच्या शास्त्राप्रमाणे ? हे सुद्धा विचारले जाते. हे ऐकून खरंच कीव करावीशी वाटते.

माझे काही जातक हे अमेरिका, सिंगापूर,कोरिया,लंडन,जर्मनी इ. ठिकाणाहून आहेत. ते जेंव्हा बाळाचे गर्भाशयातील बाळाचे लिंग परीक्षण करून घेतात तेंव्हा आश्चर्य वाटते. काही जातकांनी मुलीचा गर्भ आहे हे कळल्यावर गर्भपात करून घेतला आहे. 

काही केसेस मध्ये तर मी हे ही पहिले आहे की सुनेला मुलगी झाली म्हणून सुतकी चेहऱ्याने सासूबाई बातमी सांगताहेत. इतकं सुतकी वातावरण की पेढे -बर्फी काहीही वाटण्याची गरज त्यांना वाटत नाही. एका केस मध्ये तर माझ्या जातक मैत्रिणीला ८ वर्ष बाळं होत नव्हतं. आठ वर्षांनी IVF पद्धतीने तिला जुळ्या मुली झाल्या. सासूबाई आणि नवऱ्याने तिला हॉस्पिटलमध्येच सुनावले की आता घरी यायची गरज नाही. सहा-सात महिन्यांनी नवऱ्याने तिला घरी आणले. परंतु सहा सात महिने त्या मुली बाबांच्या आणि आजी-आजोबांच्या प्रेमापासून वंचित राहिल्या. मुलींचा आणि त्यांच्या आईचा असा काय गुन्हा झाला की सासरच्यांकडून ही वागणूक मिळावी ? हे सगळं ऐकलं की खरंच मन सुन्न होतं. कुठल्या शतकात आहोत आपण ? उच्च शिक्षण घेऊन परदेशात उच्च पदावर काम करणाऱ्या लोकांचेही हेच विचार आहेत अजून ? मग काय उपयोग आहे शिक्षणाचा ? ह्या सगळ्याचा विचार करता आपल्या भारतीय समाजव्यवस्थेकडे मन येऊन पोहोचते.    

सुरवातीला आपल्या समाजव्यवस्थेने काही नियम घालून दिले होते. म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा कारण मुलगा लग्न झाले तरी आडनाव बदलत नाही,घराणे बदलत नाही. आई - वडिलांकडेच राहतो. मुलगी तर लग्न होऊन जाते सासरी मग आम्हांला कोण बघणार ?? ह्या सर्व गोष्टी सांगून सुनेवर नाहीतर स्वतःच्या मुलीवर तुला मुलगाच झाला पाहिजे हे दडपण लादले जात असे. 

परंतु आजही २०१६ ला जेंव्हा मला असे फोन येतात तेंव्हा खूप चीड येते. आज माझ्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत ज्या कुटुंबातील मुलगा परदेशात वास्तव्य करून आहे आणि मुलगी सासरी नांदत असली तरी आई -वडिलांची काळजी घेतेय.

काळ बदला आहे. काळाप्रमाणे आपणही बदलायला हवे. जो हा बदल जाणीवपूर्वक आपल्या जीवनात आणत नाही तो संपलाच. ह्याचे अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर सध्या रिक्षा आणि टॅक्सीवाले संप पुकारणार आहेत ? का तर म्हणे उबर आणि ओला ह्यांनी आमच्या धंद्यात घसरण आणली. प्रत्यक्षात रिक्षावाल्यांची अरेरावी आणि काळाबरोबर न बदलण्याच्या वृत्तीमुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे. आपल्या शास्त्रातही हे नमूद केलेय काळाप्रमाणे बदल करणं गरजेचे आहे. काळाप्रमाणे जो बदलतो त्याच्या जीवनाची प्रगती झालीच म्हणून समजा. 

हेच सांगणे आहे माझे ह्या काळातल्या होणाऱ्या भावी पिढीला. मुलगाच हवा हा हट्ट सोडून द्या. का बरं मुलाचाच हट्ट धरून बसलात ? मुली कुठे कमी पडताहेत ? गेल्या कित्येक वर्षांचे बोर्डाचे निकाल बघा. प्रत्येक निकालांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. आज सगळ्या क्षेत्रात मुली आहेत. आणि नुसत्याच त्या क्षेत्रात नाहीयेत तर आपल्या कर्तबगारीने अव्वल दर्जावर आहेत. मग मुलगी का नको ? का मुलगाच हवा आहे ?  संगोपन करतांनाच मुलगा म्हणून फार लाड  आणि मुलगी दुसऱ्याच्या घरचे धन म्हणून हिणवू नका. ही मुलींची कामे आहेत ही मुलांनी करायची नाहीत हे शिकवणही देऊ नका. अजून आपल्या भारतात मुख्यत्त्वे गुजरात,राजस्थान,हरियाणा, उत्तरप्रदेश ह्या ठिकाणी बायकांना अक्कल नसते,बायकांना नेहेमी आपल्या धाकात ठेवावे,बायकांना शिक्षणाची गरज काय ? अशा प्रकारांची विचारसरणी अजूनही आहे. ती येत्या काळात बदलेलच. तुमचं काय ?  आत्तापासूनच संगोपनात बदल घडवून आणाल तर ह्या पिढीत तरी आपल्याला जुनाट विचारसरणीचा अंत झालेला दिसेल. मुलींचे संगोपन कुठल्याही बुरसटलेल्या विचारसरणीने करू नका. तिला फुलू दे,वाढू दे, बहरू दे कारण तीच तुमच्या पुढच्या पिढीला जन्म देणार आहे. तिचं अस्तित्व वाचवा हीच माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना.  

काळाला बदलण्याची ताकद स्त्रीमध्येच आहे. 


बघा खालील चित्रांवरून काही समजतंय का ? 
सितार वादक अनुष्का 


शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

गुरुचे कन्या राशीतील भ्रमण

गुरुचे कन्या राशीतील भ्रमण  

गुरुचे सिंह राशीतील पर्व संपून गुरूने कन्या राशीत प्रवेश केला. प्रत्येक राशीला त्याची काय काय फळे मिळतील वाचा बरे - 


मेष राशी - 


  • नोकरी - नोकरीत पदोन्नतीची शक्यता. नोकरीच्या निमित्ताने परदेश प्रवास होणार आहेत.  
  • तब्येत - लिव्हर/ pancreas ह्या संदर्भात ऑपरेशन होण्याचे योग आहेत. त्यामुळे पोटदुखीकडे कानाडोळा करू नका. 
  • घ्यायची काळजी - सध्या छोट्या छोट्या गोष्टींवरूनही वादावादी होऊ शकते आणि त्यामुळे नात्यात गैरसमज होऊ शकतात. ह्या संपूर्ण काळात रागावर नियंत्रण ठेवणे. 


वृषभ राशी -


  • नोकरी - सध्या तुम्हाला त्याच त्याच कामाचा कंटाळा आलेला आहे. नोकरीत बदल हवा आहे. स्वतःचा व्यवसाय करण्याचे वारे डोक्यात फिरू लागतील. 
  • घर / गाडी - घरात इंटिरियर बदलून घ्याल. घरात सजावटीच्या महागड्या वस्तू घेण्याचे योग. गाडी घेण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. 
  • मुले - गुरु पंचमातून भ्रमण करणार आहे आणि लाभावर दृष्टी आहे. सर्व प्रकारचे लाभ होणारच आहेत त्याचबरोबर जी जोडपी मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभदायी ठरेल. 
  • तब्येत - High B. P., डायबेटीसचा त्रास आहे. वजन वाढू शकते. खाण्यावर नियंत्रण ठेवणे.   
  • घ्याची काळजी - व्यवसाय करण्याची रिस्क सांभाळून घेणे. विचारपूर्वक निर्णय घेणे. पती/पत्नी बरोबर वादविवाद विकोपाला जाऊ शकतात. 


मिथुन राशी - 


  • नोकरी -  नोकरीत कामात वाढ होणार आहे. स्वतःच्या कामांबरोबरच दुसऱ्या कर्मचाऱयांचीही कामे करावी लागतील आणि त्याचाच ताण वाढेल. 
  • घर - नवीन घर घेण्याचे योग आहेत. 
  • तब्येत - तब्येतीची काळजी घेणे. जुनी दुखणी पुन्हा डोके वर काढतील. 
  • प्रवास - ह्या वर्षात धार्मिक स्थळांना भेट द्याल.
  • घ्यायची काळजी - प्रवासात तब्येतीची काळजी घेणे. 


कर्क राशी - 


  •  कर्क राशीसाठी धनप्राप्तीची योग खूपच चांगले आहेत. पगारात वाढ संभवते किंवा स्वतःचे घर भाड्याने दिले असेल तर भाडेवाढ कराल. fast money चे वेड लागेल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवाल.  
  • नोकरी - नोकरीच्या निमिताने लांबचे प्रवास कराल. कामात वाढ होईल आणि जवाबदारीची कामे यशस्विरीत्या पूर्ण कराल आणि वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. 
  • तब्येत - अतिरिक्त चरबी रोगाच्या आमंत्रणास कारणीभूत ठरावी त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे. 
  • घ्यायची काळजी - वजनावर नियंत्रण ठेवणे. 


सिंह राशी - 


  •  कुटुंबस्थानातून होणारे गुरुचे भ्रमण कुटुंबात होणाऱ्या वाढीचीच ग्वाही आहे. कुटुंबात विवाह सोहळा लवकरच साजरा होईल. धनप्राप्तीचेही चांगले योग आहेत.  
  • नोकरी - नोकरीत पदोन्नती होईल. कामाचा ध्यास राहील
  • घर - नवीन घराची गुंतवणूक लवकरच कराल. 
  • तब्येत - हात आणि पाय दुखण्याच्या तक्रारी वाढतील. कॅल्शिअमयुक्त आहार घेणे. रक्तासंदर्भातील अंगावर पुरळ उठणे अशा जुन्या रोगांचे पुन्हा त्रास संभवतात.  
  • घ्यायची काळजी - खर्चावर नियंत्रण ठेवणे. 


कन्या राशी - 


  •  गुरुचे तुमच्या राशीतून होणारे भ्रमण हे लाभदायी ठरेल. 
  • नोकरी - नोकरीत नवीन पद्धतीनेही काम होऊ शकते हा तुमचा ह्या वर्षी प्रयत्न राहील. परदेशवारीही घडेल. 
  • घर - घर बदलाचे योग आहेत. नवीन जागेत रहायला जाण्याचे योग आहेत. 
  • तब्येत - वजन तर वाढणारच आहे परंतु खांदे आणि मानदुखी होणार तेंव्हा काळजी घेणे कारण ऑपरेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
  • घ्यायची काळजी - मणक्यावर ताण येणार नाही ह्याची काळजी घेणे. 


तुळ राशी - 


  • नोकरी - नोकरी/व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात काही काळ वास्तव्य होणार आहे. पदोन्नतीबरोबरच वरिष्ठांची खास मर्जी तुमच्यावर राहील. 
  • घर - वडिलोपार्जित जागा विकली जाऊन त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमचे घर लवकरच redevelopment ला जाईल. 
  • तब्येत - पोटाची काळजी घेणे. हॉस्पिटलमध्ये काही दिवस राहावे लागू शकते. 
  • घ्यायची काळजी - तब्येतीच्या बाबतीत खर्च वाढणार आहेत त्यामुळे वायफळ खर्च टाळावेत.   


वृश्चिक राशी - 


  • गुरुचे कन्येतील भ्रमण हे वृश्चिकेसाठी राजयोगकारक ठरेल. धनप्राप्तीच्या दृष्टीने भाग्योदयकारक योग आहेत. 
  • नोकरी - मनपसंत काम करण्याची संधी नोकरीत मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम संधी चालून येतील. 
  • तब्येत - डोकेदुखी,पित्त ह्या गोष्टी उद्भवतील. पाणी पिण्याचे प्रमाण ठेवावे. 
  • घ्यायची काळजी - काळजी घेण्यासारखे काहीच नाही परंतु पित्त खवळू देऊ नये. 


धनु राशी - 


  • जर तुम्ही बांधकाम व्यवसायात किंवा राजकारणात असाल तर गुरुचे हे भ्रमण तुम्हाला भाग्योदयकारकच ठरेल. 
  • नोकरी - नोकरी/व्यवसायात कामे वाढतील. अडलेली कामे मार्गी लागतील. 
  • तब्येत - तब्येतीच्या बाबतीत डोळ्यांची काळजी घेणे. डोळ्यांचे ऑपरेशन होऊ शकते. 
  • घ्यायची काळजी - शाब्दिक चकमकी नोकरीच्या ठिकाणी टाळा. 


मकर राशी - 


  • नोकरी - नोकरीत वरिष्ठांचा राग सांभाळावा लागेल.अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देता देता नाकी नऊ येतील. एकूणच काळ चांगला नाही. 
  • तब्येत - पाठीच्या कण्याचा त्रास आहे. 
  • घ्यायची काळजी - ताकही फुंकून प्यावे असे योग आहेत सध्या. परिस्थितीचा आढावा घेऊन स्वतःचे मत मांडावे. 


कुंभ राशी - 


  • नोकरी -   चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार मिळणार नाही. आळस झटकून कामाला लागा. परीक्षेचा काळ आहे. 
  • तब्येत - तब्येतीच्या बाबतीत हृदयासंदर्भात त्रास दिसतोय. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे. ज्यांना आधीच हा त्रास आहे त्यांचे अँजिओप्लास्टी किंवा ह्याच सारखे ऑपेरेशन दिसतेय. 
  • घ्यायची काळजी - घरी अस्थिर वातावरण निर्माण होईल. गैरसमज दूर करण्यात वेळ घालवावा लागेल. 


मीन राशी - 


  • नोकरी -   शत्रूवर मात करण्याचे योग आहेत. नोकरी संदर्भात परदेशभ्रमण आहेच परंतु त्याच बरोबर नवीन गोष्टी शिकून घेण्याचा काळ आहे. 
  • तब्येत - पाठीचे दुखणे उद्भवू शकते. 
  • घ्यायची काळजी - कोणावरही विश्वास ठेवू नका.  


READERS ALL OVER THE WORLD