शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

मुहूर्तशास्त्र आणि कमला मिल घटना


मुहूर्तशास्त्र आणि कमला मिल घटना 
Kamala Mill Compund caught Fire


नमस्कार,

आज झालेल्या कमला मिल कंपाऊंड घटनेमुळे वाईट वाटले. मध्यरात्री लागलेल्या ह्या आगीत संपूर्ण हॉटेल जाळून खाक झाले. १४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात १२ महिला आणि २ पुरुष ह्यांचा समावेश होता. आग कशामुळे लागली ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हॉटेलमध्ये होत असलेल्या हुक्का पार्टीमुळे आग लागली असल्याची शंका वर्तवली जात आहे. कारण काहीही असले तरी झालेले नुकसान आणि जीवितहानी भरून येण्यासारखी नाही.  एक ज्योतिषशास्त्री आणि वास्तूतज्ञ् म्हणून ह्या घटनेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यासाठी हा लेख -

बातमी कळल्यापासून त्या हॉटेलच्या वास्तूचा आकार आणि प्रश्नकुंडली ह्याचे विवेचन सुरु होते. ह्यात काही गोष्टी लक्षात आल्या त्या तुमच्यासमोर मांडत आहे. 

वास्तू निरीक्षण - १) प्रत्यक्ष वास्तूला भेट देणे शक्य नसल्याने गूगल मॅपवरून हे हॉटेल शोधले आणि त्याचा आढावा घेतला. मॅपवरून लक्षात येईल एक तर ही वास्तू विदिशा आहे. बिल्डिंग संपूर्णपणे तिरपी आहे. म्हणजेच सर्व दिशा काटकोनात गेल्या. 

२) ओपन रूफ हॉटेल आहे. बिल्डिंगच्या पूर्व आणि आग्नेय (अग्नि देवता )दिशेला हे हॉटेल आहे. सूर्य मावळेपर्यंत सूर्याच्या किरणांचा मारा होत असणार जे शारीरिकदृष्ट्या हानिकारक आहे. 

घटना कळल्यानंतर ही घटना का घडली ह्याचा विचार करतांना हॉटेल ज्या दिवशी सुरु झाले (मुहूर्त )त्या दिवसाची कुंडली मांडली. ती कुंडली इथे देत आहे - 



१)  मंगळ आणि शनि ह्या ग्रहांचे योग हे नेहेमीच स्फोटक ठरतात. ह्या कुंडलीत म्हणजेच मुहूर्ताच्या दिवशी शनि आणि मंगळाचा षडाष्टक योग होत आहे. 
२) कुंडलीचे वृश्चिक लग्न असून लग्न २६ अंशावर आहे. ह्या अंशाच्या सर्वात जवळ शनि २८ अंश आहे. 
३) शनिपासून आणि लग्न स्थानापासून अष्टमात मंगळ आहे. मंगळाचे अंशही २७ आहेत. हा योगायोग चांगला नाही. 
४) अष्टमेश बुध अष्टम स्थानातच आहे. 

ह्या सर्व योगावरून असे वाटते की आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या "मुहूर्त शास्त्राला " अर्थ आहे. ज्या दिवशी आणि वेळेला आपण काही गोष्टी सुरु करतो ती वेळ,दिवस महत्त्वाचे ठरतात. नाहीतर हल्ली मुहूर्त पाळलाच जात नाही. अगदी लग्न लागतांना सुद्धा मुहूर्त लक्षात घेत नाहीत. अगदी काटेकोरपणे मुहूर्त मानणारे तुम्ही नसाल पण हे लक्षात घ्या लग्न लागतांना हल्ली लोक अवास्तव गोष्टींनाच जास्त महत्त्व देतात. मुलीकडच्या लोकांची धावपळ तर विचारायलाच नको. - फोटोसेशन,हेयरस्टाईल आणि मेकअप ह्या गोष्टींचे इतके कौतुक असते की वेळेवर ह्या गोष्टी आटपून मुहूर्त साधणारे अगदी कमी. जर मुहूर्त साधायचाच नसेल तर गुरुजींकडून मुहूर्त काढून घेण्याचा प्रपंचच कशाला ? तुम्हांला जी वेळ योग्य वाटते ती वेळ ठरवा.  

मुहूर्त शास्त्रात मुहूर्त जेंव्हा ठरवून दिला जातो किंवा सांगितला जातो तेंव्हा सर्व गोष्टींचा विचार केला जातो. पंचांगाचा विचार आलाच परंतु आपल्या कुंडलीप्रमाणे ही वेळ योग्य आहे का हे सखोल तपासून सांगितले जाते. त्यामुळे मुहूर्त हा विचारात घेतला पाहिजे. जेंव्हा आपण मुहूर्त काढून पूजा करतो त्या दिवशी आपण सर्व नकारत्मक गोष्टींचे उच्चाटन करून  सकारात्मक ऊर्जांना आपल्याला मदत करण्यासाठी आवाहन करतो. पाश्चत्य संस्कृतीचे कौतुक असणाऱ्या लोकांसाठी - We Invite all Positive Energy to our Workplace on Specific Day. फक्त ह्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत एक शुभ दिवस ठरवूंन दिला जातो. 

आता तुम्ही म्हणाला अशा प्रकारची हॉटेल्स भरपूर आहेत त्यांना नाही आगीने होरपळले. हो मान्य. अगदी शतप्रतिशत मान्य. ह्याला कारण वास्तूप्रमाणे मालकाची कुंडलीही अशा घटनेत महत्त्वाची ठरते. त्याच्या कुंडलीत जर ग्रहयोग आता चांगले नसतील तर त्याला अशा घटनांचा सामना करावा लागतो. आणि असे योग कुंडलीत आहेत असे समजल्यानंतर त्याने हॉटेल सुरु करू नये असे आपले शास्त्र सांगत नाही. शास्त्राचा खरा उपयोग तर इथेच होतो. असे काही घडणार असे कुंडलीत असेल तर ती घटना घडू नये म्हणून काळजी घेता येईल. मुहूर्तबद्दल मी वर सांगितलेच आहे त्याच बरोबर हॉटेल बांधतांना त्याने विशेष काळजी घायला हवी. हॉटेलमध्ये येण्यासाठी असणाऱ्या वाटेत फार अडथळा नसावा, रस्ता फार चिंचोळा नसेल ह्याची काळजी घ्यावी. ह्या जागेवर शक्यतो  fire resistant materials चा जास्तीत जास्त वापर करावा. आग लागल्यास ती आटोक्यात येण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी लवकर उपलब्ध होतील अशी व्यवस्था असावी. लोकांना लगेच बाहेर पडता येईल अशी दाराची रचना असावी. खरंतर अशा गोष्टींची काळजी सर्व हॉटेल्सने घेतलीच पाहिजे. परंतु आपल्याकडे घटना घडल्यावर जागृत होणे आहे. घटना घडण्याआधी जर काळजी घेतली तर त्याचा फायदा. 

ही काळजी जर हॉटेलच्या मालकांनी घेतली असती तर घटना टाळता आलीच असती आणि नाहक १४ बळी गेले नसते. 

बघा बरं विचार करून !!!

बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

वक्री बुध - धनु राशीतील

वक्री बुध - धनु राशीतील 






सध्या बुध वक्री आहे. एखादा ग्रह वक्री असणे म्हणजे काहीतरी भयंकर घडणार हा जनमानसातील समज. ग्रह वक्री होतो म्हणजे नक्की काय हेच मुळात कोणाला माहीत नाही. ग्रह वक्री होणे म्हणजे काय ते आधी समजून घ्या. समजा आपण एका चालत्या कारमध्ये आहात. तुमच्या पुढे एक कार आहे. काही वेळाने जेंव्हा तुमची कार आणि दुसरी कार समांतर( Parallel ) असतील तेंव्हा तुम्हांला दोन्ही गाड्या एकाच ठिकाणी थांबल्याचा भास होईल. जेंव्हा दुसऱ्या कारचा वेग कमी होईल तेंव्हा ती कार मागे जात आहे असा आपल्याला भास होईल बरोबर ??  खरंतर कार मागे जातच नसते, आपल्याला वेगातील फरकामुळे हा भास होतो. तत्प्रमाणेच ग्रहांचे आहे. आपण पृथ्वीवर आहोत. पृथ्वीची एक ठरावीक गती आहे. बाकी सर्व ग्रहांना सुद्धा त्यांची गती आहे. जेंव्हा एखाद्या ग्रहाची गती कमी होते तेंव्हा पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला तो ठराविक ग्रह मागे जात आहे की काय असे भासते त्यालाच ग्रह वक्री होणे म्हटले जाते. ग्रह वक्री स्थितीतून जेंव्हा मार्गी होतात तेंव्हा स्तंभी होतात असे म्हटले जाते. वरच्या उदाहरणात मी दोन्ही गाड्या जेंव्हा एकाच वेगाने (समांतर )जात असतील तेंव्हा एकाच ठिकाणी थांबल्यासारखे वाटते असे सांगितले आहे. तशीच अवस्था ग्रहाची होते त्याला ग्रह स्तंभी होणे म्हटले जाते.

प्रत्येक ग्रहाच्या कारकत्वाबद्दल मी मागील बऱ्याच लेखात सांगितले आहे. प्रत्येक ग्रह जेंव्हा वक्री होतो तेंव्हा  त्याच्या संदर्भातील गोष्टींवर परिणाम होतो. जसे शनि जेंव्हा वक्री होतो तेंव्हा लोखंड,बांधकाम,तेल -खनिजे इ.वर होतो. वैयक्तिक कुंडलीवरही त्याचा परिणाम जाणवतो. मंगळ वक्री होतो तेंव्हा रसायने,घातपात,रक्तपात,युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होणे इ. गोष्टी घडू शकतात. वैयक्तिक कुंडलीवर जाणवणारा परिणाम वेगळ्या प्रकारचा असू शकतो. अर्थात ह्या बाबतीत भविष्य वर्तवतांना ज्योतिषचे स्वतःचे निरीक्षण,मनन आणि चिंतन हे असतेच.


ग्रह वक्री असण्याने भौगोलिक,सामाजिक,राजकीय परिणाम होतच असतो. त्याचप्रमाणे तुमच्या कुंडलीत तो ठराविक ग्रह गोचरीने कुठे असणार आहे ? तो कुठच्या स्थानांचा अधिपती होतो हे भविष्य वर्तवितांना महत्त्वाचे ठरते.


आता ३ डिसेंबर रोजी बुध ग्रह वक्री झाला आहे. तो वक्री अवस्थेत २२ डिसेंबरपर्यंत असणार आहे. २० डिसेंबर  ते २२ डिसेंबर तो स्तंभी असणार आहे. ह्या काळात तुम्ही कुठली काळजी घ्यायची ते पाहूया. त्याआधी बुधाचा ज्या गोष्टींशी संबंध येतो ते समजून घेऊ.


बुध म्हणजे बुद्धी. 'बुधग्रह आहे ज्यासी नीट, तत्यासी सर्व मार्ग सुचती सुभट' अशी बुधाबद्दल उक्ती आहे. बुद्धी सर्वांना ईश्वराने सारखीच दिलेली आहे. परंतु Common Sense सर्वांकडे असतोच असे नाही. हा Common Sense म्हणजेच सद्सदविवेकबुद्धी असणे म्हणजे पत्रिकेत बुध चांगल्या स्थितीत आहे असे समजावे. बुध म्हणजे समरणशक्ती. बुध म्हणजे सवांद,संभाषण(Communication ),प्रवास- Transportation, Travelling, कागदपत्रे इ. बुध म्हणजे duality -द्विस्वभावत्व. जेंव्हा बुध वक्री होतो तेंव्हा ह्या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. सवांद साधण्यासाठी आपण जी उपकरणे वापरतो अचानक त्यात काही दोष उत्पन्न होतात. तुमच्या बोलण्याचा समोरची व्यक्ति दुसरा अर्थ घेऊ शकते. किंवा तुम्हांला योग्य पद्धतीने तुमचा मुद्दा मांडता न आल्याने गैरसमज वाढीस लागतो. त्याप्रमाणे मोबाईल, फोन, कॉम्पुटर इ. मग ह्यांच्या दुरुस्तीसाठी धावाधाव सुरु होते. कारण मोबाईल, कॉम्पुटर हे सुद्धा ह्या शतकातील सवांदाची साधने आहेत. बुधाच्या वक्री असण्याचा परिणाम दळवळणावरही होतो. प्रवासात अत्यंत अडचणी येतात. प्रवासात रस्ता चुकण्याचीही शक्यता असते. पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावरून फिरणे होते. ह्यालाच आपण चकवा लागणे असे म्हणतो. बुध म्हणजे महत्त्वाची कागदपत्रेसुद्धा. त्यामुळे ह्याच काळात कागदपत्रे हरवणे,चेकबुक गहाळ होणे,प्रवासात महत्त्वाची फाईल विसरणे असे घडू शकते. वक्री बुधाचा काय परिणाम होऊ शकतो तो आपण पाहिला. आता ह्याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होतो ते समजून घ्या - :


मेष - महत्त्वाची कागदपत्रे जपणे. काही कारणास्तव ती कागदपत्रे कोणाला दिलेली असल्यास वेळेत ती न विसरता मागून घेणे. आपल्याला सध्याच्या काळात प्रवासाचे योग आहेत. तेंव्हा प्रवासात आपले ओळखपत्र, आपले सामान गहाळ होणार नाही ह्यांवर लक्ष देणे.


वृषभ - तुम्ही सध्या तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवलेला बरा. तुमच्या बोलण्याने तुम्ही कोणाला दुखावू शकता आणि तुमच्याबद्दल गैरसमज वाढेल. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. तेंव्हा काळजी घ्या.


मिथुन - तुमच्यासाठी हा काळ विशेष काळजी करण्यासारखा जरी नसला तरी कोणाला असे कुठलेही आश्वासन देऊ नका जे आश्वासन पूर्ण करणे तुम्हांला शक्य होणार नाही.


कर्क - कुठल्याही कागदपत्रावर सही करतांना ते काळजीपूर्वक वाचा. त्यात काही गोष्टी आक्षेपजनक आढळल्यास शांतपणे त्याची चर्चा करा आणि मगच सही करा. कुठलाही मुद्दा पटला नसल्यास सही करू नये.


सिंह - तुमच्यासाठीही हा काळ विशेष काळजी करण्यासारखा नाही.


कन्या - सध्या प्रॉपर्टीसंदर्भात काही व्यवहार होत असल्यास तुम्हांला फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु व्यवहार शक्यतो २२ डिसेंबरनंतर करावा.


तुळ - नोकरीच्यानिमित्ताने लांबचे प्रवास होणार आहेत. प्रवासाला निघतांना आणि प्रवास करतांना काळजी घेणे. कागदपत्रे,मोबाईल,लॅपटॉप इ. सामानाबाबत जागरूक रहाणे. अनोळखी व्यक्तिच्या हाती ह्या गोष्टी न दिलेल्या बऱ्या. तुमचा व्यवसाय Travelling शी निगडीत असल्यास एखाद्या प्रवाशाला झालेल्या त्रासामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. पत्र लिहितांना मुद्द्यांवर लक्ष द्या.


वृश्चिक - आपल्या कोर्टकेसेस काही सुरु असतील तर त्यात काही कारणामुळे विलंब होण्याची शक्यता आहे किंवा काही तांत्रिक अडचणी उद्भवतील. तेंव्हा आधीच मानसिक तयारी ठेवणे. वडिलोपार्जित इस्टेटीसंदर्भात काही व्यवहार सुरु असतील तर अडचणी येऊ शकतील.


धनु - तुमच्याच राशीत बुध ग्रहाचे आगमन झालेले आहे आणि वक्री अवस्थासुद्धा तुमच्या राशीतच असणार आहे. जोडीदाराबरोबर सतत खटके उडणार आहेत. तुमच्यातील गैरसमज वाढीस लागणार आहे. तेंव्हा काही गोष्टींची चर्चा जोडीदाराबरोबर शांतपणे करा. हीच गोष्ट व्यावसायिक भागीदाराबरोबरही लागू होते.


मकर - घरापासून काही काळ लांब राहण्याचा काळ असू शकेल. तुमच्या तुटक बोलण्याने किंवा वागण्याने वरिष्ठांची मर्जी गमावून बसाल. तेंव्हा बोलण्यात आणि वागण्यात काळजी घ्या.


कुंभ - मुलांच्या तब्येतीच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. २२ डिसेंबरनंतर तुम्ही धार्मिक स्थळांना भेटी देणार आहात. परंतु त्याआधी होणाऱ्या प्रवासाची व्यवस्थित माहिती घ्या.


मीन - प्रॉपर्टीसंदर्भात,आईच्या तब्येतीसंदर्भात तुमची धावपळ होणार आहे.


बुध वक्री असतांना सर्वसाधारणपणे सर्वांनीच अशी काळजी घ्यावी - :


१) शक्यतो कुठलेही Agreementवर  ह्याकाळात सही करू नये. सही करणे भागच असेल तर व्यवस्थित Agreementचे मुद्दे समजून घ्या. घाई करू नका.


२) कुठलेही महत्त्वाचे निर्णय ह्या काळात घेऊ नयेत किंवा नवीन व्यवसाय सुरु करू नये.


३) प्रत्येक गोष्टीसाठी विलंब आणि आव्हाने गृहीतच धरून चालणे. हे सर्व सांगण्याचा प्रपंच म्हणजे तुम्हांला घाबरवणे नसून तुम्ही अशा गोष्टींसाठी मानसिकरित्या खंबीर राहून तांत्रिक गोष्टीत सतर्कता बाळगा असा आहे.


४) शक्यतो आपला मोबाईल आणि कॉम्पुटरचा पासवर्ड,पिनकोड,पॅनकार्ड,आधारकार्ड,इनकमटॅक्स पेपर्स ह्या सर्व गोष्टी हाताळतांना आणि काम झाल्यावर जागेवर ठेवण्यावर विशेष काळजी घ्यावी.


५) ह्या काळात विजेच्या लपंडावामुळे किंवा वोल्टेज कमीजास्त झाल्यामुळे विजेची उपकरणे बिघडू शकतात.


६) तुम्हांला काहींबाबतीत चुकीची माहिती किंवा बातमी मिळू शकते. त्यामुळे पटकन निर्णय घेऊन नका. बातमीची पडताळणी करा आणि मगच निर्णय घ्या.


७) तुम्ही स्वतः बोलतांना काय मुद्दे मांडत आहात,विषय भरकटत तर नाही ना ?, लोकांपर्यंत तुम्हांला काय म्हणायचे आहे ते पोहोचते आहे का ? हे बघा.


८) Interview ला पोहोचायचे असेल तर वेळेत निघा. ट्रॅफिक असणे, Interviewची वेळ चुकीची समजली जाणे आणि म्हणून चुकीच्या वेळी पोहोचणे होऊ शकते तेंव्हा वेळ ठरवतांना काळजीपूर्वक ऐका.


९) बुध म्हणजे स्मरणशक्ती त्यामुळे ज्या काळात बुध वक्री होतो त्याकाळात विसरभोळेपणा जाणवतो.


हा काळ नकारत्मक अर्थाने घेऊ नका. बुध वक्री असण्याचा परिणाम सगळयांना सारखाच जाणवेल असे नाही. कारण तुमच्या कुंडलीत बुधाची असलेली स्थिती अशा वेळी महत्त्वाची ठरते. मूळ कुंडलीत बुध वक्री असेल तर अशा लोकांना ह्या वक्री बुधाचा विशेष त्रास जाणवत नाही असे निरीक्षण केले गेले आहे. बुध वक्री असण्याचा काळ म्हणजे पुनर्रचना करण्याचा काळ आहे, त्याच गोष्टींचे मूल्यांकन करण्याचा काळ आहे. अर्धवट राहिलेल्या योजना, कामे पूर्ण करण्याचा हाच तो  काळ. वर सांगितलेली काळजी घेतल्यास नकारत्मक परिणाम मिळणार नाहीत.


प्रतिक्रिया नक्की कळवा.


अनुप्रिया देसाई- ९८१९०२१११९ 


शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

प्रश्न कुंडली म्हणजे काय ?

प्रश्न कुंडली म्हणजे काय ?


प्रश्नकुंडली हा शब्द जरी नवीन वाटत असला तरी ही संकल्पना नवीन नाही. ही एक शास्त्रीय पद्धत आहे ज्यायोगे ठराविक प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. जन्मकुंडली,प्रश्नकुंडली आणि नंबर कुंडली ह्या पद्धतीने तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. ज्योतिष शास्त्र हे अत्यंत गहन शास्त्र आहे. त्याचा संपूर्ण अभ्यास होणे हे मला अशक्य वाटते. प्रत्येकाने तो विषय आपल्या पद्धतीने समजून घेतला. त्या पद्धतीत "प्रश्न कुंडली"चा सखोल अभ्यास आहे.

प्रश्न कुंडली म्हणजे ज्यावेळी तुमच्या मनात प्रश्न उद्भवला जातो तो दिवस आणि वेळ ह्याची एक कुंडली मांडली जाते. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की ह्या प्रश्न कुंडलीवरून दिलेली उत्तरे जन्मकुंडलीवरून दिलेल्या भाकितांपेक्षाही अचूक ठरतात. ह्यासाठी प्रश्नकुंडली आणि जन्मकुंडली ह्यातील फरक जाणून घ्या. जन्म कुंडली म्हणजे तुमच्या जन्माच्या दिवशी आणि ज्या वेळी जन्म झाला त्यावेळेची एक ग्रह स्थिती आकाशात असते. ही ग्रह स्थिती मांडणे म्हणजेच "जन्म कुंडली". जन्म कुंडली म्हणजे फक्त राशी जाणणे नव्हे तर जन्मकुंडलीवरून तुमचे संपूर्ण आयुष्य कसे असेल, तुमच्या कामाचे स्वरूप, तुमचे शिक्षण,वैवाहिक सौख्य,तुमची आयुष्यात होणारी प्रगती ह्या सर्वांचा आढावा घेता येतो. परंतु जेंव्हा एखादा "Specific" प्रश्न विचारला जातो तेंव्हा जन्मकुंडलीवरून उत्तरे देणं शक्य नसत. उदारहरणार्थ तुमची अमुक अमुक एखादी वस्तू हरवली आहे ? ह्या प्रश्नासाठी तुमच्या जन्मकुंडलीवरून देता येणं शक्य नाही. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही हा प्रश्न ज्योतिषाला विचारात तेंव्हा ज्योतिषी त्या दिवसाची आणि त्या वेळेची कुंडली मांडली जाते. त्या कुंडलीलाच प्रश्न कुंडली संबोधले जाते. ह्या प्रश्नकुंडलीवरून तुमची हरवलेली वस्तू कुठे आहे ? कुठच्या स्वरूपात आहे ? ही वस्तू कधी मिळेल ह्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळू शकतात.


बऱ्याच व्यक्तिंना त्यांची जन्म तारीख माहित असते परंतु जन्मवेळ माहित नसते. काहींचा गावी जन्म झालेला असतो किंवा इतर काही कारणामुळे जन्मवेळ माहित नसते अशा लोकांसाठी प्रश्नकुंडली हा उत्तम उपाय आहे. ह्या प्रश्न कुंडलीवरून तुम्हांला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. ज्यांना आपली जन्म तारीख किंवा जन्मवेळ दोन्हीहीची कल्पना नसेल तर प्रश्नकुंडली हा उत्तम पर्याय आहे. परंतु एका वेळेस एकच प्रश्न विचारल्यास उत्तर मिळू शकेल. 


ह्या प्रश्न कुंडलीचा उपयोग हा - १) हरवलेली वस्तू शोधण्यासाठी, २) बेपत्ता व्यक्तिंसाठी ३) चोरी झालेल्या गोष्टींसाठी ४) नवीन एखादी गोष्ट घेतल्यास फायदा होणार आहे की नाही हे जाणण्यासाठी, ५) नवीन जागेत पैसे गुंतवावेत की नाही हे जाणून घेण्यासाठी ६) तुम्हांला अमुक अमुक नोकरी मिळेल का ह्या प्रश्नासाठी ७) बाळ होईल किंवा नाही ? ८) वारसाहक्काने प्रॉपर्टी मिळेल का ? ९) कोर्टकचेरीत यश मिळेल का ? १०) परदेशात जाता येईल का ? किती काळ वास्तव्य असेल हे जाणून घेण्यासाठीही होऊ शकतो.


प्रश्नकुंडली संदर्भात मला व्यक्तिशः असे वाटते की,


१) ज्या व्यक्तिला प्रश्न विचारायचा आहे त्याने प्रत्यक्षात ज्योतिषाकडे जाऊन प्रश्न विचारावा.

२) ज्या व्यक्तिबद्दल प्रश्न विचारायचा आहे ती व्यक्ति स्वतः प्रश्न विचारू शकत नसेल तर त्या व्यक्तिच्या नजीकच्या नातलगांनी प्रश्न विचारल्यास उत्तर अचूक मिळू शकेल. 
३) प्रश्न विचारण्याआधी प्रश्नकर्त्याने मन प्रश्नावर संपूर्णपणे केंद्रित करावे आणि मगच प्रश्न विचारावा. 
४) प्रश्न हा एका वेळी एकाच विषयबद्दल विचारावा आणि सकारात्मक असावा. ह्याचा अर्थ असा की समजा प्रश्न ईस्टेटीसंदर्भात असेल तर विचारतांना प्रॉपर्टीबद्दलचेच प्रश्न असावेत. मध्येच दुसऱ्या विषयावर प्रश्न विचारू नये. सकारात्मक प्रश्न ह्याचा अर्थ प्रश्न विचारतांना - मी ही प्रॉपर्टी घ्यावी का ?  असा प्रश्न असावा. मी ही प्रॉपर्टी घ्यावी की नाही ? असे दोन्ही पद्धतीचे प्रश्न असू नयेत. 
५) प्रश्न विचारतांना त्यात फार उपप्रश्न (Sub- Questions )असू नयेत. 

प्रश्नकुंडली ही दोन्ही पद्धतीने पहाता येते. वर म्हणाल्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुंडली विवेचन हे पारंपरिक पद्धतीने,कृष्णमूर्ती पद्धतीने, फोर स्टेप पद्धतीने,कस्पल इंटरलिंक पद्धतीने केले जाते.  भारतामध्ये ८५% ज्योतिषी अजूनही पारंपरिक पद्धतीने कुंडली विवेचन करतात. कृष्णमूर्ती पद्धतीचा वापर अजून व्यापक झालेला नाही. पारंपरिक पद्धतीच्या पुढचा अभ्यास म्हणजेच "ऍडव्हान्स पद्धती" म्हणून के. पी. पद्धतीकडे किंवा कृष्णमूर्ती पद्धतीकडे पाहिले जाते. कृष्णमूर्ती पद्धतीत काही किचकट गणिते आहेत. ज्यामुळे उत्तर अचूक येण्याचे प्रमाण जास्त आहे. ह्या कृष्णमूर्ती पद्धतीत अजून एक पद्धत प्रश्न विचारण्यासाठी वापरली जाते आणि ती म्हणजे - नंबर कुंडली. ह्या नंबर कुंडलीत जातकाला (प्रश्न कर्त्याला ) १ ते २४९ ह्या नंबरमधील एक नंबर निवडण्यास सांगितलं जातो. जातक जो नंबर देतो त्या नंबरची एक कुंडली मांडली जाते आणि उत्तर देता येते. अशा २४९ कुंडल्यांचा संच तयार असतो. प्रत्येक दिवसाप्रमाणे आणि वेळेप्रमाणे त्यात बदल करून उत्तर देता येते. ह्याला ज्योतिष शास्त्रीय आधार आहे. तो समजण्यास किचकट आहे म्हणून इथे सध्या त्याबद्दल सांगत नाही. 


ह्या सर्व गोष्टींबरोबरच जो उत्तर देणार त्या ज्योतिषाचेही लक्ष केंद्रित असावे. त्याच्या मानसिक स्थिरतेवरही उत्तर चूक किंवा बरोबर येणे अवलंबून असते. जर ज्योतिषी स्वतः आजारी आहे, फार घाईघाईत प्रश्नकुंडली अभ्यासल्यास उत्तर चुकू शकते. काही वेळेस जातकांकडून अत्यंत घाई दर्शवली जाते. आताच प्रश्नकुंडली बघून सांगा, ५ मिनिटांत फोन करतो लगेच सांगा अशा विनंत्या होत असतात. परंतु ज्योतिषी हा मशीन नसून मनुष्य आहे ही गोष्ट काही वेळेस जातक विसरून जातात. असे होऊ नये. कुंडलीवरून उत्तर देणे म्हणजे stock मधील सामान काढून तुम्हांला देणे एवढे सोपे नाही. ज्योतिषाला एका प्रश्नाचे उत्तर देण्यास वेळ लागू शकतो. तेंव्हा धीर धरा. तुम्हांला तुमचे उत्तर नक्की मिळेल. 


आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 

अनुप्रिया देसाई 




सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

वास्तूशास्त्र वर्कशॉप



वास्तूशास्त्र वर्कशॉप 

एका दिवसांत वास्तूशास्त्र ह्या माझ्या सेशनचे फोटो इथे शेअर करीत आहे. दिशा कशा ओळखायच्या ? वास्तू शास्त्राप्रमाणे तुमचा फ्लॅट आहे का हे कसे ओळखायचे आणि तुम्ही इतर व्यक्तिनांही वास्तू विषयक मार्गदर्शन करू शकता. होकायंत्र कसे असले पाहिजे ? ते कसे वापरायचे ? फ्लॅटचे बरेच प्रकार असतात. वास्तूचे उपाय ह्या आणि अशा  बऱ्याच गोष्टी नोंदणी केलेल्या व्यक्तिंना शिकता आल्या. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !!!
होकायंत्र कसे धरावे ?

कुठले होकायंत्र वापरावे ? होकायंत्रात दिशा कशा पाहाव्यात ? 

वास्तू म्हणजे काय ? वास्तू शास्त्र म्हणजे काय ? हे विद्यार्थ्यांना समजावून सांगतांना 

वास्तू शास्त्राचे आपल्या आयुष्यातील महत्त्व 

विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तर देतांना 


वास्तू कशी निवडावी ? वास्तू कशी असली पाहिजे हे सांगतांना 

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७



शनिचा धनु राशीतील प्रवेश आणि परिणाम 


धनु आणि मकर राशी - साडेसाती 


सोमवारी संध्याकाळी "सामना" ऑफिसमधून फोन आला. सामानाचे वरिष्ठ माझ्याशी बोलत होते. त्यांना सामानामधील माझे लेख आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शनि महाराजांनी राशी बदल केला असल्याचे त्यांनी ऐकले होते. त्या संदर्भात त्यांना माझा एक व्हिडिओ करायचा आहे आणि त्यासाठी माझी  तयारी आहे का ? अशी विचारणा केली. हा प्रश्न अनपेक्षित होता. त्यांना एक-दोन दिवसात कळवते असे सांगितले. एक दोन दिवसांत सर्व राशींवर शनिचा होणार परिणाम ह्याचा आढावा घेतला. त्यांना तसे कळवले आणि दुसऱ्याच दिवशी सामना टीम घरी हजर झाली. त्यांनी माझा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ शूट करण्याचा पहिलाच अनुभव. अत्यंत नर्व्हस होते परंतु श्रीरंग खरे ह्यांनी व्हिडिओ शूट केला त्यांनी मला बराच कॉन्फिडन्स दिला. व्हिडिओ तयार झाला आणि आज तो सामनामध्ये प्रसिद्धही करण्यात आला. हा व्हिडिओ किंबहुना माझा पहिला अनुभव तुमच्यासमोर आणतांना अत्यंत आनंद होत आहे.  

शनि महाराजांनी ऑक्टोबरच्या २६ तारखेला धनु राशीत प्रवेश केला. हे शनि महाराजांचे धनु राशीतील भ्रमण अडीच वर्षे रहाणार आहे. ह्या भ्रमणामुळे मकर राशीची साडेसाती सुरु झालेली आहे. ह्या व्हिडिओद्वारे प्रत्येक राशीला काय फळ मिळणार हे जाणून घ्या आणि share  करायला विसरू नका. 


प्रतिक्रिया नक्की कळवा. 
अनुप्रिया देसाई 

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

एका दिवसात मुलुंड इथे वास्तुशास्त्र शिकण्याची संधी !!!

एका दिवसात मुलुंड इथे वास्तुशास्त्र शिकण्याची संधी !!!


एका दिवसात मुलुंड इथे वास्तुशास्त्र शिकण्याची संधी !!! वास्तू घेतांना काय काळजी घ्यावी ? राहत्या वास्तू सकारात्मक असावी म्हणून काय करू शकतो ?ह्या आणि इतर बऱ्याच गोष्टींवर चर्चा करणार आहोत. फी अगदी माफक असणार आहे. 
आपल्या घराचा "प्लॅन" आणल्यास वास्तू संदर्भांत आपल्याला मार्गदर्शन केले जाईल. ज्याची फी आकारली जाणार नाही.   



सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

ग्रहांनी दिलेला संकेत खरा ठरला !!!

पाकीट हरवले.. 


आजच्या सदरात मी ग्रह किती बोलके असतात ह्या संदर्भात एक केस देणार आहे. १३ ऑक्टबोर रोजी संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी आमच्या सोसायटीतील एक सदस्य माझ्या घरी आले. वय असेल ६५ च्या आसपास. ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी दोघांचाही चेहरा घाबराघुबरा दिसत होता. त्यांनीच सांगायला सुरवात केली. ते दोघे बाजारातून दिवाळीची खरेदी करून स्कुटरवरून घरी परतत होते. सोसायटीच्या आवारात शिरताच त्यांच्या स्कुटरला समोरून सायकलने येणाऱ्या दुधवाल्याने ठोकर दिली. ह्यांत तो दूधवाला पडलाच परंतु हे जोडपेही स्कुटरवरून खाली पडले. धावत समोरच बसलेला वॉचमनही आला. सोसायटीच्या आवारात भाजी विकण्यासाठी आलेले भाजीविक्रेतेही धावत आले. सर्वांनी ह्या जोडप्याला सामान बॅगेत भरून दिले. काका आणि काकू दोघेही घरी गेले. घरात शिरताच काकांना जाणवले की आपले पैशांचे पाकीट खिशात नाही. सामानात शोधून झाल्यावर ते दोघेही तडक खाली आले. सोसायटीच्या आवारात जिथे त्यांची दुधवाल्याच्या सायकलीबरोबर ठोकर झाली तिथे त्या जागी शोधले परंतु पाकीट काही दृष्टीस पडले नाही. त्यांनी वॉचमनला विचारले. त्याने पाकीट पाहिलेही नाही असे सांगितले. भाजीवाला आणि दूधवाला केंव्हाच निघून गेलेले. काकांनी वॉचमनकडून दुधवाल्याचा नंबर घेतला आणि पाकीट सापडलं आहे का म्हणून विचारणा केली. त्यानेही नाकारघंटाच चालवली. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या देवरे काकांनी मग माझ्याकडे येण्यास सुचवले. त्याप्रमाणे ते दिघे आणि देवरे काका माझ्या घरी आले. सर्व कथाकथन झाल्यानंतर मला कुंडलीवरून काही सांगता येईल असा त्यांचा प्रश्न होता कारण पाकिटात काकांचे "Ex-Service man" चे ID कार्ड होते. काका - काकूंचे पॅनकार्ड होते, आधारकार्ड होते आणि रु.१५०००/- नकद होते. पैशांपेक्षा पॅनकार्ड आणि आधारकार्डची चिंता त्यांना जास्त सतावत होती.  

प्रश्नकुंडली मांडली. मेष लग्नाची कुंडली. चंद्र कर्केचा चतुर्थात. चंद्र चतुर्थात असतो तेंव्हा वस्तू घरातच असते. किंवा घराच्या आसपास असते. ह्या कुंडलीत चंद्र चतुर्थात. चंद्र शनिच्या पुष्य नक्षत्रात. त्यादिवशीचे शासक ग्रह खालील प्रमाणे - : 

L - मेष - मंगळ - ५, १, ८

S - पुष्य - शनि - ८, १०, ११

R - कर्क - चंद्र - ४, ४

D - शुक्र - शुक्र -  ५, २, ७ 



चर लग्नाची कुंडली. चंद्र कर्क राशीत आणि कर्क राशी चतुर्थात आलेली. चंद्राच्या स्थितीवरून वस्तू कुठे आहे ह्याची कल्पना येते. चंद्र कर्क राशीत चतुर्थात ह्याचाच अर्थ वस्तू घरातच किंवा घराच्या आसपास आहे. चंद्राच्या ह्या स्थितीवरून त्यांना विचारले,"नक्की घरी पाकीट नाही ? व्यवस्थित शोधले तुम्ही ?". त्यावर त्यांचे म्हणणे," घरात शिरतानांच लक्षात आले की पाकीट नाही. ". 

चंद्र शनिच्या नक्षत्रात. शनि - ८,१०,११ चा कार्येश. म्हणजे पाकीट मिळेल परंतु केंव्हा आणि कुठे ? कुठे ह्या प्रश्नाचे उत्तर - घराच्या जवळ किंवा घरात असेच वाटते. केंव्हा ह्यासाठी L,S,R,D पाहिले तर शनि सोडल्यास बाकी ग्रह जलद गतीचे. चंद्र राहुबरोबर आहे. युती नसली तरी राहुंबरोबर असणे म्हणजे जिथे वस्तू असते तिथे काही वेळेस नजरेस पडत नाही. पुन्हा पुन्हा तपासून पाहावे लागते. 

आज शुक्रवार. शासक ग्रहांमध्ये शनि आहे. दुसऱ्या दिवशी शनिवार. शनि लाभ आणि अष्टम स्थानांचा कार्येश. उद्या पाकीट मिळेल हे नक्की. त्यांना तसे सांगितले आणि रीतसर पोलीस-स्टेशनांत कार्ड हरवल्याची तक्रार/नोंद करण्यास सांगितले. 

दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी काकांनी पाकीट मिळाल्याचे कळवले. पाकीट त्यांच्याच घराच्या बाहेर चपलांच्या रॅकच्या मागे पडलेले मिळाले. (चंद्र आणि राहू एकत्र - राहू - चपलांचा कारक ) किती वाजता पाकीट मिळाले ? ह्यावर त्यांचे उत्तर," वेळ लक्षात नाही परंतु सकाळी साडे दहाच्या आधीच पाकीट मिळाले". 

साडे दहाची कुंडली तपासली. वृश्चिक लग्न होते. लाभेश शनि लग्नात आला होता. लाभतील राशी म्हणजेच कुंभ राशी चतुर्थात. मुख्यतः चंद्र हा राहूच्या युतीत होता. पाकिटात सर्व गोष्टी सुरक्षित होत्या.  

ग्रहांनी दिलेला संकेत खरा ठरला !!!














शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७




 एका दिवसांत वास्तू शास्त्र शिकण्याची सुवर्णसंधी 


स्वतःच घर घेताना,आपलं घर हे वास्तूच्या नियमांप्रमाणे असावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु इंटरनेटवर वाचलेल्या लेखांतून आणि वाचलेल्या पुस्तकांतून शंकेचे समाधान होत नाही. मग आपण वास्तू तज्ज्ञाला बोलावतो. प्रत्येक फ्लॅट पाहतांना वास्तू तज्ज्ञाला बोलावणे practically शक्य नसतं. ४०,०००-४५,००० रु. फी भरून कोर्स करणं प्रत्येकाला शक्य नसतं. मग अशा वेळी करायचं काय ?

ह्या तुमच्या समस्येवर एक तोडगा आहे. दिवाळीनंतर मी तुम्हाला वास्तूबद्दलचे थोडेसे ज्ञान देणार आहे. वास्तू कशी निवडावी ह्याबद्दल आपण मार्गदर्शन घेणार आहोत. नुसत्या अमुक दिशेत मुख्य दार असले म्हणजे वास्तू -शास्त्र नव्हे. स्वयंपाकघर कुठे असावे ? ओटा कसा असावा ? कुठल्या मटेरिअलचा असावा ? बेडरूम कुठल्या दिशेत असली म्हणजे आर्थिक स्थैर्य लाभेल ? घरातील कर्त्या पुरुषाला मानसिक शांती कधी मिळेल ? मुलांची बेडरूम. देवघर कसे असावे ? तुमच्या घरातील नकारत्मक ऊर्जा घालवून वास्तू उत्साहवर्धक कशी करता येईल ? अशा आणि बऱ्याच गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत.  तुमच्या इतरही शंकांचं समाधान होणार आहे. तुम्हांला वास्तू निवडतांना ह्या ज्ञानाचा उपयोग तर होईलच परंतु राहत्या वास्तूत काही बदल कसे करून घ्यायचे त्यासाठी हे ज्ञान नक्कीच उपयुक्त ठरेल.  

ह्या बरोबर एक सुवर्णसंधी अशी की तुम्ही तुमच्या राहत्या वास्तूचा "Map" बरोबर आणल्यास त्याबद्दल तुम्हांला मार्गदर्शन घेता येईल. 

नोंदणीसाठी शेवटची तारीख आहे ३१ ऑक्टोबर. तुम्ही मला इथे संपर्क करू शकता - ९८१९०२१११९. संध्याकाळी ७.०० नंतर फोन करून नोंदणी करू शकता. किंवा माझ्या ई -मेल आयडी वर मेल पाठवू शकता - anupriyadesai@gmail.com

धन्यवाद 
अनुप्रिया देसाई 

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

कुंडलीतून परिसंवाद मुलांशी

कुंडलीतून परिसंवाद मुलांशी 

करिअरमध्ये उंची गाठणाऱ्या आजच्या पालकांची कसरत होत असते. एकतर ऑफिसमध्ये दिलेले प्रोजेक्ट्स पूर्ण करा,ट्रेनचा /बसचा प्रवास करून घरी या,जेवा -टी. व्ही. पहा आणि झोपून जा. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या कशा निघून जातात ते कळेपर्यंत सोमवार उजाडतो. ह्या चक्रातून पालकांची सुटका होणे कठीण आहे. ह्या सर्व दिनचर्येमध्ये पालकांचा मुलांशी किती सवांद साधला जात असेल ? त्या छोट्या जीवाला आजचा दिवस कसा गेला ? शाळेतील दिवस कसा होता ? आजच्या दिवसात असं काय घडलं जे तुमच्या मुलाला आवडलं ? किंवा असं काय घडलं ज्याने मुल गांगरून गेलं आहे ? हा सवांद तुमच्या मुलांबरोबर आठवड्यातील किती दिवस करता ?  आपल्या मुलांच्या स्वभावाबद्दल तुम्हांला किती माहिती आहे ? तुमच्या मुलांना राग किती येतो ? रागावर नियंत्रण त्यांना जमते का ? रागाचे रूपांतर अहंकारात होतेय का ? त्या अहंकाराच्या आहारी जाऊन मुले स्वतःला काही अपाय करून घेत आहेत का किंवा करून घेऊ शकतात ह्याची तुम्हांला कल्पना आहे का ?  लहान मुल हट्ट करणारच परंतु तो हट्ट आपण सतत पुरवत राहिलो तर त्याचे भविष्यातल्या परिणामांची कल्पना आहे का ?

पालकांच्या दुर्लक्षतेमुळे मुलं गुन्हेगारी,ड्रग्स आणि ह्या गोष्टींच्या आहारी जाऊ शकतात. ह्या तरुण पिढीच्या  वाढलेल्या फुकाच्या अहंकारामुळे एखादी गोष्ट त्यांना नाही मिळाली की दुसऱ्या व्यक्तीचा खून किंवा स्वतः आत्महत्या ही मुले करू लागली आहेत. ह्यात दोष पालकांचा,मुलांचा की बदललेल्या समाजव्यवस्थेचा ? आधीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये प्रत्येक जोडप्याला किमान पाच मुले असायची. त्यावेळी मुलांकडे आणि पालकांकडे मोबाईल,टी.व्ही.,लॅपटॉप हे सर्व नव्हते आणि म्हणूनच त्यांच्यात सवांद जास्त होत होता. वडिलांचा किंवा घरातील मोठ्या व्यक्तींचा धाक असायचा. मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे माहीतही नव्हते आणि त्याची त्यांना गरजही वाटली नाही. पण आजच्या मुलांना "Personal Space" हवी असते. मग त्यांना आपण त्यांची स्वतंत्र खोली देतोच परंतु त्याच बरोबरीने मोबाईलसारखे जग मुठीत येणारे खेळणेही देतो आणि तिथेच घात  होतोय. मुलं तुमच्याशी बोलण्यापेक्षा ह्या इंटरनेटच्या आभासी दुनियेत रममाण होतात. पालकांबरोबरीचा सवांद खुंटत जातो आणि मुलांना बाहेरची दुनिया खरी आणि आपली वाटू लागते. ह्या दुनियेत रमतांना मुले आपल्या पालकांपासून दुरावतात.

हल्लीच्या मुलांमध्ये सहनशक्ती कमी असणे, नकार ऐकण्याची क्षमता नसणे, सतत दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपली बरोबरी करणे, आपल्याकडे जी वस्तू नाही किंवा पैसे नाहीत ह्या बाबतीत कमीपणा वाटणे इ. गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत. माझ्या मित्राकडे अमुकअमुक कंपनीचा मोबाईल आहे म्हणून मला सुद्धा तोच मोबाईल हवा आणि आईवडिलांनी साधा मोबाईल दिल्यामुळे मित्रांसमोर हा मोबाईल दाखवण्याची लाज वाटते आणि म्हणून क्लासमध्ये असतांना पालकांचा फोन आला की मी फोन घेत नाही हे मला एका १६ वर्षाच्या मुलाने स्पष्ट सांगितले. मला सुद्धा अमुकअमुक कॉलेजला जायचे आहे,मला सुद्धा सुट्टीत मित्रांबरोबर फिरायला भारताबाहेर जायचे आहे ही वाक्य नेहेमीच ऐकू येतात. आणि जर मुलांच्या ह्या इच्छा पालक पूर्ण करू शकले नाहीत तर ही मुलं चोरी करून किंवा स्वतःच्याच पालकांची हत्या करून आपली गरज भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्यासाठी आपल्या समाजव्यवस्थेत झालेले बदल,दुसऱ्यांवर सतत कुरघोडी करून पुढे राहण्याचा हट्टहास, बुद्धी उच्च दर्जाची नसली तरी बेहत्तर परंतु पेहराव उच्च दर्जाचा हवा ह्या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत असे मला वाटते. त्यासाठी मुलांना वाढवतांना आपण एकाच साच्यातून जाण्यास भाग तर पाडीत नाही ना हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारावा. एकाच साच्यातून म्हणजे प्रत्येक परीक्षेत प्रत्येक विषयात ९० पेक्षा जास्त मार्क्स मिळालेच पाहिजेत हा हट्ट. त्यासाठी शाळेनंतर क्लासेसला जाण्याचे प्रमाण वाढत गेले. परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की आपले मुलं हुशार हा (गैर) समज रुजत चालला आहे. कारण चांगले मार्क्स म्हणजेच चांगल्या कॉलेजला ऍडमिशन आणि पुन्हा मग मार्कांची रस्सीखेच सुरूच. त्यानंतर हीच मुले चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करू लागतात तरीसुद्धा रस्सीखेच संपत नाही. ती सुरूच रहाते.  ह्या सर्व प्रवासात ८०% पालक आपल्या मुलांमधील सुप्त गुण ओळखण्याचा प्रयत्नही करीत नाहीत हे दुर्दैव.

प्रत्येक मुलं वेगळे आहे आणि त्याचा पिंड,त्याची आवड,त्याच्या बुद्धीचा दर्जा,त्याची अभ्यास करण्याची क्षमता ही वेगळी आहे. एवढंच नव्हे तर अभ्यास समजून घेण्याची पद्धतही वेगळी आहे. काही मुलांना एकदाच वाचून परीक्षेत ८०% मार्क्स मिळू शकतात. काही मुलांना सतत सराव केल्यानंतर परीक्षेत चांगले मार्क्स मिळतात. काही मुलांना व्हिजुअल इफेक्टसने समजावून सांगितले की त्यांच्या मार्कांमध्ये लक्षणीय फरक दिसून येतो. माझ्याकडे काही केसेस अशा आहेत ज्यामध्ये पालकांनी हे शैक्षणिक महत्त्वाचे वर्ष आहे म्हणून मुलीचा नृत्य प्रशिक्षण थांबवल्यानंतर तिला कमी मार्क्स मिळू लागले, अभ्यासातील तिचा रस कमी होऊ लागला. त्यानंतर कुंडली विवेचनासाठी जेव्हा ही केस माझ्याकडे आली तेंव्हा हिचे नृत्य बंद होऊ देऊ नका हे पालकांना शास्त्रीयदृष्ट्या समजावून सांगितल्यावर त्यानांही ही गोष्ट पटली.

आपल्या मुलांना व्यवस्थित ओळखण्याचे साधन म्हणजे कुंडली. कुंडलीतून तुम्ही तुमच्या मुलांबद्दल,त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या आवडीनिवडीबद्दल जाणून घेऊ शकता. कुंडली म्हणजे आरसा. कुंडलीतील बारा स्थानांवरून त्या मुलाबद्दल प्रत्येक गोष्ट तुम्ही जाणून घेऊ शकता. इथे कुंडली विवेचनाचा उपयोग मुलाचा अभ्यास कशा पद्धतीने घेऊ शकतो ? त्याची स्मरणशक्ती कशी वाढेल ? त्याची लॉजिकली उत्तर देण्याची क्षमता आहे का ? तुमचे मुलं क्रिएटिव्ह आहे तर मग त्याला कुठल्या पद्धतीचे शिक्षण देऊन त्याला जीवनात ह्यात यश मिळेल हे सांगू शकतो. आपल्याकडे डॉ. गिरीश ओक ह्यांचे उदाहरण आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊनसुद्धा आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावले आहे.

माझ्याकडे येणाऱ्या बहुतांश पालकांची ही इच्छा असते की मुलाने डॉक्टर,इंजिनीअर व्हावं आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी आणि ऐश करावी. पण आज चित्र ह्याच्या अगदी उलटे आहे. ज्या व्यक्ती ह्या IT क्षेत्रात  आहेत ते जेंव्हा माझ्याकडे कुंडली विवेचनासाठी येतात  तेंव्हा त्यांच्या मनात हीच खंत असते की आई -वडील म्हणाले म्हणून मी ह्या क्षेत्रात आज काम करतोय पण माझी आवड वेगळी आहे आणि त्या आवडीच्या क्षेत्रात मला आता काम करायचंय. जास्त पैसे नकोत पण मनःशांती हवी. मग हीच गोष्ट आधीपासूनच आपण लक्षात घेतली तर त्या मुलाला आवडत्या क्षेत्रात काम करता येईल. जास्त पैसे कमवण्यापेक्षा मन समाधानी आणि आनंदी असेल तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही जोपाजले जाईल.

कुंडलीच्या दशम आणि षष्ठ स्थानावरून आपले मुल कुठल्या प्रकारचे काम करणार हे लक्षात येऊ शकते आणि त्याचप्रमाणे आपण त्याची जडणघडण करू शकतो. द्वितीय स्थानावरून त्याची आर्थिक स्थिती कशी राहील हे समजल्यास तुम्हांला मुलाच्या भविष्याची चिंता रहाणार नाही. प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे आणि त्याचा पिंड वेगळा आहे हे जाणून घेऊन जर त्याला त्या अभ्यासासाठी मदत केली तर मुलाला यश नक्की मिळू शकेल. त्याचबरोबरीने मुलांच्या पत्रिकेत त्यांचा गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढा आहे का ? हे जाणून घेऊ शकतो आणि वेळीच मुलांचे तज्ज्ञांकडून काउन्सेलिंग करून घेऊ शकतो.
१) काही मुलांना सतत त्यांच्याकडेच "attention" हवे असते मग त्यासाठी त्यांच्या वागण्यात वेगळाच निगेटिव्ह बदल येऊ पाहत असतो. त्यावेळी ह्या मुलांना ओरडण्यापेक्षा समजून घेण्याची आवशक्यता असते.
२) काही मुले इतकी भावुक असतात की त्यांच्यावर कोणी रागावले आहे की ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही आणि मग आत्महत्या करण्याकडे त्यांचा काळ होतो. अशा मुलांच्या पत्रिकेत  चंद्र हा निचीचा असू शकतो त्यामुळे मन दुर्बल असते.
३) काही मुले इतकी व्रात्य असतात की घरात मस्ती असतेच परंतु त्याच्या मित्रांचे पालकही तक्रार घेऊन घरी येत असतात. अशा वेळी कुंडलीतील मंगळ तपासून पहावा.
४) मुल हुशार असून अबोल रहात असेल तर बुध कसा आहे पत्रिकेत ते पहावे.
५) हुशार असूनसुद्धा मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर अशा मुलांचा राहू आणि शुक्र ह्या ग्रहांची स्थिती तपासून बघा.

मुलांच्या पत्रिकेत जर असे काही योग आहेत का हे तपासून घेऊन त्यांच्याशी पालकांनी कसे वागावे हे पालक समजून घेऊ शकतात आणि पुढे होणारा अनर्थ टाळू शकतो. काही मुले सुरवातीला खूपच बुजरी असतात मग त्यांना बाहेरच्या जगाशी लढाई करतांना भविष्यात त्रास होऊ शकतो त्यासाठी कुंडलीचे विवेचन महत्त्वाचे ठरते. नुसतेच विवेचन न करीत मुलामध्ये सकारत्मक बदल कसा घडवून आणता येईल ह्यसाठी प्रयत्न करू शकतो.

सिद्धांत गणोरेचे उदाहरण अगदी हल्लीचे. ज्याने स्वतःच्या आईची हत्या केली आणि पश्चातापाचा लवलेशही चेहऱ्यावर दिसत नव्हता. सिद्धांतला वेळीच उपचाराची गरज होती आणि ती जर मिळाली असती तर पुढे होणारी  घटना टाळता आली असती.

ह्या संदर्भात अजूनही काही उदाहरणं देता येतील. आपल्याकडे डॉ. गिरीश ओक ह्यांचे बेस्ट उदाहरण आहे. ह्यांचा उल्लेख ह्यासाठी की डॉ. गिरीश ओक हे नाव प्रसिद्ध आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊनसुद्धा आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावले आहे. म्हणूनच पालकांनो आपल्या मुलांच्या सुप्त गुणांना वेळीच ओळखा, त्यांच्यात असलेली कमतरता कशी भरून काढता येईल ? त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल ह्यावर चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो ह्यावर कुंडलीतून मार्गदर्शन आपण घेऊ शकता समाज सुदृढ बनवू शकता.

हा सर्व पालकांना नक्कीच उपयोगी ठरेल अशी अशा करते.

अनुप्रिया देसाई
anupriyadesai@gmail.com





सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

माझं आधारकार्ड सापडेल का ?



माझं आधारकार्ड सापडेल का ? 


आमच्या घरी मावशी गेले दोन वर्ष स्वयंपाकास येत आहेत. मूळच्या औरंगाबादच्या असल्याने स्वयंपाकात ठेचा आणि भाकरी ठरलेलीच. आम्ही काही सांगण्याआधी त्याच हक्काने सांगणार,"आज मी ही भाजी आमच्या औरंगाबादच्या इश्टाईलने बनवते, बगा खाऊन एकदा". गेल्या दोन वर्षात आपलंस केलं त्यांनी. शनिवार,रविवार आणि सुट्टीच्या दिवसांत जातकांची गर्दी असते. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे,कुंडली वेगळी. दुपारी दोन वाजून गेलेत आणि अजूनही मी जातकांच्या प्रश्न सोडवण्यात गुंतले आहे हे लक्षात आल्यावर मला हाक मारून स्वयंपाक घरात बोलावून घेणार. माझं पान वाढून,"आधी तुमी खाऊन घ्या. तुमालाबी बोलाची ताकद पाहिजेल ना ?" असं म्हणून मला जेवू घालणार. अशा आमच्या मावशी. आज रविवारचा दिवस. सकाळी ८.३० पासून जातकांची रीघ लागलेली. प्रत्येकाचे वेगळे प्रश्न आणि त्यावर आमची चर्चा चाललेली. १०.३० वाजले आणि मी मोकळी झाले. मावशीबाईंना चहा बनवण्यास सांगितला. चहा बनवता बनवता त्यांनी प्रश्न केला," ताई माझ्या महत्त्वाच्या गोष्टी हरविल्या आहेत. तुमी सांगू शकता ते ?" त्यांनी प्रश विचारल्याबरोबर घडाळ्याकडे नजर गेली. १० वाजून ३९ मिनिटे झालेली. काय गोष्टी हरवल्या आहेत ? ह्यांवर त्यांच उत्तर ," आधारकारड  मिळना झालंय".  हा महत्त्वाचा प्रश्न आहे खरा !!मग लगेच प्रश्नकुंडली मांडली. 




पारंपरिक पद्धतीने - : तूळ लग्नाची कुंडली. चंद्र दशमात कर्क राशीत राहुबरोबर युतीत. प्रश्न आधारकार्डचा असल्याने चंद्र बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध म्हणजे व्यवहारासाठी उपयुक्त ठरणारी कागदपत्रे. चंद्र कर्क राशीत  असल्याने वस्तू घरातच आहेत. 

कृष्णमूर्ती पद्धतीने - : 

रुलिंग प्लॅनेट्स खालीलप्रमाणे- 

L - शुक्र   १०,१,८,१२

S - बुध    १०,९,११

R - चंद्र   ९

D - रवि   १०,१०

सगळे ग्रह जलद गतीचे म्हणजेच आधारकार्ड आजच्या दिवसात सापडायला हवे.  आजच्या दिवसांत पण कधी ? त्यासाठी रुलिंग प्लॅनेट्स मदतीला घेतले. रुलिंग प्लॅनेट्स मधील रवि सोडून द्यावा लागेल कारण आजच रविवार आणि आजच आधारकार्ड मिळणार आहे. त्यानंतर आहे शुक्र. शुक्राचेच तूळ लग्न आहे. पण मावशी घरी जाऊन स्वतः शोधणार. त्या संध्याकाळी ७.०० पर्यंत कामावरच असणार म्हणजे ७.०० वाजल्यानंतरचे लग्न पहावयास हवे. शुक्राचे वृषभ लग्न रात्री साधारपणे पावणे दहाला सुरु होते. रुलिंग प्लॅनेट्स मधील दुसरा ग्रह आहे बुध. परंतु आज चंद्र बुधाच्या नक्षत्रात असल्याने बुध गृहीत धरता येणार नाही. त्यानंतर आहे चंद्र. लग्न नक्षत्र स्वामी चंद्राच्या नक्षत्रात साधारणपणे रात्री १०.३० च्या सुमारास असेल. 

मावशींना आधारकार्ड घरीच असल्याचे सांगितले. त्यावर त्यांचे म्हणणे असे की,सर्व घरात शोधून झाले परंतु सापडले नाही. चंद्र बुधाच्या आश्लेषा नक्षत्रात. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा घरात शोध घेण्यास सांगितले. आज रात्री ११.०० वाजेपर्यंत आधारकार्ड सापडले पाहिजे असे सांगितले. 

दुसऱ्या दिवशी मावशी घरी आल्या तेच थँक्यू थँक्यू म्हणत. आधारकार्ड घरातच होते. कपाटात कपड्यांच्या मागे दडून बसलेले. त्याच जागी सकाळी पाहिले होते पण सापडले नाही आणि आता रात्री तिथेच सापडले. असं कसं ?आश्चर्ययुक्त समाधान त्यांचा चेहऱ्यावर होते. किती वाजता आधारकार्ड सापडलं ? ह्यावर त्यांचं उत्तर होतं - रात्री साडेदहाला सापडलं. म्हणजेच शुक्राच्या लग्नावर आणि लग्न चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात असतांना कार्ड मिळाले. 

रुलिंग प्लॅनेट्सनी पुन्हा एकदा दिलेला प्रत्यय. 




       

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

कुंडली आणि तुमचे मित्र


कुंडली आणि तुमचे मित्र 


ह्या रविवारी मैत्री -दिवस अर्थात Friendship Day साजरा केला गेला. आपल्या आयुष्यात मित्र असणं फार महत्त्वाचे आहे. आई -वडील,बहिण,भाऊ आणि इतर नाती ही जन्माने मिळतातचं परंतु कोणाशी मैत्री करायची हे सर्वस्वी आपल्या मनावर आहे. त्यामुळेच ह्या नात्याला स्वतःच असं अनोखं विश्व आहे. ह्या नात्यात कुठलीही औपचारिकता नाही. जस जसं वय वाढत जातं आणि आपली मुलं त्यांच्या आयुष्यात गर्क होतात तेंव्हा तुम्ही एकटे पडता. अशा वेळी गरज असते मित्रांची. जीवाभावाचा मित्र मिळण्यासाठी भाग्य लागतं. खरंच असा मित्र आहे आपल्या भाग्यात ? कुंडलीवरून त्याची कल्पना नक्कीच येते. कुंडलीतील अकरावे स्थान म्हणजे तुमचा जीवाभावाचा मित्र. तुमच्या मनाची अवस्था ओळखणारा. तुमच्या आनंदात सामील होणारा. तुमच्या दुःखात नातेवाईकांपेक्षांही तुमच्या जवळ असणारा. तुम्हांला समजून घेणारा आणि चुकीच्या गोष्टींबाबत वेळीच तुम्हांला खडसावणाराही. परंतु सर्वांनाच हे भाग्य लाभते असे नाही. काही वेळेस मित्रांमुळे अनैतिक गोष्टींमध्ये फसण्याचीही शक्यता असते. काहीवेळेस तर एका मित्राने केलेल्या खुनाची शिक्षा त्याच्या इतर मित्रांनाही जेलमध्ये घेऊन जाते. आयुष्य बदलून जाते. संगतीचा परिणाम असतोच. मग आजच्या पालकांना तर आपल्या मुलांबाबत सतत हीच चिंता असते की आपले मूल कुठल्या संगतीत आहे ? त्यामुळे मुलांच्या कुंडली संदर्भात सर्व प्रश्न विचारून झाल्यानंतर हा एक प्रश हमखास पालकांकडून विचारला जातो - "ह्याला/हिला मित्र-मैत्रिणींपासुन काही अपाय तर नाही ना ? कुंडलीतुन काही का,उ शकेल का  ?"  अशा पालकांना कुंडलीचे मार्गदर्शन उपयोगी ठरते. तुम्ही तुमच्या मुलांच्या कुंडलीवरून त्यांच्या मित्र-मैत्रीणींबद्दल नक्कीच जाणून घेऊ शकता. 

आजचा आपला विषय आहे कुंडलीतील एकरावे स्थान -

कुंडलीत असलेली स्थाने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिबद्दल सांगता असतात. जसे कुंडलीतले प्रथम स्थान तुमच्या स्वभावाबद्दल सांगते. चतुर्थ स्थान तुमच्या आईबद्दल कल्पना देते. मातृसौख्य किती आहे ह्याचा विचार ह्या स्थानावरून होतो. पंचम स्थानावरून तुम्हांला होणाऱ्या संततीबद्दल सांगता येऊ शकते. षष्ठ स्थान तुमच्या शत्रूंबद्दल कल्पना देते. सप्तम स्थान तुमच्या जीवनसाथीबद्दल सांगते. न स्थान मोठ्या भावंडांबद्दल माहिती देते. दशम स्थान पित्याबद्दल तर एकरावे स्थान तुमच्या मित्रांबद्दलची कल्पना देते.

एकराव्या स्थानात असलेल्या राशीवरून, ग्रहांवरून मित्रांची कल्पना येऊ शकते. मुलं कुठल्या संगतीत आहेत त्याची कल्पना येऊ शकते. कुंडलीत हे लाभ स्थान कुठले ह्याचे कल्पना खालील चित्रात आहे - :






एकरावे स्थान किंवा लाभ स्थान. ह्या स्थानाला लाभ स्थान म्हणूनही संबोधले जाते. लाभ स्थान म्हणजे प्रत्येक गोष्टीतून होणारे लाभ,फायदे. धन स्थान म्हणजेच द्वितीय स्थान. द्वितीय स्थानावरून तुमच्याकडे असणाऱ्या संपत्तीची कल्पना येते. परंतु द्वितीय आणि लाभ स्थानाचा एकत्र अभ्यास केल्यास समजून येते की व्यक्तिने नुसते पैसे कमवले आहेत ?  त्यातील किती पैसे तो Save करू शकेल ? नुसता खर्चचं होत राहणार आहे का ? हा झाला द्वितीय आणि लाभ स्थानाचा एकत्रित विचार. त्याचप्रमाणे सप्तम स्थानावरून जीवनसाथीची ओळख होते. ह्या स्थावरून तुमचे वैवाहिक सौख्य कसे असेल ह्याची कल्पना येते. सप्तम स्थान आणि लाभ स्थान ह्या दोघांचा विचार करता विवाहानंतर तुम्हांला वैवाहिक सौख्य लाभेल की तुमचे नुकसान होणार आहे ह्याचा आढावा घेता येतो.

लाभ स्थान हे एकमेव असे स्थान आहे ज्या स्थावरूनच तुमच्या मित्र -परिवाराची कल्पना येते. ह्या स्थानात असलेले ग्रह ठरवतात की तुमच्या मुलांचे मित्र हे कुठल्या पद्धतीचे असतील ?

लाभ स्थानात असलेल्या राशीवरून आणि ग्रहांवरून मित्र कुठल्या प्रकारचे असतील ? कुठल्या वर्गातली(उच्च वर्ग की खालच्या वर्गातील )असतील  ? त्यांचा स्वभाव,सांपत्तिक स्थिती ह्याची कल्पना येऊ शकते. मित्रांमुळे तुमचे मुल स्वतःचे नुकसान तर करून घेणार नाही ना ? हे तुम्ही जाणून घेऊ शकता.

शनि हा प्रौढ ग्रह आहे. एकराव्या स्थानात जर शनि असेल तर तुमच्या मुलाचे सर्व मित्र हे त्याच्या वयापेक्षा मोठे असू शकतात. त्याला त्याच्या वयाच्या व्यक्तिंबरोबर बोलणे,वावरणे थिल्लरपणा वाटू शकतो. त्याचे स्वतःचे बोलणे हे मॅच्युर्ड असू शकते. आपण बरे आणि आपले काम बरे हा स्वभ असल्याने मित्र फार नसतात. हल्लागुल्ला हा प्रकार नसतो. अध्यात्मिक देवाणघेवाण जास्त असते.

ह्या स्थानात असलेला मंगळ ग्रह हे दर्शवतो की तुमच्या मुलाच्या संगतीत असलेले मित्र/मैत्रिणी ह्या ऍडव्हेंचर्स कॅटेगरीचे आहेत. सर्वांना गिर्यारोहण करण्याची आवड असू शकते. ते कधीही शांत बसू शकणार नाहीत. त्यांच्यात होत असणाऱ्या चर्चाही टेकनॉलॉजी संदर्भातील असू शकतात. त्यांच्यातील वाद म्हणजे शारीरिक हमरातुमरी. काही दिवसानंतर शांत होऊन पुन्हा पहिल्या सारखा हसण्याचा -खिदळण्याचा आवाज सुरु होतो.

चंद्र जर ह्या स्थानात असेल तर तुमचे मुलं त्याच्या वयापेक्षा लहान असलेल्या मुलांबरोबर जास्त रमते. त्याला फार प्रौढ बोलणे आणि वागणे आवडत नाही. स्वछंदी रहाणे त्यांना जास्त आवडते. ह्यांचा मित्र परिवार फार मोठा असतो. कोणाची रोकटोक ह्यांना आवडत नाही. त्यामुळे मग त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांबरोबर त्यांचे जास्त जमते असे म्हणू शकतो. त्यांची बालपणाची मैत्री दीर्घकाळ टिकते. आपल्या मित्रांमध्ये ह्यांची भावनिक गुंतवणूक जास्त असते. मित्राला काही झाले म्हणजे ह्यांनाच जास्त त्रास होऊ लागतो. अगदी ममत्वाने काळजी घेतील.

ह्या स्थानात शुक्र असेल तर ह्यांचा मित्र परिवार काही काळापुरताच टिकतो. म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांच्या मित्र -परिवारात बदल होत रहातो. फार काळ एखाद्या व्यक्तिबरोबर मैत्री टिकणे खूप कठीण जाते. इथे वयापेक्षा अपेक्षेप्रमाणे मित्र परिवार बदलतो. शुक्राचे मूड्स सतत बदलत असतात त्यामुळे त्यांचे मित्रही बदलतात किंवा असे म्हणू शकतो की ते त्यांच्या मित्रांची वर्गवारी करून ठेवतात. स्वतःच्या शॉपिंगला जाताना ठराविक व्यक्तिला सोबत घेऊन जातील. ठराविक व्यक्ति म्हणजे ज्या व्यक्तीची चॉईस चांगली असेल त्याच व्यक्तिला शॉपिंगला घेऊन जातील.

जर ह्या स्थानात रवि असेल तर लहानपणी मित्र फार कमी असतात. कालांतराने ह्यांच्या मित्र -परिवारात मोठं-मोठ्या व्यक्तिंचा समावेश होतो. मोठ्या व्यक्ति म्हणजे वयाने नव्हेत तर मानाने,प्रसिद्धीने मोठया असलेल्या व्यक्ति. जसे राजकारणी, शाळेचे मुख्याध्यापक, अभिनेते इ. ह्यांना स्वतःला मोठेपणा मिरवण्याची फार आवड असल्याने अशा मोठ्या व्यक्तिंबरोबर ओळख वाढवून त्यांच्या बरोबर ऊठबस असते.

गुरुसारखा ग्रह जर ह्या स्थानी असेल तर तुमच्या मुलाचे मित्र असे असतात जे सतत आजूबाजूचे ज्ञान घेण्यात व्यस्त असतात. अशा मुलांचीही मित्रमंडळी ही मोठ्या वर्तुळातील असतात. त्यांची स्वतःची प्रगती होत असते आणि त्यांच्या मित्रांच्या ओळखातून ते स्वतःचा फायदाही करून घेतात.

बुध ह्या स्थानांत असलेल्या व्यक्तिला मैत्री करायला ठराविक वय किंवा कारण लागत नाही. अशा लोकांच्या मित्र -परिवारात लहान मुलांपासून प्रौढ व्यक्ति सामील असतात. ह्यांना स्वतःला प्रवासाची आवड असल्याने त्यांची मैत्री प्रवासातच जास्त होत असते. आणि ही मैत्री दीर्घकाळ टिकते.

आता पुढचा जो प्रकार आहे - ह्या सर्व ग्रहांबरोबर मी दोन ग्रहांचा उल्लेख केलेला नाही. ते ग्रह आहेत राहू आणि केतू. हे ग्रह नसून छाया ग्रह आहेत. राहू आणि केतू सारख्या ग्रहांना कायम वाईट म्हणून हिणवले गेले आहे. राहू आणि केतू मध्ये दोन्ही पद्धतीच्या शक्ती आहेत. जर चांगल्या स्वरूपाची फळे मिळण्याचे योग असतील तर राहू आणि केतू तुम्हांला प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन जातील नाहीतर मग उतरती कळा लागते. राहू लाभस्थानात असेल तर ह्या व्यक्तिच्या ओळखी भरपूर असतात. मित्र परिवार मोठा असतो. मग ह्या मित्र परिवारात गुंड व्यक्तिंची असलेली जवळीकही असू शकते. (संपूर्ण कुंडलीचा अभ्यास व्हावा )

तुमच्या मुलाच्या कुंडलीत जर ह्या स्थानात राहू आणि मंगळाची युती असेल तर तुम्हांला वाढत्या वयात मुलांवर लक्ष ठेवावे लागेल. इथे मंगळ असून जर तो मिथुन राशीतील असेल तर मात्र तुमच्या मुलांवर आणि त्याच्या मित्रांवर जरूर लक्ष ठेवा. उगीचंच नको त्या गोष्टींबाबत पैज लावून स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणे ह्या गोष्टी होऊ शकतात. हल्ली जो ब्ल्यू व्हेल नावाच्या खेळामुळे जे काही अनुचित प्रकार घडीत आहेत त्या मुलांच्या कुंडलीत सर्वसाधारणपणे ह्याच प्रकारचे योग होत असावेत.

त्यामुळे तुमच्या मुलांच्या कुंडलीत ह्या स्थानात असलेले ग्रह तपासा आणि वेळीच सावधगिरी बाळगा. तुमची मुले कुठल्याही गोष्टीच्या आहारी तर जाणार नाहीत ना ? मित्र असणे म्हणजे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. परंतु तुमचे मूल वाईट संगतीत तर नाही ना ह्यावर लक्ष ठेवणे तुमचे कर्तव्य आहे. सध्याचा जमाना इंटरनेटचा आहे. दहा वर्षांवरील प्रत्येक मुलाच्या/मुलीच्या हातात आज स्वतःचा मोबाईल आहे. करिअरमध्ये व्यग्र असणाऱ्या आजच्या आई -बाबांनी मुलांच्या हातात कुठले जीवघेणे खेळणे दिले आहे त्याचा पुनःविचार व्हावा. सतत मुलांच्या मागे त्याच्या परिणामांचा घोषा लावण्यापेक्षा त्यांच्याशी सवांद साधा. (आजच्या पालकांना हे आज आवर्जून सांगावे लागतेय. कारण पालक स्वतः घरी रात्री नऊच्या पुढे पाऊल ठेवतात. आधीच्या काळी आजी आणि आजोबा सवांद साधण्यासाठी घरी असायचे. आता कुटुंब विभक्त पद्धतीनंतर हा प्रश्न निकडीचा झालेला आहे.) कारण आजची पिढी ही "Techno Savvy" आहेत. त्यांच्या मनात भावनांचा गोंधळ आहे. आम्ही प्रॅक्टिकल आहोत असं म्हणून आयुष्यातील प्रश्न सुटत तर नाहीतच परंतु पुढे भावनिक गरज वाढत जाते, हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते आणि मग नको ते टोकाचे निर्णय घेतले जातात.

हा लेख पालकांना नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा करते.

प्रतिक्रिया नक्की कळवा.





















शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

परदेशात शिक्षण आणि कुंडलीतील योग ?

परदेशात शिक्षण आणि कुंडलीतील योग ?

२०१४च्या मे महिन्यात केतनचा मला एक ई -मेल आला. त्यात त्याने त्याची प्रश्नावली पाठवली होती. ह्या अगोदर आमची बऱ्याचदा भेटही झाली होती. त्याच्या कुंडलीसंदर्भात चर्चाही भरपूर झाली. परंतु त्यावेळेस तो कॉलेजमध्ये होता. आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय ? परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.  परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे योग कुंडलीत आहे का ?  ह्या संदार्भातील प्रश्न त्याने मला पाठवले होते. त्याची बहीण सध्या अमेरिके स्थायिक असल्याने त्याला बाकी बरीच मदत होणार होती. फक्त ऍडमिशन कुठल्या युनिव्हर्सिटीत घेऊ इतकाच काय तो त्याचा निर्णय बाकी होता. मग त्या अनुषंगाने व्हिसा वगैरे. त्याचे प्रश्न खालीलप्रमाणे होते -

१) मी MBA अमेरिकेतून करू शकतो का ?

२) MBA चा नाद सोडून मी IT वर लक्ष केंद्रित करू का ?

३) की Finance क्षेत्राकडे मी वळू ?

मी त्याला कुंडलीचा अभ्यास करून सांगते असे कळवले. केतनची कुंडली - 





मकर लग्न आणि  सिंह राशीची केतनची कुंडली. त्याच्या प्रश्नाप्रमाणे कुंडलीचे विवेचन करु -

1) मी अमेरिकेतून MBA करू शकतो का ? - 

एका प्रश्नात दोन प्रश्न आहेत. MBA करू शकतो का ? आणि अमेरिकेत जाऊ शकतो का ?  MBA करण्यासाठी कुंडलीत उच्च शिक्षणाचे योग कसे आहेत ते आधी पहावे लागतील. 
पारंपरिक पद्धतीनुसार - : उच्च शिक्षणासाठी नवम स्थानाबरोबरच चतुर्थ स्थान आणि लाभ स्थान विचारात घ्यावे. नवम स्थानाचा अधिपती बुध चतुर्थ स्थानात रवि आणि गुरूच्या युतीमध्ये. रवी आणि बुध ह्यांच्या युतीला "बुधादित्य योग" म्हटले जाते. व्यक्ती उच्च शिक्षण घेतेच. अर्थात ह्याला कुंडलीतील बाकी ग्रहांची साथ असावी. 
के. पी. प्रमाणे - : केतनच्या कुंडलीत नवम स्थानाचा सब लॉर्ड आहे गुरु - ३,३,१२. चतुर्थ स्थानाचा सबलॉर्ड आहे केतू - ८,८. अमेरिकेत जाऊ शकतो का ? ह्या प्रश्नासाठी व्यय स्थान आणि तृतीय स्थान पहिले जाते. इथे व्यय स्थानाचा सबलॉर्ड चंद्र असून तो ७ ह्या स्थानचा कार्येश आहे. तृतीय स्थानाचा सबलॉर्ड गुरु असून तृतीय आणि बाराव्या स्थानाचा कार्येश आहे.  

ह्याचाच अर्थ केतनच्या कुंडलीत उच्च शिक्षणाचे योग आहेत. MBAच करेल हे स्पष्ट नाही. बाहेरगावी जाण्याचे योग आहेत. बाहेरगावी जाण्याचे योग असले तरी फार काळ राहण्याचे योग दिसत नाहीत. चंद्र सप्तम स्थानाचा कार्येश आहे. म्हणजे व्यक्ती कायम प्रवास करेल परंतु एकाच ठिकाणी राहणे दिसत नाही. तृतीय स्थानाचा सबलॉर्ड गुरूसुद्धा तेच निर्देशित करीत आहे. 

२) IT वर लक्ष केंद्रित करू का ? - 

पारंपारिक पद्धतीनुसार  - : IT करण्यासाठी कुंडलीत मंगळ ह्या ग्रहाला महत्त्व द्यावे. केतनच्या कुंडलीत मंगळ  मकर राशीत उच्चीचा आहे.  चतुर्थ आणि लाभ स्थानांचा अधिपती म्हणून मंगळाला तेवढेच महत्त्व द्यावे.  चतुर्थात रवी उच्चीचा आहे. बुधादित्य योग आहेच. बुध आणि मंगळ ह्यांचा संबंध कॉम्पुटरशी आहे. मंगळ म्हणजे टेक्नॉलॉजी आणि बुध म्हणजे सवांद साधण्यासाठी जे माध्यम वापरलं ते. 

के. पी. प्रमाणे - : मंगळ - १,४,११ स्थानांचा कार्येश. बुध ३,६,९ ह्या स्थानांचा कार्येश. म्हणजेच IT क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी ग्रहांचा चांगलाच पाठिंबा आहे. 

३) की Finance क्षेत्राकडे वळू ? - 

पारंपरिक पद्धतीनुसार - : Finance साठी गुरु,बुध ,शुक्र आणि शनि ह्या ग्रहांचा प्रामुख्याने विचार व्हावा. केतनच्या कुंडलीत गुरु अस्तंगत असून चतुर्थ स्थानात आहे. बुध अस्तंगत असून चतुर्थ स्थानात. बुधादित्य योग होत आहे. शुक्र वृषभ राशीत पंचम स्थानात. सर्वच योग चांगल्या प्रकारचे. 

के. पी. प्रमाणे - :  गुरु स्वतः ३,३,१२ स्थानांचा कार्येश असून शुक्राच्या नक्षत्रात. बुध ३,६,९, चा कार्येश असून शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र ५,५,१० स्थानांचा कार्येश आणि मंगळाच्या नक्षत्रात. म्हणजेच ह्या क्षेत्रातही केतन आपले करिअर करू शकतो. शनि २,१,११ स्थानांचा कार्येश असून केतूच्या नक्षत्रात. 

आता संपूर्ण कुंडलीचा आढावा घेतल्यास - लग्नेश आणि धनेश शनि असून तो व्यय स्थानात आहे. शनि कस्पने लाभ स्थानात. चंद्र स्वतः अष्टम स्थानात. चंद्र कस्पने सप्तम स्थानात.  केतनने हे प्रश्न मला २०१४च्या एप्रिल महिन्यात पाठवले होते. त्यावेळी त्याला चंद्राची महादशा सुरु होती. चंद्र - ७,७ नक्षत्र स्वामी - शुक्र ५,५,१०. 
अंतर्दशा राहू - २,१,२ नक्षत्र स्वामी - गुरु ३,३,१२. पुढे येणाऱ्या अंतर्दशा - गुरु,शनि,बुध,केतू,शुक्र आणि रवि. म्हणजेच २०२२ पर्यंत चंद्र महादशा राहणार त्यानंतर मंगळ महादशा सुरु होईल. मंगळ महादशा पुन्हा IT क्षेत्र निर्देशित करीत आहे. 

त्यानंतर मी केतनला Finance आणि MBA पेक्षा तुझे करिअर IT क्षेत्रात दिसून येत आहे हे सांगितले. अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागणार आहे. हे सुद्धा बजावले.  हे सर्व ऐकल्यावर केतनचे म्हणणे त्याचे अमेरिकेत जायचे जवळजवळ ठरल्यात जमा आहे. फक्त औपचारिकता म्हणून कुंडली दाखवण्याचा खटाटोप. मी केतनला म्हणाले ठीक आहे. तू तुझ्या पद्धतीने प्रयत्न करून पहा. माझे भविष्यवाणी चुकली तर आनंदच आहे. 

त्यानंतर आमचा फ़ार संपर्क नव्हता. काल पठ्ठ्याने लग्नाचे योग कधी आहेत ह्या प्रश्नासाठी फोन केल्यावर खालील माहिती मिळाली - 
१) अमेरिकेत जाण्याची इतर सर्व तयारी झाली होती. एजंटने केतनला व्हिसा पुढच्या आठवड्यात देतो असे आश्वासनही दिले. त्याप्रमाणे पैशांची जुळवाजुळव आणि युनिव्हर्सिटीच्या सर्व बाबी पूर्ण करण्याच्या तयारीत केतन गढून गेला. शेवटच्या क्षणी काय झाले ते कोणालाच कळले नाही. केतनला व्हिसा नाकारण्यात आला होता. कुठलेही कारण न देता त्याला व्हिसा मिळाला नाही.  

२) त्याने अमेरिकेला जाण्याचा नाद सोडून दिला. सर्व लक्ष IT क्षेत्रावर केंद्रित केले. आज तोगेले ३ वर्ष  IT क्षेत्रात कार्यरत आहे. 

पैशांची जुळवाजुळव झालेली असतांना, बहीण स्वतः अमेरिकेत स्थायी असल्यामुळे राहण्याचा काही प्रश्नच नसतांना केतनला अमेरिकेला जाता आले नाही. कुंडलीत परदेशगमन योग आहेत परंतु परदेशात राहून शिक्षण आणि स्थायिक होणे नाही. कुंडलीने दिलेले उत्तर कालांतराने खरे ठरले असेच म्हणायचे !!! 















गुरुवार, २७ जुलै, २०१७

कुंडलीतील रंग

कुंडलीतील  रंग 

रंग म्हटलं की मला आमच्या शाळेतील मराठी विषयाचा एक धडा आठवतो - ही तेंव्हाची गोष्ट आहे जेंव्हा पृथ्वीवरील फुलांना स्वतःचे रंग नव्हते. सर्व फुले पांढऱ्या रंगाचीच. फुलांनी इंद्रधनुष्याकडे रंग देण्याची विनंती केली. मग इंद्रधनुष्याने पृथ्वीवरील सर्व फुलांना रंग द्यायचे ठरवले. सर्व फुले खूश झाली. इंद्रधनुष्याने भल्या पहाटे हा कार्यक्रम सुरु केला. सर्व फुले वेळेत हजर झाली परंतु काही आळशी फुले आपल्या झोपेमुळे ह्या कार्यक्रमाला हजर राहू शकली नाहीत. ती फुले म्हणजे अनंत, मोगरा,जाई, जुई, निशिगंध इ. झोपेतून जागे झाल्यांनतर सर्व रंगीबेरंगी फुलांना पाहून ही आळशी फुले लगबगीने इंद्रधनुष्याकडे रंग मागण्यास जाऊ लागली परंतु इंद्रधनुष्य केंव्हाच निघून गेले होते. मग त्या फुलांना इतर देवतांनी उच्च प्रकारचे सुगंध दिले. म्हणूनच ज्या फुलांना रंग आहेत त्यांना सुवास नाहीत आणि ज्या फुलांना सुवास आहेत त्यांना रंग नाहीत.

रंग मनुष्याला अनादीकाळापासूनच भुलवत आले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या रंगाच्या आवडी वेगळ्या आहेत. त्याला आवडण्याऱ्या रंगाचे कपडे, गोष्टी त्याला आवडतात. अगदी घरात भिंतींनासुद्धा त्याच्या आवडीचा रंग असतो. आपण ठराविक रंगाकडे आकृष्ट होतो ह्याचे कारण म्हणजे आपला स्वभाव. हो आपला स्वभावच आपल्याला एखाद्या ठराविक रंगाकडे आवड असण्याला कारणीभूत असतो. उदाहरणच घ्यायचे झाल्यास - ज्या व्यक्तींनाच स्वभाव हा तापट असतो किंवा प्रत्येक गोष्ट त्यांना वेगाने झालेली हवी असते अशा लोकांचा कल हा लाल आणि काळा ह्या रंगांकडे असतो. आहे ना गंमत ? 

तुमच्या स्वभावामुळे तुम्हांला अमुक एका रंगाचे नेहमीच आकर्षणात वाटते. कपाटात आवडत्या रंगाचे ढीगभर कपडे असले तरीसुद्धा नवीन कपडे घेतांना तुमची नजर त्याच रंगाच्या कपड्यांकडे वळते. आणि मग घरच्यांकडून खरपूस समाचार मिळतो - त्याच त्याच रंगाचे किती कपडे झालेत कपाटात ?? तुला दुसरा कुठला रंग आवडतो की नाही तूला ? अर्थात आपले उत्तर "नाही"  असेच असते बरोबर ना ?

तर आजचा आपला विषय आहे कुंडलीतील रंग. रंगांचा आपल्या जीवनावर होणार परिणाम किंवा आपल्या जीवनशैलीमुळे आपल्याला आवडणारा रंग.

 पहिला रंग आहे - तांबडा (Red ) - तांबडा रंग म्हणजे म्हणजे भडक लाल. सूर्योदयाच्यावेळी आकाशात जी आभा निर्माण होते ती असते तांबड्या रंगाची. लाल रंग हा प्रेमाचा आहे. लाल हा रंग रक्ताचा सुद्धा आहे. ज्यांना हा रंग आवडतो त्यांचा स्वभाव अर्थात तापट असतोच परंतु ह्या लोकांची प्रत्येक गोष्टीत असलेली घाई त्यांना घातक ठरू शकते. हा रंग आवडणाऱ्यांचा पत्रिकेत "मंगळ" बलवान असतो. ह्यांना खाण्यातही पावभाजी, मिसळ असे तत्सम मसालेदार आणि चमचमीत पदार्थ आवडतात. अशा लोकांनी लाल रंगाचा वापर कमी करून काहीवेळेस निळा आणि पांढरा रंग वापरून स्वभावात बदल आणू शकतील. स्वभाव शांत होण्यास मदत होईल.

दुसरा रंग आहे - नारिंगी (Orange) - नारिंगी म्हणजेच भगवा रंग. नारिंगी रंग आहे जल्लोष आणि उत्साहाचा.  ह्या रंगाकडे ज्यांचा कल असतो त्यांच्या कुंडलीत "रवि" बलवान असतो. सूर्य जसा वेळेवर उगवतो आणि मावळतो तशी ह्या लोकांच्या आयुष्यात शिस्त असते. अशा व्यक्तिंची इतर लोकांवर छाप लवकर पडते. ह्यांना सर्व उच्च प्रतीच्या गोष्टी आवडतात. जेवतील तर फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच,प्रवास विमान किंवा स्वतःच्या गाडीने. रेल्वे किंवा बसने ह्यांनी क्वचितच प्रवास केलेला असतो. ह्यांच्यात जात्यातच नेतृत्व गुण असतात. काहीवेळेस स्वतःच्या स्वभावामुळे कुटुंबापासून दुरावा येतो. ह्या लोकांनी पांढऱ्या रंगाचा वापर केल्यास भावनिकदृष्ट्या कुटुंबियांशी जवळीक साधता येईल. ज्या लोकांना स्वभावात नेतृत्वगुण अवलंबवायचे असतील त्यांनी नारिंगी रंगाचा वापर करावा. आपल्या ऋषीमुनींही भगव्या रंगाचा अवलंब केला आहे.

तिसरा रंग आहे - पिवळा (Yellow ) - पिवळा रंग आहे ज्ञानाचा,नव्या कल्पनांचा. ज्ञानलालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पिवळा रंग आहे विष्णूचा आणि लक्ष्मीचा. पवित्र हळदीचा रंगही पिवळाच. ह्यांचा स्वभावात तारतम्य असतं. ह्यांची बुद्धी उच्चं प्रतीची असते. वागण्यात प्रगल्भता असते. दुसऱ्या व्यक्तींना समजून घेण्याच्या वृत्तीमुळे ह्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. ह्या व्यक्तिंना गोड पदार्थ जास्त आवडतात. प्रगल्भता आणि परिपक्वतेमुळे ह्या रंगाचा विशेष वापर वास्तुशास्त्रात शयनगृहात करण्यास सांगितला आहे. ह्या रंगाच्या वापरामुळे स्वभावातील तापटपणा आणि घाई ह्यावर नियंत्रण येण्यास मदत होते. पत्रिकेत "गुरु" बलवान असलेल्या व्यक्तिंना पिवळ्या रंगाचे विशेष अप्रूप असते. पत्रिकेत गुरु निर्बली असल्यास पिवळा रंग वापरावा. नात्यात स्थिरता आणायची असल्यास पिवळ्या रंगाचा वापर व्हावा.

चौथा रंग आहे - हिरवा (Green ) - हिरवा रंग आहे वसुंधरेचा,नव्या पालवीचा. गुढीपाडव्याच्या दिवशी निसर्गाकडे एक नजर पहाल तर लक्षात येईल की वसुंधरा हिरव्या शालूने नटली आहे. सोनेरी झेंडूची फुले त्या शालूची शोभा वाढवीत आहेत. हिरवा रंग आहे नव्या उमेदीचा आणि म्हणूनच आधीच्या इस्पितळात हिरव्या रंगाचे पडदे वापरण्याची पद्धत होती. आजारपणाने खचलेल्या व्यक्तिला ह्या रंगामुळे नवी उभारी मिळावी हा उद्देश. हिरवा रंग ज्यांना आवडतो त्यांची तर्कबुद्धी (Common Sense ) छान असते. बोलघेवडे असतात. हजरजबाबी असतात. नव्या उमीदीने,उत्साहाने प्रत्येक गोष्ट सुरु करतात. ह्यांना निरनिराळ्या प्रांतातील पदार्थ चाखून बघायची आवड असते.  ज्यांच्या पत्रिकेत "बुध" बलवान असतो त्यांना हिरव्या रंगाचे आकर्षण असते. ज्यांना स्वतःची तर्कबुद्धी तेज करायची असेल त्यांनी हिरव्या रंगाचा वापर अंमलात आणावा. आजारी व्यक्तिच्या आसपास हिरव्या रंगाचा वापर केल्यास फायदा होतो. बाहेरच्या देशात झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे की दृष्टी अधू किंवा चष्मा असलेल्या व्यक्तिंनी सतत हिरवळीकडे पहात राहिल्यास दृष्टीत सुधारणा होते.

पाचवा रंग आहे - निळा (Blue ) - निळा रंग आहे शांततेचा.  गडद निळ्या रंगाचे टी -शर्ट घालून माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीत हमखास "शनि" बलवान आढळतो. अशा व्यक्तिंना धर्म-जप -मंदिर ह्याचे वावडे असते. त्यांना आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे व्यवहारिक दृष्टीने पहायची सवय असते. प्रत्येक गोष्टीचे त्यांना  विश्लेषण (analysis ) हवे असते. वरवर पहाता ह्यांचा स्वभाव शांत वाटतो कारण ह्यांना उगीचच बडबड करण्याची सवय नसते. ते एकच वाक्य बोलतील आणि ते समोरच्या व्यक्तीला बरोबर समजेल. शोले फिल्ममधील अमिताभ आठवतोय ? फार न बोलता एकाच वाक्यात मतितार्थ सांगण्याची खुबी ह्यांच्याकडे असते. ह्या व्यक्तिंना सामाजिक समारंभात अजिबात स्वारस्य नसते. एकांतप्रिय व्यक्ति असतात. आळस असतोच. अशा व्यक्तिंनी  Social होण्यासाठी आणि आळस घालवण्यासाठी नारिंगी रंगाचा वापर करणे उचित ठरेल.

सहावा रंग आहे गुलाबी - (Pink ) - गुलाबी रंग आहे प्रेमाचा. गुलाबी रंग हा स्त्रीतत्वाशी जोडला जातो. ज्यांना गुलाबी रंग आवडतो त्यांच्या पत्रिकेत "शुक्र" बलवान आढळून आलेला आहे. अशा व्यक्तिंना नटण्या -मुरडण्याची आवड जात्यातच असते. कल्पनाविलास असतो. ह्यांना थंड आणि गोड पदार्थ जास्त आवडतात. आयुष्याबद्दल नाहक आणि वेगळ्या कल्पना असतात. बुद्धी अजिबात स्थिर नसते. ह्यांचे "Imagination" चांगले असते. आपले सर्व नट,शिल्पकार, चित्रकार, इंटेरिअर डिझायनर,फॅशन डिझायनर,ब्युटी पार्लर इ. शुक्राच्या अंमलाखाली येतात. जन्मतः कलाकार व्यक्ती म्हणजे शुक्र. ज्यांचा व्यवसाय इंटेरिअर, फॅशन, फोटोग्राफीशी, ब्युटीपार्लर असा आहे त्यांनी गुलाबी रंगाचा वापर करावा. शुक्रप्रधान व्यक्ति गोष्टींचे प्रेझेन्टेशन फार छान पद्धतीने करू शकतात.  व्यावसायिक व्यक्तिंनी प्रेसेंटेशनच्या वेळेस शुक्र प्रधान व्यक्तिंना ह्या कामासाठी अँपॉईंट करावे. नक्कीच फायद्याचे ठरेल.

सातवा रंग आहे पांढरा - (White) - पांढऱ्या रंगात सर्व रंग सामावलेले असतात. पांढरा रंग हा उच्च कोटीचा मानला गेला आहे. पवित्र मानला आहे. म्हणूनच आपल्या धार्मिक गोष्टींमध्ये पांढऱ्या रंगाला महत्त्व आहे. सरस्वतीदेवीचा रंग आहे पांढरा. उच्चकोटीची विद्वता हवी असेल तर अशा लोकांनी पांढऱ्या रंगाचा वापर करावा. पांढरा रंगसुद्धा शांततेचे प्रतिक आहे. पांढरा रंग शरणागतीचा आहे. शरणागती विद्वतेपुढे. फुकाचा अहंकार मागे टाकून आपल्यातल्या तेजाकडे (देवत्वाकडे ) जाऊ पाहणाऱ्यांनी जरूर ह्या रंगाचा वापर करावा. ज्यांचे मन अशांत आहे त्यांनीही ह्या रंगाचं वापर करावा.

वर जी मी फुलांची गोष्ट सांगितली होती ती इथे तंतोतंत पटते. पांढऱ्या सर्व फुलांना रंग नसला तरी उच्च प्रकारचा  सुवास आहे. इंद्रधनुष्याकडून इतर फुलांवर विविध रंगाची उधळण होत असतांना ही फुले मात्र आपल्याच तेजात रममाण होती. अशा लोकांचा स्वभाव हीच त्यांची ओळख असते. शांतपणा हा ह्यांचा गुणधर्म.

तर असे हे रंग. रंगाच्या सततच्या वापराने आपण जरूर आपल्या स्वभावात फरक घडवून आणू शकता. अर्थात त्यासाठी कुंडलीतले कुठले ग्रह निर्बली आणि बलवान आहेत ते जाणकार ज्योतिषांकडून जाणून घ्या.  रंगाचा वापर म्हणजे नुसतेच त्या रंगाचे कपडे असे नसून, तुम्ही त्या अमुक रंगाचे पेन जवळ बाळगू शकता. त्या रंगाची पाण्याची बाटली जवळ ठेवू शकता. बघा प्रयोग करून.

प्रतिक्रिया नक्की कळवा. - anupriyadesai@gmail.com
















बुधवार, १२ जुलै, २०१७

कुंडलीतील मंगळाचा वचक

कुंडलीतील मंगळाचा वचक 


मंगळाला मंगळाचीच मुलगी असावी म्हणजे बरे असते. नाहीतर मृत्यू  एकाचा मृत्यु होतो. ही वाक्य तुम्ही  ऐकलेली असतीलच. परंतु असे का ? ह्याचे कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का ? मुलीच्या,मुलाच्या लग्नापर्यंत कुंडलीवर विश्वास नसणारे पालक,कुंडलीचा चक्क अभ्यास करू लागतात. मग मुलांचे नक्षत्र, राशी, नाडी,गण तोंडपाठ होतात. अमुक अमुक राशीची मुलगी चालेल किंवा नाही ह्याची सुद्धा इत्यंभूत माहिती पालकांना असते. त्यांना आपल्या कामापुरते ज्योतिष माहिती होते. चांगली गोष्ट आहे, परंतु अर्धवट ज्ञानाने नेहेमीच नुकसान होते हे लक्षात असु दे.

तर आजचा आपला विषय आहे -  मंगळ दोष म्हणजे काय ?

मुळात कुंडलीत मंगळ असणे हा दोष का मानला जातो ? हा गैरसमज कोणी (जाणून-बुजून)पसरवला ? मला कल्पना नाही. मग त्यानंतर कुंडलीतल्या त्या मंगळाला जाती आल्या. सौम्य मंगळ,उग्र मंगळ वगैरे. मग ह्याचा परिहार म्हणून त्याची शांती किंवा मंगळीक व्यक्तीचा अमुक अमुक गोष्टींबरोबर विवाह लावणे इ. त्याने मंगळ शांत होतो म्हणे. किंवा मग वयाच्या  २७ व्या वर्षी विवाह केल्यास मंगळाचा दोष नाही. असं खरंच असतं का ?

आमच्या मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे का ? असे विचारणाऱ्या पालकांना सांगावेसे वाटते,"अहो मंगळच काय तुमच्या मुलीच्या कुंडलीत सर्वच ग्रह आहेत."  मंगळाचा एवढा वचक का बरं ? त्यासाठी मंगळाला आधी समजून घेऊ. मंगळ म्हणजे धडाडी. मंगळ म्हणजे सळसळतेपणा. शांत बसणे हे त्यांना माहीतच नसतं. बोलण्यांत स्पष्टपणा आणि चालण्यांत वेग हीच मंगळाची ओळख. बोलणे टोमणेवजाच असते. गुळमुळीत बोलणे त्यांना जमतच नाही. शरीर काटक आणि बळकट असते. आळसांत सुट्टीचा दिवस कसा व्यतीत करतात हे त्यांना माहित नसते. सुट्टीच्या दिवशी कोणती कामे आटोपून घ्यायची हे त्यांचे आधीच ठरलेले असते. स्वतःही कामे करतील आणि दुसऱ्यांनाही शांत बसू देणार नाहीत. ज्योतिष -शास्त्रात मंगळाला सेनापतीची उपमा दिली आहे. राजाने आदेश द्यावा आणि सेनापतीने युद्धभूमीवर सैनिकांकडून लढाई करवून शत्रूवर चढाई करावी म्हणजेच मंगळ. मंगळीक व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येते. त्यांच्या ह्या कर्तुत्वाला जोडीदाराच्या सहकार्याची गरज भासते.

अधीरता,अतिघाई, वर्चस्व गाजवणे हा झाला मंगळाचा स्वभाव. वय जसं जसं वाढत जातं तसं तसा मंगळाची अधीरता कमी होते,राग कमी होतो. त्यामुळे मंगळ असलेल्या व्यक्तीचे लग्न वयाच्या २७व्या वर्षी किंवा नंतर झाले म्हणजे कुंडलीतला मंगळ दोष गेला किंवा राग कमी झाला असे गृहीत धरतात. पण ते तितकेसे खरे नाही असे मला वाटते. कारण मंगळाचा स्वाभाविक गुणधर्म हा कायमच रहातो. २७व्या वर्षांनंतर फरक एवढांच होतो की राग कधी व्यक्त करावा आणि कधी करू नये ह्याची समज मंगळीक व्यक्तीला आलेली असते. मंगळीक व्यक्ती "प्रॅक्टिकल" असते. चटकन होणारी कार्य त्यांना आवडतात. फार रेंगाळणारी कामे मंगळीक व्यक्ती सोडून देतात.

मंगळाची दुसरी बाजू म्हणजे, मंगळाचा संबंध मानवाच्या लैंगिक गरजांशी आहे. मंगळ असलेल्या व्यक्तींची लैंगिक इच्छा प्रबळ असतात. मंगळ असलेल्या व्यक्तींची ह्या विषयांत असलेली अधीरता आणि ह्या विषयांतील कल्पना ह्या सामान्य व्यक्तींपेक्षा वेगळ्या असतांत. आणि त्यांच्या ह्या गरजा मंगळ असलेलेही त्यांची पत्नीच समजून घेऊ शकते. मंगळ व्यक्तींमध्ये शारीरिक क्षमता जास्त असते. मंगळाला हळुवारपणा,रोमांस हे प्रकार जमत नाहीत.

जर मंगळ असलेल्या व्यक्तीचा विवाह सामान्य व्यक्तीबरोबर म्हणजेच मंगळ नसलेल्या व्यक्तीबरोबर झाला तर काय होईल ?  मंगळ हा मुळातच धडाडीचा ग्रह. हळुवारपणा,गुळमुळीत बोलणे,नाजूकपणा हे मंगळाचे गुणधर्म नाहीत. आणि असे गुणधर्म असलेल्या व्यक्तींबरोबर त्यांचे फारकाळ जमतही नाही. त्यांचा मित्र परिवारही त्यांच्या सारखाच असतो. स्वभावात असलेला रांगणेपणा, तडफदारपणा,आव्हानात्मक भूमिका घेणे,प्रत्येक गोष्ट तीव्रपणे व्यक्त करण्याची वृत्ती ह्यामुळे त्यांनी लग्न करतांना आपला साथीदारही साधारपणे ह्याच स्वभावाचा असावा हे पहावे. अन्यथा त्यांचा कोंडमारा होण्याची शक्यता असते. कोंडमारा म्हणजे कसा ?  तर समजा मंगळीक व्यक्तीचा विवाह शनि प्रबळ असणाऱ्या व्यक्तीबरोबर झाला तर घटस्फोट निश्चित समजा. शनि म्हणजे मंगळाच्या विरुद्ध. शनि म्हणजे प्रत्येक गोष्ट हळुवारपणे करणे, संयम असणे, शांतपणे आपले काम करणे, फार आव्हानात्मक कामे न करता फार काळ चालणारी कामे करण्यात ह्यांना रस असतो. शनि प्रधान व्यक्ती "संशोधनात्मक" कार्यात यशस्वी होतात. शनिला फार फिरण्याची आवड नसते. मंगळाला ट्रेकिंग आणि ऍडव्हेंचर अशा मैदानी खेळांची आवड आणि शनिला बैठ्या खेळांची आवड. सुट्टीच्या दिवशी मंगळ छान ट्रेकिंगचे प्रोग्राम बनवेल तर शनि ते सर्व कॅन्सल करून घरी बसायला लावेल. मग अशा शनिप्रधान व्यक्तीबरोबर जर मंगळीक व्यक्तीचा विवाह झाला तर तो किती काळ टिकेल ?

मंगळाचे असे गुणधर्म वाचल्यावर तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की, मग दोघेही जेंव्हा मंगळीक असतील तेंव्हा त्या लग्नाची गोष्ट कशी असेल ? दोघांनाही जेंव्हा मंगळ असतो तेंव्हा स्वभावही सारखेच असणारा. त्यामुळे दोघांमध्ये आकर्षणही तेवढेच टिकते. भांडणही होतात. भांडणाची परिणीती मारामारीतही होते. मग राग शांत झाल्यावर पुन्हा दोघे एक होतात. तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था असते. म्हणूनच मंगळाला मंगळाचीच मुलगी असावी असे ज्योतिष -शास्त्राचे मत आहे. 

मंगळाचे गुणधर्म असलेल्या किंवा मंगळप्रधान व्यक्तीला समजून घेणे आणि त्याप्रमाणे त्याला जोडीदार शोधणे हे जबाबदारीचे काम आहे. आधीच्याकाळी व्यक्तीला मंगळ असणे म्हणजे काय हे सामान्य जनतेला सांगणे तेंव्हाच्या ज्योतिषांना प्रशस्थ वाटले नसावे. म्हणून त्यांनी जोडीदाराच्या मृत्यूचे कारण सांगून मंगळाला मंगळाचीच पत्रिका असावी ह्यांवर भर दिला. त्यामुळे खरे कारण समाजाला कधीच समजू शकले नाही आणि समाज कायम एका गैरसमाजामध्येच घाबरून राहिला. आणि ह्याचमुळे ज्योतिष -शास्त्राला दूषणे देणाऱ्यांचेही फावले. तेंव्हा मंडळी आपल्या मुलीला मंगळ असल्यास घाबरण्याची गरज नाही तर तिच्या स्वभावाला समजून घेण्याची गरज आहे. साथीदाराचा मृत्यू होतो हे गैरसमज मनातून काढून टाका. तिच्या स्वभावाला साजेसा,तिला समजून घेणारा जीवनसाथी तिच्यासाठी शोधा.
आज समाज जागृत होत आहे. ही नवी पिढी विचारांनी प्रगल्भ आहे. मुख्यतः मुलगा आणि मुलगी शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. गरज आहे ती एकमेकांना समजून घेण्याची. कारण त्यामुळेच समाज ही संकल्पना  टिकवण्यास मदत होईल. ह्या लेखाच्या निमित्ताने आजच्या पिढीला सांगावेसे वाटते की ज्योतिष शास्त्र हा विषय अत्यंत गहन आहे. तुमच्या कुंडलीवरून तुमचा स्वभाव अचूक सांगता येतो. त्यामुळे लग्नाआधी तुमच्या ज्योतिषाकडून तुमच्या होणाऱ्या जीवनसाथीबद्दल आधी जाणून घेणे फायदेशीर ठरेल. गुण किती जुळतांत ह्यापेक्षा पत्रिका किती जुळते ह्यांवर भर दिला पाहिजे तर घटस्फोट टाळता येतील.

प्रतिक्रिया नक्की कळवा - anupriyadesai@gmail.com








READERS ALL OVER THE WORLD