रविवार, १८ जून, २०१७

वास्तूचे रिचार्जिंग

वास्तूचे रिचार्जिंग 

'वास्तूचे रिचार्जिंग' ऐकून वेगळं वाटलं असेल ना ? आज जरा वास्तूबद्दल समजून घेऊ. मला आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो कारण आपल्या संस्कृतीत प्रत्येक नवीन गोष्टींची पूजा केली जाते. नवीन जमीन घेतली की "भूमी पूजन" केले जाते. त्याच जमिनीवर जेंव्हा आम्ही स्वतःची वास्तू बांधतो तेंव्हा त्या वास्तूचीही पूजा केली जाते. अगदी घरात नवीन कॉम्पुटर आणला तरी त्याची पूजा केल्याशिवाय आम्ही तो सुरूही करत नाही. नवीन गाडी मुहुर्तावरच घेतो. काही श्रद्धाळू मंडळी तर गाडी ताब्यात घेतल्यानंतर आधी आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनासाठी जातात मग रोजच्या व्यवहारासाठी गाडी वापरली जाते.

परंतु जेंव्हा ह्याच कॉम्प्युटरमध्ये कालांतराने काही बिघाड होतो मग त्याची दुरुस्ती करून घ्यावी लागते किंवा कॉम्प्युटरला मेंटेन करावे लागते असं म्हणूया. गाडीलाही कालांतराने मेन्टेन्सची गरज असते. चांगल्या स्वरूपातील गाडी ऍव्हरेजही चांगले देते. मोबाईल तर हल्ली काळाची गरज आहे. मोबाईलच्या बॅटरीचे रिचार्जिंग तर सतत करावे लागते. आता "Power Banks" ही नवीन मशीन आली आहे त्यामुळे प्रवासातही मोबाईलला रिचार्जिंग करता येउ शकते. ह्या तर सगळ्या मशिन्स झाल्या. परंतु प्राणी,झाडे आपण मनुष्य ह्या सर्वांनाच कालांतराने गरज भासते ती म्हणजे नव्या ऊर्जेची. आणि ह्यासाठी आपण झाडांना उत्कृष्ट दर्जाचे खत पुरवतो,कीड लागू नये म्हणून कीटक-नाशकाची फवारणी करतो. मनुष्य जेंव्हा रोजच्या धकाधकीच्या धावपळीमुळे थकतो आणि त्याला नव्या ऊर्जेची गरज भासते तेंव्हा तो नेहेमीच्या कामातून सुट्टी घेऊन बाहेरगावी जातो. refresh होतो,recharge होतो आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरवात करतो.  थोडक्यात काय तर रिचार्जिंग हे मनुष्य,प्राणी,झाडे,मशिन्स ह्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे आहे कारण रिचार्जिंगनंतर प्रत्येक गोष्टीची काम करण्याची क्षमता वाढते. पटतंय ना मंडळी ?

पण आपल्या रोजच्या धावपळीत आपण एका गोष्टीचे रिचार्जिंग करतंच नाही. आणि ती गोष्ट म्हणजे आपले घर,आपली वास्तू. कामावरून निघाल्यावर प्रत्येकाला ओढ लागते ती घरी पोहोचण्याची. इथे घर मोठे किंवा छोटे हा वाद नाही कारण घर कसेही असले तरी कधी एकदा आपण आपल्या घरी पोहोचतो असे प्रत्येकालाच वाटते. ह्याच घरात मोठे समारंभ झालेले असतात,लग्न,डोहाळेजेवण,बारशी इ. आणि ह्याच घराने मृत्यूही पाहिलेले असतात. आपले वाद,शोक,आनंद,प्रेम ह्या सर्वात आपण आपल्या घराला म्हणजेच वास्तूला नकळतपणे आपल्या सुख-दुःखात सामील करून घेत असतो आणि ह्या वास्तूवर ह्या सर्वांचा परिणाम होत असतो. वास्तूची ऊर्जा कमी होत जाते आणि त्याचा नकारत्मक परिणाम त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींवर होण्यास प्रारंभ होतो. मग वास्तूला गरज भासते ती 'रिचार्ज' करण्याची.

कारण तुम्ही म्हणाल आम्ही वास्तूची रंगरंगोटी तर आम्ही ठरावीक कालांतराने करतो. ही रंगरंगोटी, साफसफाई म्हणजे वास्तू मेंटेन केली असं म्हणू शकतो परंतु वास्तू रिचार्ज केली असं म्हणू शकत नाही. आता वास्तूचे रिचार्जिंग करायचे म्हणजे नक्की काय करायचे ? वास्तूचे रिचार्जिंग म्हणजे वास्तूमध्ये वर्षांनुवर्षे जमा झालेली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आणि सकारत्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी प्रयत्न करावेत. वास्तूच्या रिचार्जिंगसाठी अनेक उपाय आहेत. त्यातले प्रामुख्याने केले जाणारे उपाय म्हणजे -वास्तुशांत, उदकशांत, लघुरुद्र इ. वास्तुशांत आणि उदकशांत ह्या मध्ये जे मंत्रांचे उच्चारण केले जाते त्यामुळे वास्तूत तयार झालेल्या नकारात्मक ऊर्जेला थारा राहत नाही आणि वास्तू प्रफुल्लीत होऊन आपल्याला नवीन ऊर्जा देण्यास सक्षम बनते. आता वास्तुशांत आणि उदकशांत हे प्रत्येकाच्या खिशाला परवडण्यासारखे नाही. त्यासाठी इतरही उपाय आहेत. ज्यांना हे उपाय करता येऊ शकणार नाहीत त्यांनी रोज संध्याकाळी स्वतः रामरक्षेचा पाठ म्हणावा. ते शक्य नसेल तर हल्ली मोबाईल सर्वांकडेच असतो. मोबाईलवर रामरक्षा डाऊनलोड करून घ्या आणि रोज तिन्हीसांजेला वास्तूत सर्वांना ऐकू येईल इतपत परंतु हळू आवाजात ती ऐका. ते ही शक्य नसेल तर "हनुमान चालीसा" ऐकू शकता.( हनुमान चालीसा - ह्यांवर बोलण्यासारखे इतके आहे की त्यावर एखादा लेख होऊ शकेल. ) वास्तूतील जमीन खडे मिठाच्या पाण्याने दररोज पुसून घेतली तरी बऱ्याच प्रमाणात नकारत्मक ऊर्जा वास्तूमधून निघून जाण्यास मदत होते. (खडे मीठाबद्दल आता संशोधन झालेले असून बाहेरच्या प्रगत देशातुन खडे मिठाचा वापर नकारत्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी वापर केला जातोय. ह्या संदर्भातील माहिती तुम्ही इंटरनेटवर तपासून पाहू शकता. )

वर नमूद केलेल्या गोष्टींचा अंमल केल्याने नकारात्मक ऊर्जा वास्तूमधून बाहेर जाण्यास नक्की मदत होईल परंतु वास्तूत सकारत्मक ऊर्जा पुन्हा प्रवाहित करण्यासाठी तुम्हांला जास्त प्रयत्नशील रहावे लागेल. त्यासाठी काय कराल ? त्यासाठी वास्तूत "Negative" बोलणे टाळा. पूर्वीच्या काळची मंडळी नेहेमी म्हणायची "वास्तू नेहेमी तथास्तु म्हणत असते".  तथास्तु म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होवो. म्हणूनच वास्तूत नेहेमी सकारत्मक बोलणे असावे. वास्तूतील हवा सतत प्रवाहित राहील अशी व्यवस्था करावी. आपल्या घरात तुळस असावी. तुळशीचे महत्त्व आयुर्वेदशास्त्रात नमूद केलेलेच आहेत. वास्तूच्या भिंतींचा रंग हा फार उग्र नसावा. थकून घरी आल्यानंतर वास्तूतील रंगसंगतीमुळे मनाला शांती आणि उभारी मिळेल असे रंग असावेत. घरात असलेल्या चित्रांना (पेन्टिंग्स) महत्त्व आहे. वास्तूत कुठले चित्र असावे आणि कुठले असू नये ह्या साठी वास्तू-शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. परंतु माझे म्हणणे आहे की इतके काटेकोर नियम पाळण्यापेक्षा साधा नियम म्हणजे जे चित्र भिंतीवर लावणार असाल त्याने मन क्रोधीत न होता तुमचा उत्साह वाढेल असे असावे. आठवड्यातून एकदा तिन्ही सांजेला वास्तूत धूप करावा. वर्षातून एकदा तरी आपल्या वास्तूत एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे.  त्या तृप्त झालेल्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या आशिर्वादाने ( Good Vibes ) वास्तूतील ऊर्जा सकारत्मक होते. 
एवढे साधे जरी उपाय तुम्ही केलेत तरी तुमची वास्तू रिचार्ज होईल. अशी रिचार्ज झालेली वास्तू स्वतः प्रसन्न असते आणि सतत प्रसन्नता परावर्तित करते. मग काय मंडळी तुमची वास्तू कधी रिचार्ज करताय ?

कसा वाटला हा लेख ? प्रतिक्रिया जरूर कळवा.

सूचना - ह्या आणि अशा बऱ्याच केसेस चा मी माझ्या "ब्रम्हांडातील रत्ने" ह्या पुस्तकांत समावेश केलेला आहे. तुम्हांला हे पुस्तक हवे असल्यास इथे संपर्क साधावा - www.bookganga.com. इथे तुम्हांला पुस्तकांतील काही पाने वाचावयास मिळतील. ऑर्डर दिल्यास पुस्तक घरपोच मिळेल.

अनुप्रिया देसाई
ज्योतिष आणि वास्तू विशारद
anupriyadesai@gmail.com    

राहू - शिक्षण आणि करीअरचा बट्ट्याबोळ ? कि आशेचा किरण ?

राहू महादशा - शिक्षण आणि करीअरचा बट्ट्याबोळ ? कि आशेचा किरण ? 


परवा सौ. मोरेंचा फोन होता. मुलाच्या शिक्षणाबद्दल त्यांना कुंडली विवेचन हवे होते. भेटण्याचा दिवस आणि वेळ ठरवली. ठरवून दिलेल्या दिवशी सौ. मोरे मुलाला - गौरवला माझ्याकडे घेऊन आल्या. अत्यंत बेफिकिरीची छटा त्या मुलाच्या चेहेऱ्यावर होती. आईने आता कोणाकडे मला आणले आहे ? आता ह्या काय मला सांगणार ? असे भाव त्याच्या चेहेऱ्यावर होते. बाकीच्या पालकांप्रमाणे गौरवच्या आईनेही त्याच्याबद्दल तक्रारी करायला सुरवात केली - हा अजिबात अभ्यास करीत नाही. शाळेला दांड्या मारून मित्रांबरोबर भटकत असतो. सध्या गुटका खायला शिकलाय. गुटका आणि तंबाखु भरलेला असतो तोंडात. त्यांना तिथेच थांबवून मी त्यांना त्याच्या वडिलांबद्दल चौकशी केली. त्यांना विचारले की बाबांचाही धाक नाही का ? पालकांपैकी एकाच तरी धाक मुलांना असतो. ह्याचे वडील हा लहान असतांनाच वारले ह्या त्यांच्या बोलण्यावर मी निरुत्तर झाले. माझा संपूर्ण फोकस मी मुलाच्या कुंडलीवर घेतला.

कुंडली विवेचन - पारंपरिक पद्धतीने -:

१) मिथुन लग्नाची कुंडली. लग्न स्थानात गुरु आणि बुध अस्तंगत अवस्थेत. (अस्तंगत म्हणजे त्या ग्रहांची तुम्हांला परिणाम देण्याची क्षमता गमावून बसतात.) ह्या कुंडलीत बुद्धीचा कारक ग्रह बुध आणि ज्ञानाचा कारक ग्रह गुरु दोन्हीही अस्तंगत होते. त्यामुळे बुद्धी आणि शिक्षण ह्याचा अभाव जाणवतो. फक्त हेच ग्रह कारणीभूत आहेत असे नाही. ग्रह जेंव्हा अस्तंगत होतात तेंव्हा ते काही दिवसांसाठी अस्तंगत होतात. त्यामुळे त्या दिवसांत जन्म झालेल्या सगळ्यांच मुलांच्या पत्रिकेत हे ग्रह अस्तंगत असणार परंतु ह्याचा अर्थ असा नाही की त्या सर्वच मुलांना शैक्षणिक प्रगतीत अडथळे येतील. त्याला बाकीही कारणे असू शकतात. त्याचाही अभ्यास झाला पाहिजे.

२) तर गौरवच्या कुंडलीत हे ग्रह अस्तंगत होते ते ही बुधाच्या मिथुन राशीत. बुध हा ग्रह तुमचा "Common Sense"कसा आहे हे दर्शवितो. ह्या राशीतच दोन्ही ग्रह अस्तंगत. चतुर्थ स्थानातून प्राथमिक शिक्षण,संस्कार पहिले जातात. मिथुन लग्न असल्याने चतुर्थ स्थानात बुधाचीच कन्या राशी आली. म्हणजे तिथेही उजेड असणार हे उघड आहे. माझा मोर्चा मी नवम स्थानाकडे वळवला. प्राथमिक शिक्षणात असलेले अडथळे पहाता उच्च शिक्षण किंवा काही दुसऱ्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊ शकेल का हे तपासणे जरुरी होते. 

३) नवमस्थानाचा अधिपती शनि आणि तो सुद्धा व्यय स्थानांत. त्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काळातील दशा अभ्यासल्या. प्राथमिक शिक्षणासाठी दशा जरातरी Supportive होत्या परंतु माध्यमिक शिक्षण सुरु झाल्यानंतर मंगळाची दशा सुरु झाली. मंगळ व्यक्तीला अजून आक्रमक बनवतो. मंगळ ह्या पत्रिकेत आहे वक्री. आधीच अभ्यासाची फार आवड नसलेल्या गौरवाची मंगळाची दशा सुरु झाली होती. आता तो कोणाचेही ऐकण्यासाच्या मनःस्थितीत नव्हता. दहावीच्या वर्गात त्याची हजेरी जेमतेम होती. परंतु शाळेतील प्रत्येक शिक्षक आणि प्राध्यापकांना घरातील परिस्थिती माहिती असल्याने त्यांनी नेहेमीच गौरवला समजून घेतले. परंतु ह्याचा गौरवने गैरफायदा घेतला.त्याने दहावीच्या परीक्षेच्या आधी द्यावी लागणारी कुठलीही "Assignment" पूर्ण करून  दिली नाही. मग मात्र शाळेचा नाईलाज झाला. नियमांनुसार गौरवला परीक्षेला बसू दिले नाही. त्याचा गौरववर तरी काहीच परिणाम झाला नाही. त्या माऊलीला मात्र आपल्यानंतर ह्याचे काय होणार ही चिंता वाटू लागली.

ह्या सर्व कथा -कथनाबरोबर माझे गौरवच्या कुंडलीचे विवेचन सुरूच होते. 

कृष्णमूर्ती पद्धतीने केलेले विवेचन खालील प्रमाणे - :    

१) प्राथमिक शिक्षणासाठी चतुर्थाचा सबलॉर्ड राहू. राहू "पंचम" स्थानाचा कार्येश. राहू आहे राहूच्याच नक्षत्रात. म्हणजे पंचम स्थान चांगलेच ऍक्टिव्ह होते. म्हणजे सातत्याचा अभाव. 
२) प्राथमिक शिक्षणाच्या वेळेस चंद्राची महादशा सुरु झालेली. चंद्र स्वतः व्ययात. चंद्राची कर्क राशी कस्पप्रमाणे तृतीय  स्थानात. चंद्र तृतीय आणि व्यय स्थानाचा कार्येश. म्हणजे इथेही साहेबांनी अभ्यास केलेला दिसत नाही कारण एकाग्रता होण्यासाठी जी स्थाने जरुरी आहेत ती इथे ऍक्टिव्हच नाहीत. 
३) चंद्रानंतर आली मंगळ महादशा. मंगळ षष्ठ आणि व्यय स्थानाचा कार्येश. मंगळ बुधाच्या नक्षत्रात. बुध कस्पने व्यय स्थानात. त्यामुळे बुध व्यय स्थान,प्रथम स्थान,द्वितीय आणि पंचम स्थानांचा कार्येश. इथे तर अभ्यास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ह्या महादशेतच गौरव व्यसनांच्या अधीन झालेला आहे. 
४) त्याच्या येणाऱ्या पुढच्या दशांवर मी लक्ष केंद्रित केले. जेंव्हा गौरव २१-२२ वर्षांचा होईल तेंव्हा राहू महादशा सुरु होणार आहे. राहू हा छाया ग्रह आहे. तो ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाचे चांगले गुणधर्म नष्ट करून टाकतो. राहू जर गुरु ग्रहाबरोबर असेल तर मुलांच्या शिक्षणात अतोनात अडथळे येतात. राहू जर बुधाबरोबर असेल तर खोटे बोलणे, नकली सह्या करणे, नकली कागदपत्रे बनविणे,इतरांच्या नकला करणे इ. गोष्टींमध्ये जातक एक्स्पर्ट होतो. दशेने साथ दिली नाही तर ह्या सर्व गोष्टींमध्ये कायद्याच्या कात्रीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गौरवच्या कुंडलीत सुरु होणारी राहूची महादशा म्हणजे ही व्यक्ती नोकरी करणार नाही हे नक्की होते. मग तो करणार काय ? 
ती माऊली तर फार अपेक्षेने माझ्याकडे बघत होती,की काहीतरी चांगली गोष्ट मुलाच्या आयुष्यात घडणार असेल. समोर असलेल्या जातकांना शक्यतो मी स्पष्टपणे जे जाणवते ते सांगते. कारण त्यामुळे त्या व्यक्तीची मानसिक तयारी होते आणि दुसऱ्या काही शक्यतांवर लक्ष केंद्रित करता येते. वरील सर्व गोष्टी गौरवच्या आईला स्पष्ट सांगण्याची गरज होती. म्हणून मी गौरवला थोड्या वेळेसाठी बाजूच्या खोलीत बसण्यास सांगितले. सौ. मोरेंना गौरवच्या शिक्षणाबद्दल सगळी कल्पना दिली. पुढे तो फार शिकणार नाही परंतु आपण त्याला तसे न सांगता किमान बारावी पर्यंतचे तरी शिक्षण पूर्ण करून घेता आले तर त्यासाठी प्रयत्न करावेत. गौरवच्या शुक्राच्या कार्येशत्ववरून त्याला कुठल्याही प्रकारच्या "Musical Instrument " ची आवड आहे का ? हे विचारल्यानंतर गौरवला गिटार वाजवण्याची आवड असल्याने तो सध्या गिटारच्या क्लासला जातो, ही माहिती मिळाली. त्याने त्याची ही आवड कायम ठेवावी हे सांगितले. गौरवच्या पुढील दशा पहाता तो नोकरी तर करणार नाही. कारण सातत्य दिसत नाही. परंतु द्वितीय स्थान बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह दिसत असल्याने अर्थार्जन तर होणार आहे. परंतु अर्थार्जन कसे ? तर त्याचे उत्तर महादशेतच लपलेले आहे असे मला वाटते. राहू हा "Corruption" चा कारक आहे. राहू हा राहूच्याच नक्षत्रात असून बुधाच्या सबमध्ये आहे. बुध हा कागदपत्रांचा कारक आहे आणि राहू "Corruption" चा. त्यामुळे पुढे गौरव कागदपत्रांची देवाणघेवाण आणि त्यातून कमावलेले कमिशन (Commission  Based Income - बुध ) हीच गौरवाची कमाई. त्यामुळे पुढील आयुष्यात तो आर्थिकदृष्ट्या नक्कीच स्वावलंबी असेल. त्यामुळे पालकांची जी मुळात काळजी असते कीआमच्या पश्चात्त आमचे मुलं आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल ना ? ती काळजी सौ. मोरेंची सध्यातरी कमी झाली होती. 

हे सर्व सांगितल्यानंतर सौ. मोरेंना अश्रू आवरले नाही. त्या म्हणाल्या," मला तुम्हांला प्रामाणिकपणे काही सांगायचे आहे. मी आतापर्यंत बऱ्याच ज्योतिषांकडे गेले आहे. गौरवच्याच कुंडलीकरिता. त्याचीच सतत काळजी असते मला. त्याच्याबद्दल मला आतापर्यंत सर्व ज्योतिषांनी खूप वाईट वाईट सांगितले होते. हा मुलगा वाया जाणार आहे. काहीही कमवणार नाही. ह्याचं आयुष्यात काही होऊ शकत नाही. त्यामुळे माझी स्वतःची सतत चिचिड होत असते. सध्या मी त्याला माझ्याबरोबर ऑफिसलाही घेऊन जाते. कारण तो घरी राहिला की मित्रांबरोबर जातो आणि दिवसभर बाहेर भटकत  रहातो. माझ्याबरोबर आला की व्यसनांपासूनही दूर रहातो आणि तिथे थोडा अभ्यासही होतो. आठवड्यातून दोन दिवस गिटारच्या क्लासला जातो. आता तुम्ही त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल थोडी कल्पना दिली आहे त्यामुळे मला खूप रीलॅक्सड वाटत आहे.आता मी अभ्यासासाठी त्याच्या सतत मागे लागणार नाही. मी आता स्वतः टेन्शन फ्री राहीन. मी तुम्हांला वेळोवेळी त्याच्या प्रगतीबद्दल सांगेनच." 

पारंपरिक पद्धतीने कुंडली पाहिल्यास सर्व वाईटच गोष्टी प्रथम दर्शनी दिसून येत आहेत परंतु कृष्णमूर्ती पद्धतीने पाहिल्यास आशेचा एक किरण दिसतोय. तोच धागा पकडून त्यांना त्याबाबत गौरवच्या पुढील आयुष्याबाबत सांगितले. गौरवच्या कुंडलीत "जेल योग" आहे का ते ही तपासून घेतले होते. तसे काही योग दिसले नसल्याने त्याची उगीच चर्चा करून त्यांना टेन्शन देण्यात अर्थ नव्हता. हे सर्व झाल्यानंतर गौरवला पुढील शिक्षण घेण्याबद्दल समजावून सांगितले. त्याने नुसतीच मान डोलावली. ज्योतिष -शास्त्रामुळे एका माऊलीला तणावमुक्त करण्यात यशस्वी ठरले. 


अनुप्रिया देसाई 
anupriyadesai@gmail.com


बुधवार, ७ जून, २०१७

ऑपरेशन ??? मुळीच नाही !!!

ऑपरेशन ??? मुळीच नाही !!!

रवींद्र ओव्हाळ म्हणून माझे एक जातक मित्र आहेत. ज्योतिष-शास्त्राची आवड असून स्वतः ज्योतिषशास्त्र शिकत आहेत.  त्यांचा २४ मे रोजी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी फोन आला. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या आरोहीचे  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. निमित्त होते हाताला झालेली उष्णतेची फोड. त्या फोडीचे रूपांतर "Infection"मध्ये झाले आणि छोट्या आरोहीला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. दोन -तीन दिवसानंतरही डॉक्टर नक्की काहीच सांगत नव्हते. आरोहीचा ताप उतरला होता. डॉक्टरांनी आरोहीच्या हाताचे ऑपरेशन करावे लागेल अशी शंका व्यक्त केली. जेमतेम दोन वर्षांची आरोही. तिचे हाताचे ऑपरेशन. आई-वडील खूप घाबरले. एक उष्णतेची फोड काय होते ..त्याचे इन्फेक्शन काय होते ...आणि आता ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असे डॉक्टरांचे म्हणणे. डॉक्टरांनी आरोहीचा MRI रिपोर्ट्स काढून घ्या असे सांगितले. मग मात्र तिच्या आई -वडिलांची चिंता रवींद्रला पहावली नाही. त्यांनी लागलीच फोन करून मला सर्व परिस्थितीचा आढावा दिला. त्यांनी आरोहीचे जन्म-टिपणही मला दिले. रवींद्रला स्वतःचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास असल्याने त्यांनी आरोहीच्या आई -वडिलांकडून के.पी. नंबरही घेतला. ( ज्योतिष शास्त्रात जर एखाद्या व्यक्तीला ठरावीक प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास के. पी. नंबर ज्योतिषाला देऊन त्यावरून उत्तर काढता येते. ही एक पद्धत आहे )
मी तिची जन्मकुंडली तपासली. परंतु मी प्रश्न कुंडलीवर जास्त भर दिला. ह्याचे कारण एखादी व्यक्ती ठरविक वेळेला प्रश्न विचारते ती वेळ अचूक उत्तर देते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी ९ वाजून ५५ मिनिटांची कुंडली मांडली.

धनु लग्नाची कुंडली. चंद्र पंचमात मेष राशीत. चंद्र पंचमात म्हणजेच प्रश्न किती मनापासून विचारला गेला आहे. पंचम स्थान हे मुलांशी निगडीत स्थान आहे. चंद्र भरणी म्हणजेच शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्र चतुर्थात उच्चीचा. कृष्णमूर्ती पद्धतीत रुलिंग प्लॅनेट्सना (शासक ग्रह ) महत्त्व फार. शासक ग्रह मांडले.

L -  गुरु - १०,१,४      चंद्र - ५,८
S -  शुक्र - ४,६,११     बुध - ५,७,१०
R -  मंगळ - ६,५,१२  मंगळ - ६,५,१२
D -  मंगळ ६,५,१२    मंगळ - ६,५,१२

कुठेही ऑपरेशनचे योग दिसत नव्हते. मात्र चंद्राचा अष्टम स्थानाशी संबंध येत असल्याने औषधोपचार चालू ठेवावे लागतील असे दिसते. आरोहीची मूळ कुंडली सुद्धा अभ्यासली. त्यातही अष्टम आणि षष्ठ स्थानाचा संबंध येत होता. याचाच अर्थ काही काळ तरी हा त्रास छोट्या आरोहीला सहन करावा लागेल परंतु औषधोपचाराने बरे वाटेल. आता पालकांचा पुढचा प्रश्न असतो - मग हॉस्पिटलमधून कधी घरी जाता येईल ? शासक ग्रहांवर नजर टाकली. गुरुवारी किंवा शुक्रवारी तिला घरी जाण्यास परवानगी मिळेल हे स्पष्ट दिसतेय. त्याप्रमाणे मी रवींद्रला फोन करून सांगितले की,

१) ऑपरेशनची गरज भासणार नाही.
२) औषधोपचार सुरु ठेवावे लागतील.
३) हॉस्पिटलमधून गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी येऊ शकेल.

रवींद्रने उद्या MRI चे रिपोर्ट्स आल्यावर कळवतो असे म्हणून फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी मी सुद्धा कामाच्या ओघात विसरून गेले. रात्री रवींद्रचा मेसेज आला. रवींद्रने केलेला मेसेज म्हणजे ज्योतिष शास्त्रावर द्विगुणीत झालेला त्याचा विश्वास आहे. तो मेसेज इथे वाचकांसाठी देतेय - 

मॅडम,एक चांगली बातमी सांगायची होती..आरोहीचं ऑपरेशन करावं लागणार नाही..फक्त काही मेडिसीन आणि इंजेक्शनचा कोर्स करावा लागणार आहे निदान काही दिवस तरी..आणि तिचा MRI रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे तिला आज दुपारी हॉस्पिटलमधून घरी सोडलं...मी पण ९ वाजता घरी कामावरून आलो तेव्हा कळलं..फोन करणार होतो...पण घरी थोडं कामं होतं..म्हणून आता मेसेज करत आहे...पुन्हा एकदा कृष्णमूर्ती पद्धतीला सलाम...आणि तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी सोडतील ते सुद्धा भाकीत बरोबर आलं..


धन्यवाद..अगदी मनापासून...असंच मार्गदर्शन करत रहा..खूप खूप आभार 🙏🙏🙏

ज्योतिष -शास्त्राचा उपयोग फक्त लोकांना घाबरवण्याचा नसून त्यांना "टेंशन फ्री" करण्यासाठी आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा हा ह्या लेखाचा उद्देश.

कसा वाटला हा लेख ? प्रतिक्रिया नक्की कळवा. 
सूचना - ह्या आणि अशा बऱ्याच केसेसचा मी माझ्या "ब्रम्हांडातील रत्ने" ह्या पुस्तकांत समावेश केलेला आहे. तुम्हांला हे पुस्तक हवे असल्यास इथे संपर्क साधावा - www.bookganga.com. इथे तुम्हांला पुस्तकांतील काही पाने वाचावयास मिळतील. ऑर्डर दिल्यास पुस्तक घरपोच मिळेल.

READERS ALL OVER THE WORLD